रविवार, २७ जानेवारी, २०१९

येळवस


आमच्या उस्मानाबाद-लातूर जिल्ह्यात मार्गशीर्ष महिन्यातल्या अमावस्येला येळवस हा कृषीसंस्कृतीतला सण साजरा केला जातो. येळवस म्हणजेच वेळा-अमावस्या. थंडीचे दिवस. संक्रांतीच्या आधीचा सूर्याच्या संक्रमणाचा काळ. इथून दिवस मोठा होत जातो. म्हणूनच इकडं ‘येळवशीचा उंडा आनी दिवस झाला धोंडा’ ही म्हण प्रसिद्ध आहे.
   येळवशीच्या दिवशी जल्दी उठून कर्ता माणूस आंबीलाचं बिंदगं डोक्यावर घेऊन सगळ्यांच्या आधी शेताला जातो. मागून सगळे बैलगाडीत बसून शेताला निघतात. गाडीत सैपाकाच्या डाली कापडानं बांधून व्यवस्थित ठेवल्या जातात.  गाडीवाटेनं मुलांच्या आग्रहावरून बैलगाड्यांच्या शर्यती लागतात. एकमेकांना हुर्रे करत, धुराळा उडवत गाडी शेतात पोचते.
  येळवशीच्या आदल्या दिवशीच शेताला जाऊन वांगे, मेथी, रानभाज्या, तुरीच्या शेंगा, हरभऱ्याचे ढाळे, गाजरं, पातीचा लसून, कांदा, चिंचा, पूजेसाठी पेरू असा भरगच्च रानमेवा आणला जातो. आपल्या शेतात जे नाही ते दुसऱ्याच्या शेतातून मागून आणायचं. आपल्या शेतातलं दुसऱ्याला द्यायचं. येळवशीच्या आदल्या दिवशी खास बाजार भरतो. त्याला भाजीपाला म्हणतात.
      आणलेल्या भाज्या निवडणे, शेंगा सोलणे ही कामं लहानगे आणि गडीमाणसंही करू लागतात. रात्री ढणढणत्या चुलीवर रानमेवा शिजतो. रानमेव्याची भज्जी, सजगुऱ्याचे (बाजरीचे) उकडलेले उंडे, वांग्याचं भरीत, ताकाला पीठ लावून केलेलं आंबील, खिचडा, खीर, गूळशेंगा वाटून तयार केलेल्या कोंदीचे लाडू आणि पोळ्या असे एकाहून चढ एक पदार्थ...दोन डाली गच्च भरतात. इष्टमित्र, पाहुणे, शेजारी यांना आवतन दिलेलं असतं.
   येळवशीला प्रत्येक घरी शहरातले पाहुणे आल्यानं सकाळी गावात अनेक नवनवे चेहरे दिसू लागतात. पण दिवसभर आमच्या भागातली गावं, शहरं कर्फ्यू लागल्यासारखी दिसतात. सगळ्या बाजारपेठा बंद, दुकानं बंद, घरं बंद... सर्वत्र शुकशुकाट असतो. शिवारातली शेतं मात्र गजबजलेली असतात.
       शेतात कडब्याच्या पेंढ्या लावून लहान कोप आदल्या दिवशीच तयार केलेली असते. कोपीत पाच पांडवाचे पाच दगड ठेवलेले असतात. शेतात गेल्याबरोबर पांडवांवर मध्यभागी कावाचा गोल ठिपका आणि त्याच्याबाहेरील बाजूने चुन्न्याचा पट्टा लावून पांडवांची पूजा करतात. सगळे कोपीसमोरच झाडाच्या सावलीत बसलेले असतात. एका खापराच्या येळणीत आंबील आणि त्यात चुरलेले सजगुऱ्याचे उंडे तर दुसऱ्या येळणीत पाणी घेऊन ‘हर बोलो, भगतराजे हर बोलो ऽ  शंभूशंकराच्या नावांनं हर बोलो ऽ ढवळ्या नंदीच्या नावानं हर बोलोऽʼ म्हणत ज्वारीच्या पानाने  सगळ्या पिकात चर शिंपले जाते. वडीलधारे पुढे चर शिंपायला, तर लहानगे मागे पाणी शिंपायला. शिवार ‘हर बोलो’च्या जयघोषानं दुमदुमून जातं. चर शिंपून आल्यावर चर शिंपणाऱ्यांनी उंडा घेण्यासाठी हात मागे पाठीवर ठेवून, गुडघे टेकून पांडवांच्या पाया पडायचं. तेव्हाच बाया पाठीवरच्या उलट्या ओंजळीत हळूच सजगुऱ्याचा किंवा कोंदीचा उंडा ठेवतात. उंडा खायचा. उंडा खाल्ल्यावर भूक आणखीनच चाळवते.  त्यानंतर विहीरीला निवद दाखवून पूजा केली जाते. मग पंगत पडते. अन्न गोड लागतं. पोट भुगेस्तोवर जेवून वरून आंबील पिऊन अंग जड होतं. सुस्ती येते. पानाचे विडे खायला दिले जातात. गप्पाट्या रंगतात. माणसं तिथंच लोळतात. झोप लागते. पोरं बोरं खात, मव्हाळं शोधत रानभर हिंडतात. कुणाला मधमाशी चावल्यामुळे तोंड सुजलेलं दिसतं. जास्त आंबील पिऊनही तोंड सुजतं. डोळे तारवटून लाल होतात. मध खाऊन तोंड गोडमिट्ट पडतं. एकमेकाच्या कोपीवर बोलावलं जातं. भेटीगाठी होतात. ख्याली-खुशाली समजते. थट्टा-मस्कऱ्या रंगतात. भज्जी- उंडे खाण्याचा आग्रह होतो. ‘नको पोट तुडूंब झालंय’ म्हटल्यावर ‘खावा. आज पोट मोठ्ठं होतंय. येळवशीचं अन्न कितीबी खाल्लं तरी पचतंय.’ असं म्हटलं जातं. मग त्यांच्या भज्जीची  टेस्ट बघावीच लागते. रात्रभर जागून सैपाक केल्यामुळे जेवणानंतर बायाही तोंडावर पदर घेऊन डारडूर झोपी जातात.
           दिवस कलायला लागतो. दगडाची चूल करून त्यावर बाया खापराच्या लोटक्यात दूध-शेवयाचं आधण ठेवतात. आजूबाजूच्या काटक्या, शेण्यावर चूल पेटते. धुपू लागते. धूर पसरतो. आधण उतू जातं. ज्या दिशेला उतू गेलं तिकडचा शिवार पुढच्यासाली जास्त पिकणार असं मानलं जातं.
      सांजच्यापारी गाडी जुंपली जाते. आवराआवर होते. पसारा गाडीत भरला जातो. धुराळा उडवत सोनेरी प्रकाशात गाडी गावच्या वाटेला लागते. शेतकरी हेंडगा फिरवण्यासाठी मागे शेतातच थांबतो. पिकाला ऊब भेटावी म्हणून पेटता हेंडगा सावळ्या रानात फिरवून, घरी न येता थेट मारूतीच्या देवळापुढं हेंडगे आणून टाकले जातात.  लहानगे त्या जाळावर ऊसं भाजतात. भाजलेले ऊसं मारूतीच्या पारावर ‘बजरंग बली की जय!’ म्हणत फटाफट फोडले जातात. मग ते ऊस घरी घेऊन आल्यावर येळवस संपते. असं म्हणतात की; येळवशीपासून रानातली थंडी गावात येते.