बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

नांदून केलं नाव

माझ्या आईच माहेर गावातलंच. तिचं घर भजनाचा वाडा म्हणून ओळखलं जातं. तिच्या ढेळजंला दररोज रात्री पंचपदीचं भजन व्हायचं. तिचे वडील हरिभाऊ हे मृदंग वाजवायचे. प्रसंगी कमरेला पंचा बांधून कीर्तनही करायचे. तिचे चुलते रामभाऊ हे उत्कृष्ट गायक. प्रचंड पाठांतर. माझ्या आजोळच्या घरासमोरच सप्ता व्हायचा. आईचं नाव चमाबाई. ती थोरली. तिला दोन बहिणी, दोन भाऊ. मी माझ्या आजीला पाहिलं नाही. आईच्या लग्नाआधीच ती वारली. ती अतिशय सुंदर होती. नाकेली आणि गोरीपान होती, असं आई सांगते. आमच्या शेजारचं 'व्हंताळ' हे आजीचं माहेर. आजी कॅन्सरनं गेली. तिच्या थानाला गाठ आली होती. आपरेशन करून एक थान काढून टाकला होता. आईच्या लग्नाची सगळी तयारी आजीनं करून ठेवली होती. घरचा खपली-गहू, दाळी इ.तिनं कनगी, गुम्मे भरून लिपन लावून ठेवले होते, असं आई सांगते.
   आमचं वडिलांचं घरही वारकरी. आजोबा, वडील, चुलते तिच्या घरी भजनाला जायचे. आजी आमच्या वडिलांना (भाऊंना) जावईबापू म्हणायची. आज्याला मळा-माळ- बरड अशी  तीस एकर शेती होती. त्यातली सोळा एकर पुढे एमआयडीसीत गेली. असो. शेताला बघून आणि पोरगं वारकरी म्हणून माझ्या आईच माहेर गावातलंच. तिचं घर भजनाचा वाडा म्हणून ओळखलं जातं. तिच्या ढेळजंला दररोज रात्री पंचपदीचं भजन व्हायचं. तिचे वडील हरिभाऊ हे मृदंग वाजवायचे. प्रसंगी कमरेला पंचा बांधून कीर्तनही करायचे. तिचे चुलते रामभाऊ हे उत्कृष्ट गायक. प्रचंड पाठांतर. माझ्या आजोळच्या घरासमोरच सप्ता व्हायचा. आईच नाव चमाबाई. ती थोरली. तिला दोन बहिणी, दोन भाऊ. मी माझ्या आजीला पाहिलं नाही. आईच्या लग्नाआधीच ती वारली. ती अतिशय सुंदर होती नाकेली आणि गोरीपान होती, असं आई सांगते. आमच्या शेजारचे व्हंताळ हे आजीचं माहेर. आजी कॅन्सरनं गेली. तिच्या थानाला गाठ आली होती. आपरेशन करून एक थान काढून टाकला होता. आईच्या लग्नाची सगळी तयारी आजीने करून ठेवली होती. घरचा खपली-गहू, डाळी इ. तिनं कनगी गुम्मे भरून लिपण लावून ठेवले होते, असं आई सांगते.
  आमच्या वडिलांचं घर वारकरी. आजोबा, वडील, चुलते तिच्या घरी भजनाला जायचे. आजी आमच्या वडिलांना (भाऊंना) जावईबापू म्हणायची. आज्याला मळा-माळ-बरड अशी तीस एकर शेती होती. त्यातली सोळा एकर पुढे एमआयडीसीत गेली. असो. शेताला बघून आणि पोरगं वारकरी म्हणून आमच्या घरी आईला द्यावं, असं आजीला वाटायचं. पण कधीकधी इथं द्यायला तिला नकोही वाटायचं. एवढी शेती असूनही हे लोक जवारीसाठी पिशवी घेऊन हिंडतेत. लई गरीबी हाय म्हणून ती विचार झटकून टाकायची.
    आईला मुरूमचं स्थळ सांगून आलं होतं. आजोबा पाहुण्यांकडे निघाले होते. पण त्यांना कीर्तनकार महाराजांनी अडवलं. कमलाकर चांगला आहे. शेत चांगलं आहे.आज ना उद्या गरीबी हाटंल. पोराच्या वाट्याला दहा एकर शेत येतंय, असं म्हणून आजोबांची समजूत काढली. इकडच्या आज्यालाही महाराजांनी थाटवलं. अन एकोणेऐंशीच्या मार्च महिन्यात दारातल्या सप्त्याच्या मांडवातच आई-भाऊंचं लगीन झालं.
