बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

आटलेल्या पावसाची फाटलेल्या शेताची कविता




-केशव सखाराम देशमुख

   शेतकऱ्यांच्या लेकरांना कविता लिहायचा ‘सराव’ करावा लागत नाही. शब्दांच्या बुडबुड्याशी खेळून कवितांचे छूमंतर करण्याचा नाद मग जडत नाही. खरे म्हणजे, कविता उदंड झाली. ऊठसूट, जो तो उठतो तो कविताच लिहितो.

     शेती म्हणजे आतबट्ट्यांचा धंदा! व्यथा पुष्कळ. कथाही पुष्कळ. पावलोपावली होरपळ. शेतीच्या धंद्यात पडणं म्हणजे होरपळीची हमी. होलपटीचे वाटेकरी. दुष्काळाशी सामना आणि शोषणाचे कायम मानकरी! अशा दुष्कृत्याची कारूणिक व्यथा शेतकऱ्यांची ‘कवी’ झालेली लेकरं मांडत आहेत. प्रमोद कमलाकर माने हे असंच कवितेमधलं गुणी लेकरू आहे!!

   ‘कोरडवाहू’ शीर्षकाचा प्रमोदचा ६४ पानांचा प्रामाणिक अनुभवांनी व्यापलेला आणि शेतकऱ्यांची पावसाबिगर सुरू असणारी कुत्तरओढ मांडणारा हा कवितासंग्रह आहे.

     प्रमोदची आरंभीची पावलं या त्याच्या कवितेत उमटतात. रचनेचा त्याला फारसा सराव नाही. साधेपणाचे लावण्य लेवूनच तो कविता लिहितो. त्याच्या कवितेच्या जन्मकळा पुष्कळ इमानी आहेत. अनुभव घट्ट मांडण्यात तो कमी पडतो. तरीही; कविता लिहिताना विषयांची उसनेगिरी वा उचलेगिरी करायचे त्याला काम पडत नाही. जगणे व भोगणे हे प्रमोदच्या कवितेचे प्रमुख मैदान आहे! भुकेच्या अवकळा हा त्याच्या कवितेचा प्रांत ठरतो. जमिनीच्या भेगा व न बरसणारे ढग: हे प्रमोदच्या कवितेची निर्मितीप्रक्रिया होय. प्रमोदला दुःखातून फुटून व्यक्त झाल्याशिवाय आनंद मिळत नाही.

     ‘रवंथ’ या कवितेत दुष्काळ आणि ढोरवासरांच्या दैना प्रमोदने नेमक्या शब्दांतून मांडल्यात. कुणब्याच्या घरातली गरीबी ‘बळीराजा’ कवितेतून मुखरीत होते. उपासमारी व अवहेलनेचे करूण चित्र ‘दुस्काळ’ कवितेतून उमटते. ‘रंगारी’ या कवितेतून अवर्षण आणि शेतीपाणीवर गुदरलेले संकट फार प्रभावीपणे येते. ‘जुवाखाली’ कवितेत शिवाराची सावली, लक्ष्मी असलेल्या बैलांचे शब्दचित्र आले आहे. ‘कुठवर’ या कवितेत गरीबीचे दाह सोसून आकार पावणारे बंड येते!! थोडक्यात काय तर, ‘कोरडवाहू’ कविता ही करपलेल्या शिवारांची आणि होरपळलेल्या कष्टकऱ्यांची कविता आहे. या अवघ्या होरपळीचा प्रमोद हा कवी साक्षीदार आहे.  ही अवघी कविता लिहिताना प्रमोदला कुणाची नक्कल करावी लागत नाही. त्याला कवितांचे क्षेत्र शोधावे लागत नाही. जगणे, भोगणे,  आठवणे आणि  लिहिणे ही क्रियापदं प्रमोदच्या कवितेची उगमांची स्थळे आहेत.

गझल

  गझल ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आ...