  माय गेल्यावर आई खूप खचली होती. सतत आजारी पडायची. तिच्या चुलतीनं तिला सावरलं होतं. आईचं लग्न होईपर्यंत आईच त्या घरची माय झाली होती. आजोबांनी आईला व तिच्या भावंडांना कधीच शेतातली काम लावली नाहीत. खाऊन-पिऊन सुखी असं घर होतं. प्रसंगी आजोबांनी पिठाच्या गिरणीवर, खताच्या दुकानात काम केली. पण लेकरांना सुखात ठेवले. पण आजोबांमध्ये एक अवगुण होता. ते फारच तर्कटी व हेक्काडी होते. थोडं जरी मनासारखं नाही झालं तरी ते ताट भिरकावून द्यायचे. अबोला धरायचे. आठ-आठ दिवस जेवायचे नाहीत. या स्वभावामुळे आईसकट सगळे त्यांना खूपच घाबरायचे.
      लग्न होऊन आई खोपटवजा घरात आली तेव्हा लग्नाच्या दोन नणंदा, दोन दीर होते. दोन नणंदा लग्न होऊन गेलेल्या. सात-आठ माणसांच्या खटल्यात ती दाखल झाली.
     आईला पांढऱ्या मातीची अॅलर्जी होती. तिला सतत खोकला यायचा. भाऊंना हे लग्नाआधी माहीत होतं तरी त्यांनी या 'खोकल्याम्माला' स्वीकारलं होतं. आम्ही मुलं भाऊंना चिडवतो 'तुमचं आईवर प्रेम होतं का नाही? खरं सांगा!' म्हटल्यावर ते खुलतात. मान्य करतात. तिच्याचसाठी भजनाला जायचो म्हणतात. आईही लाजून हसते. 'व्हय! खरं वाटलं बघा. लेकरावाला उगू कायबी सांगनूका. मी तर तुमाला बगायलाबी नव्हते.'  म्हणते.
 मग भाऊ छेडतात, 'चोरून बघत नव्हतीस का? तुझ्या मायला, खरं सांग.' आम्ही पोट धरुधरु हसू लागतो.
   आईचं सासरमध्ये खूप शोषण झालं. आजी तिला पहाटे चान्नी निघायला उठवायची. अन स्वतः पुन्हा झोपायची. तिला मोठा वाडा, जनावराचा वाडा झाडून, शेण काढून, दुरडीभर भाकरी बडवून, धुणं-भांडे करूनच शेताकड कामाला जावं लागे. वडील पहाटेच बैलं सोडून माळाला जायचे. पुन्हा घरी आलं की, स्वयंपाकपानी, चूलपोतरा.... त्यात आत्यांची खोचक बोलणी. आजी चुलत्यांचा लाड करायची. 'त्येंचे लेकरं का बाळं? तुमी दोघंच काम करावं लागतंय.' म्हणायची.
   आईला काम सोसायचं पण बोलणं सोसायचं नाही. आजही तिचा हाच स्वभाव आहे. घालून-पाडून बोलल्यावर ती जीव द्यायला तळ्याकडे धावत गेली होती. आजी मागं पळत गेली. 'आगंs परमुद्या... परमुद्या... रडलालंय. दूद पाजीव. फिर म्हागारी.'  एवढंच कसं तिच्या कानावर पडलं की? ती थबकली आणि पुलावरून धावत माघारी आली. आई हे खूप रंगवून सांगते.
      खोकला लागला की आईला माहेरी लावून द्यायचे. कारण दवाखान्याला न्यायची ह्या घराची ऐपत नव्हती. तिकडचे आजोबा तिला घेऊन फिरायचे पण गुण यायचा नाही. शेवटी त्यांनी जुजबी ओळखीमुळे डॉ. होगाडे यांच्याकडे सोलापूरला नेले. त्यांनी आईला इंजेक्शनचा कोर्स दिला. रात्ररात्र खोकून तिचा आवाज बसायचा. हे चार-पाच इंजेक्शन दिल्यावर खोकला हळूहळू कमी व्हायचा. नंतर कळले की ते पेनिसिलिन सारखे घातक स्टेरॉईड होते. तिच्या ओठात मुंग्या यायच्या. डोळ्यावर झापड यायची आणि पुढे कामांचा डोंगर! पुढे आजोबाच हे इंजेक्शन विकत घेऊन गावातल्या काही काळ कंपाउंडरकी केलेल्या गुंडूमामाला द्यायला लावायचे. मरताना आजोबांनी गुंडूमामाला बोलावून सांगितलं होतं की, 'माझ्या माघारी तुझ्या बहिणीला तूच वाचून शकतोस. तिच्याकडून एक रुपयाचीही अपेक्षा करू नको.' असं वचन घेऊन दहा व्हायल त्यांच्याकडे दिल्या होत्या. गुंडूमामांनी ते जिवंत असेपर्यंत हे वचन पाळले. त्यांची बायको आईला दाळ-जवारी मागायची. आई गुंडूमामाला कळू न देता तिला धान्य द्यायची.
   तर ह्या खोकल्यानं, कामाच्या रगाड्यानं आधीच लहानखुरी असलेली आई अगदीच काटकुळी दिसायची. तिचे गालफडं बसलेले. वडील शेतात राबून असेच गालफडं बसलेले. पण त्यांचा मूळ बांधा मध्यम व सशक्त आहे. आईची मला फार कीव यायची. तिला आम्ही तीन लेकरं. मी थोरला. पाठीवर भाऊ. मग बहिण. माझे पितृघराने खूप लाड केले. माझ्या लाडाइतकाच आईचा दुस्वास केला. दमेली, रोगेल अशा शब्दांनीच तिचा उल्लेख व्हायचा. आम्हा भावंडासमोरही. आईने साधी भांडी आपटली तरी सगळे भाऊंपुढे किरकिर करत. मग भाऊ वैतागून तिला जनावरासारखं मारायचे. घरच्या जिव्हारी लागणाऱ्या बोलण्याला वैतागून आई मला जनावरासारखं मारायची. इकडचे आजोबा (आप्पा) म्हणजे देवमाणूस. ते माझी आईच्या तावडीतून सुटका करत. 'चमी, जीव घेतीस का लेकराचा?  सोड नाहीतर काठीच घालीन पाठीत.' असं आप्पांनी म्हटल्यावर मी रडत असतानाही मला आनंदानं हसू यायचं. असा सगळा देखावा.
       माझ्या भावाच्या जन्मानंतर खूपच बंडाळ सुरू झाली.एका आत्याचं लग्न झालेलं. लेकराला दुधही मिळेना. आईचा जीव अर्धाअर्धा व्हायचा. मग आईने भीतभीत 'मी कामाला जाऊ का?' असं भाऊंना विचारलं भाऊ भडकले. "इज्जत घालवायचाय का घराची? आज्याबात जायचं नाही.' असं म्हणून तिला गप्प केलं. तरी ती न जुमानता एके दिवशी आयाबायांसोबत कामाला गेलीच. बाप  बिघडून बसला. घरात येऊ नको वगैरे रामायण झालं. हळूहळू विरोध मावळत गेला. टोमणे खात आई काम करून घर भागवू लागली. शेतमालक आईला कामाला आलेली बघून हळहळायचे, 'आरेआरे! चांगल्या घरचं लेकरू हाय. बापानं ऊन बघू दिलनी. येतंय का बाई तुला काम?' म्हणायचे. आईनं आम्हा लेकरांसाठी मान-अपमान सोडून दिला. मी शिकून मला नोकरी लागेपर्यंत आईची मजुरी सुरूच राहिली. घरालाही सवय झाली.
        आई केटी बंधाऱ्याच्या कामावर होती. मी आठवीत असेन. आत्याकडे शिकायला होतो. सुट्टीत गावाकड आलतो. तिची भाकर घेऊन गेलो. गाळाचे जड टोपले उचलून वरच्या बाईकडे द्यायचं तिचं काम. तेही अवघड, ओल्या निसरड्या जागेत उभारून. खोकत-खोकत तिचं काम सुरू.  ओझ्यानं पोटातली गाठ सरकून तिला परसाकड लागलेली. अधून-मधून परसाकडला जात काम करत होती. तिच्या मैत्रिणी तिची अवस्था बघून स्वतः अवघड जागेत थांबून तिला सोप्या जागेत थांबवायच्या. मला बघून तिच्या केविलवाण्या डोळ्यात आनंद. मला माझीच लाज वाटली. नंतर आई आणि भाऊ दोघंही वीटभट्टीच्या कामावर जाऊ लागले. भाऊंची मजुरीची ती पहिलीच वेळ. आधी कुळवून पेरून द्यायचे. भाडे मारायचे. पण दुष्काळी परिस्थितीने ते दोघे एक झाले. पुढे भाऊ विहीर फोडायच्या कामावरही गेले. बहात्तरच्या दुष्काळात भाऊंनी काम केले होते. खूप वर्षांनी त्यांना ही वेळ आली पण आई रूळून गेली होती. आईचं कामावरून कौतुक केलं की भाऊंना राग येतो. त्यांचा स्वाभिमान दुखावतो. 'मीबी लई काम केलाव गा! काम करून माझे हाडं कुट्ट झालते.' असं म्हणतात.
      आईनं कितीही मारलं तरी मला तिचा कधीच राग आला नाही. ती कामाला गेल्यावर तिच्या मागे कूट खाणाऱ्या घरातल्यांचा यायचा. आप्पा सोडून.
    ती निरक्षर आहे तरी तिला पैशांचा हिशेब जमतो. घड्याळातली वेळ जवळपास ओळखते. आता तर मोबाईलही वापरते. तिचा गळा गोड आहे. बुद्धी तल्लख आहे. मी म्हणतो, 'तू शिकली असतीस तर निदान मास्तरीन तर झाली असतीस.'  ती खूश होते. भाऊ हुशार आहेत. दोघांची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्या स्मरणाधारे त्यांच्या जुन्या उखाळ्यापाखाळ्या निघतात. भांडण पेटते. आम्ही मजा घेतो. घरात तीन नोकरदार आहेत. भाऊंना त्यांच्या गेलेल्या शेताचे पैसे आलेत. तिची हाऊस आता तेच फेडतात.
     बाप मेल्यावर माहेर तुटलं. एक जीव लावणारा नागूमामा त्याच्या लग्नाआधीच करेंट लागून मेला. माय, भाऊ, बाप मेल्याचं दु:ख तिनं पेललं. आता एक भाऊ आहे पण नावालाच. कोरडा. माया नाही. तरी आई बळंनच जाऊन त्याला राखी बांधून येते. कुठलीही अपेक्षा ठेवत नाही. नणंदांची बाळंतपणं केली. सासू पडून असताना तीन वर्षे तिची सेवा केली. हगणं-मुतणं-आंघोळ-खाऊ घालणं सारं केलं. राग ठेवला नाही. सासऱ्याची अशीच तीन वर्षे सेवा केली. घर-शेत-मजूरी करत हे सारं केलं. आता म्हणते, 'त्येंचाच अशीर्वाद हाय. मनून माझं समदं चांगलं झालं.'
       तिला खोटेपणाची भयंकर चीड आहे. कुणी खोटेपणा केला की, ती शिव्याश्राप द्यायची. म्हणून तिला बरेचजण वचकून असत. समदं गाव तिचं कौतुक करतं. 'लई खट्टे खाल्ल्याय. तिला संबाळा.' असं कुणीबी म्हणतं.
 'आशिलाचं होतं म्हून
नांदून केलं नाव
माय नवाजतं तुला
सारं जकेकूर गाव'
     आजीही मूळची वाईट नव्हती पन कानानं जरा हलकी होती, असं ती सांगते. मी नोकरीला लागल्यावर तिची मजुरी बंद केली. चुलते आधीच वायलं निघाले होते. घरच्या शेतात ती अजूनही राबते. मी रागावलो की म्हणते, 'काम केल्यावरच आन गोड लागतंय. काम केल्यानं मरतनी. आंग हाळू होतंय.'  तिचा खोकला वेळच्या वेळी आधुनिक उपचार केल्याने कमी होतो. तरी ती अधूनमधून येतो. मी विचारल्यावर म्हणते, 'पैलंसरका तर नाही की! रातरात झोपू द्यायचा नाही.'
      मी नोकरीला लागल्यामुळे भाऊही शिकून नोकरीला लागला. सगळ्यांची लग्नं झाली. घर सावरलं. सुनाही समजूतदार आहेत. तिला समजून घेतात. काळजी घेतात. गावाकड भाऊ, धाकटा ल्योक, सून, नातू यात ती रमून गेलीय. मी नोकरीनिमित्त जरा दूरच्या गावी राहतो....
      गावाकडून शेवटची बस येते. चौकातल्या हाटेलाच्या बाकड्यावर बसून वेड्यासारखं मी उतरणारे प्रवासी निरखीत राहतो. उतरणार्‍या बायांमध्ये आई दिसल्याचा भास होतो. ती येईल अचानक न सांगता. सप्राईज देण्यासाठी. असं वाटत राहतं. पण आईसारखी दिसणारी बाई उतरून वेगळ्याच दिशेनं चालू लागते.             
    गेल्या खेपेला ती अशीच आली होती. पाट फुटून वाहणाऱ्या पाण्यासारखं. दावं तोडून येवं गाईनं तशी आली. 'नातीला बघू वाटलालतं म्हणून आलेव.'  म्हणाली. आनंदलो. दोन दिवस घरात सणासारखं गजगज वाटलं. ती बाहेर गेली असताना पोरीला म्हणालो, 'आज्जी गेली गावाकड.' दोन वर्षांची लेक धावत आतल्या खोलीत गेली. तिची अडकवलेली पिशवी बघून पळत येऊन मला म्हणाली, 'आज्जी गेलनी... आज्जीची पिशवी हाय तित्तं.'
     तिचं मन दोनचार दिवसात उच्चाट खातं. खळेदळे, कामंधामं उरकते. येईन पुन्हा अजून चार दिवस म्हणून ती जाते. पण काय खरं नसतं. आतल्या खोलीतल्या मोळ्याला आता तिची पिशवी नसते पण लेक रोज तिच्याचविषयी बोलत राहते.
                   ---------------------------

 पूर्वप्रकाशित- वाघूर 2017  (दिवाळीअंक) आभार: नामदेव कोळी
चित्र साभार: श्रीधर अंभोरे.

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

अनिकेत पाहुणे



 आम्हाला तिसरीला 'वासुदेव' ही कविता होती.
  'मोरपिसांचा टोप घालुनी
   टिल्लिम टिल्लिम टाळ वाजवित
   वासुदेव आला...
   मुखी हरीचे नाम गर्जितो...
   प्रभातकाळी थयथय नाचत स्वारी आली' अशा काही ओळी आठवतात. माझ्या बालपणीही वासुदेव कधीतरीच यायचा. उशीरा उठायचो त्यामुळे त्याची गाठ पडायची नाही. एकदा तो योग आलाच. मग मीही लहान टाळ एका हाताला त्याच्यासारखं गुंडाळून, डोक्यावर टोपी घालून घरी नक्कल करू लागलो. अभंग तर हुबेहूब त्याच्याच ठेक्यात म्हणायचो. कौतुक करून घ्यायचो.
      मरगम्मा (कडकलक्ष्मी) आणि पोतराजांची खूप भीती वाटायची. आत लपून बसायचो. मरगम्माच्या ढोलकीचं गुरगुंsपांग  गुरगुंsपांग ऐकू आलं की पोटात भीतीनं गोळा यायचा, आणि तो आवाज आपल्याच पोटातून येतोय असं वाटायचं. पोतराजाचं चाबकानं स्वतःवर आसूड ओढणं आणि त्याच्या पायातल्या घुंगरांचा आवाज भयानक वाटायचा.
     मसणजोग्यांनाही खूप भ्यायचो. त्यांचा रंगीबेरंगी विचित्र पोषाख, हळदी कुंकवाच्या रेघोट्या ओढलेला भेसूर चेहरा. एका हातात काठी, एका हातात घंटा आणि काखेत झोळी असा अवतार! गावातली कुत्री यांना पाहून जोरजोराने भुंकत. काठी त्यासाठीच घेत असावेत. कुणीतरी सांगितलेलं की, मसणजोगी मंत्र मारून लहान मुलांना चिमणी किंवा कावळा करून झोळीत घालून घेऊन जातात. मग काय? घाबरगुंडी. नुसतं बघायलाही भ्यायचो. त्याच्या नजरेस पडू नये म्हणून आत सांदाडीला जाऊन बसायचो.
   पोपटवाले जोशी भविष्य सांगताना फार चटपटी बोलायचे. बाया तर फार लवकर यांच्यावर विश्वास ठेवायच्या.
  'तुझं मन लई मोठं हाय माय. मनानं लई चांगली हाईस. तुजं मन कळनाऱ्यालाच कळतं. दुसऱ्यासाटी तू लई करतीस पन तुजी कदर कुनालाच नाही. तुज्या हातचं मीट आळनी हाय माय' त्यानं असं म्हणलं की, बाया पदर डोळ्याला लावत.
 'खरं हाय बाबा' म्हणून पसापायली धान्य जास्तच वाढायच्या. हे जोशी मनकवडे असतात. त्यांना आपल्या मनातलं सम्दं कळतंय, असं बोललं जायचं. 'तुला तीन पोरं आनी दोन पोरी हायत' असं परफेक्ट सांगून ते थक्क करीत. एका जोश्यानं भविष्य सांगत सांगत आमच्या वडलांना 'तू तुजं रगत तुज्या डोळ्यानं बगून मरनार हायस' असं म्हटल्यामुळे वडील कुठं गावाला गेले की, माझ्या मनात   काहूर दाटून येई.
 काळा कोटवाले जोशी सनई फार छान वाजवित. ऐकत रहावंसं वाटे.
   गावात नंदीवाला आला की, आम्ही पोरं त्याच्या मागे गावभर फिरायचो. यामागे उत्सुकती अशी की, नंदीबैल गुबूगुबू मान हलवून सगळ्यांनाच होकार देतो की नाहीही म्हणतो, ते बघावं. असे दोन नंदीसारखे भव्य बैल आपल्याही शेतात असावेत असं वाटायचं.
   दरवेशीही वर्षातून एकदा न चुकता गावात यायचा. त्याचं ते केसाळ अस्वल तो सांगेल तसं वागताना पाहून त्याच्या धाडसाचं कौतुक वाटे. आजी दरवेशाला सूप भरून जवारी वाढायची. त्याचं अस्वलाची वेसण खेचणं, कायम दंडुक्यानं मारणं बघून अस्वलाची दया यायची. आजी दरवेशाकडून पेटी घेऊन आमच्या गळ्यात बांधायची. या बारक्या पेटीत दरवेशी अस्वलाचे केस मंतरून घालतो. त्यामुळे भीती वाटत नाही. भूतबाधा होत नाही. अशी लोकांची भाबडी कल्पना.
   गावात येणारे आणखी एक डेंजर पाहुणे म्हणजे गारूडी. आम्ही त्यांना सरपवाले म्हणतो. वेताच्या टोपलीतला साप बघून काळजाचा ठोका चुकायचा.
   बालपणी कशाकशाला भ्यायचो हे आठवून हसू येतं. पोलीसांना बघून आम्ही गांडीला पाय लावून पसार व्हायचो. ते पोलीस म्हणजे राईंदर! हे पोलीस हसवतात हे कळल्यावर त्यांचं बोलणं ऐकायला मज्जा येऊ लागली.
 'हं! चला काकू लग्नाला चला
  लेकरं बांधा खुट्टीला
   कुत्रे घ्या काखंला
चला चला लग्नाला चला'
  'कुटं हाय सायेब लगीन?' असं कुणी विचारलं की,
'खाली गेल्यावर वरीच हाय. एक्कावन वाजून बावन मिंटाला आक्षता हायत्या. नवरा नांदायला जायला नगं मनून रडलाला, पळून चालला तर गोळ्या घालायला हे पिस्तूल आनलाव.' असं काहीबाही  बोलून, घराबाराला हसवून, मूठपसा घेऊन हा राईंदर नावाचा खोटा पोलीस झोळीचं ओझं पेलत, काठी आपटत निघून जाई. दुसरीकडे आणि वेगळंच काहीतरी बोलून हसवत फिरत राही. विनोदाची चांगली जाण आणि हजरजवाबीपणा हे त्याचे विशेष गुण. आता टिव्हीवर विनोदी कार्यक्रमात विनोद करण्यासाठी साडी नेस, मुलीचा ड्रेस घाल असे कितीतरी सायास केले जातात तरी हसू येत नाही. राईंदर संवादातून विनोदाची पखरण करायचा.
   'सूयाsपिनाs केसाsवरsयss' अशी बोहारणींची विशिष्ट लयीतली आरोळी ऐकू आली की, आमची तायडी पळत येऊन आईला सांगायची. मग आई खिळपटात जमा केलेले केस देऊन टिकल्या, पिना इ. घ्यायची. मुलींनाच यात इंटरेस्ट! माझं लक्ष त्यांच्या पाठीला बांधलेल्या झोळीतल्या टुळटुळ बघणाऱ्या लेकरांकडे जायचं. आई त्यांना भाकरी कालवण खायला द्यायची. तिथंच खाऊन गटगट पाणी पिऊन या बाया पुढे जायच्या.
   गावात कधीकधी डोंबारी यायचे. ढोल वाजवणं, तारेवर चालणं, उलट्या उड्या मारणं. जाळ लावलेल्या गोल तारेतून माकड्याच्या उड्या मारणं, रचलेल्या बाटल्यांवर उभं राहणं, उभी मातीतली सुई पापण्यांनी उचलणं, केसांनी गाडी ओढणं अशा अचाट कसरती डोळे विस्फारून टाळ्या पिटत बघताना भान हरपून जाई. त्यांना काहीतरी द्यावं असं खूप वाटायचं पण चड्डीच्या खिशात पाच पैसेही नसायचे. फुकट खेळ बघून अपराधी मनानंच घरी परतायचो.
   दारावरच्या एका पाहुण्याला आमच्या घरी खूप मान होता. ते म्हणजे दत्तसंप्रदायी भगवी कफनी आणि हातात शेर घेऊन भिक्षा मागणारे संन्यासी. त्यांनी घरी बोलावून आजी चहा पाजायची. काही महाराज घरोघरी नावानं हाका मारायचे.
  ' कुठं गेले बाबाराव? आहेत का? ' म्हणतच दारात प्रकटायचे.
   झाडावर झोपणारा पांगूळ वगैरे मी बघितले नाहीत. ते आमच्याही पिढीआधीच अस्तंगत झाले. घिसाडी रबरी फुग्याचा भाता लावायचे. घिसाडणी कोळसा मागायला यायच्या. फासा खुरपे शेवटून द्यायचे. फुटके टोपले, घागरी नीट करून द्यायचे. घिसाडी, फासेपारधी यांची पालं तर आमच्या शाळेमागच्या मैदानातच पडायचे. त्यांचं पालातलं ऊन-वारा-पावसातलं जगणं बघून गरिबीतही आपण खूप सुखी आहोत, असं मनोमन वाटायचं. पालात चितरं, होले हीच मेजवानी असायची. मासाचे तुकडे उन्हात वाळत घातलेले असायचे. भूकेची बेगमी करून ठेवत.
   साच्यात मूर्त्या करून देणारे, गाढवावर दगडी खलबत्ते, उखळ विकणारे, लाकडी रव्या, चाटू, मुसळ करून देणारे, चिंध्यांचे दोर वळून देणारे, कात्री-विळा-खुरप्याला धार लावून देणारे, सुटकेस घेऊन मोती विकत फिरणारे मोतीवाले, एक हात कमरेवर ठेवून त्यावर चादरी-सतरंज्याचा भार पेलत विकणारे, तेलाच्या डब्याच्या कोठ्या तयार करून देणारे, स्टो रिपेरीवाले, असे कितीतरी फिरस्ते यायचे.
      मेंढ्यांचे कळप घेऊन धनगर यायचे. त्यांच्या बायका तीन दगडांच्या चुलीवर पातळ भाकरी सराईपणे करायच्या. खतासाठी रानात मेंढ्या बसवल्या जायच्या. धनगर किराना मालासाठी गावात यायचे. कैकाडी दुरड्या, सुपं, डाली आणायचे.
   असे अनेक अनिकेत पाहुणे वर्षानुवर्षे ठरलेल्या काळात न चुकता यायचे. गावोगावी त्यांच्या ओळखीही असायच्या. जुने लोक मायाळू होते. पसापायली द्यायला हात अखडत नसत. आता चुकून एखादा फिरस्ता मागायला आला तर अक्षरशः त्याला हाकलून दिले जाते. थोड्याफार भटक्या-विमुक्त जातीही आता स्थिरावल्या आहेत. त्यांच्यातही आता शिक्षणामुळे थोडीबहुत प्रगती झालीय. पण जी गावं त्यांना आधार द्यायची, तीच गावं आतून बकाल झाली आहेत. शेतकरी पार भिकेला लागलाय.
( फोटो: सौजन्य इंटरनेट)

गझल

  गझल ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आ...