शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

येस्टी

येस्टीत बसलो की लगेच झोप लागायची. बाळ होऊन पाळण्यात झोपायचो. आता डोळे खिडकीशी टक्क उघडे. येस्टीत काय चाललंय याकडे पूर्ण दुर्लक्ष. कंडक्टरने हटकल्यावर तेवढं तिकीट घ्यायचं.
   डोक्यात भिरभिरणारे असंख्य विचार. ब्याकग्राउंडला खिडक्यांचा खडखडाट, इंजीनचा, गियरचा लयबद्ध आवाज. त्यात मिसळलेला लोकांच्या बोलण्याचा, भांडणांचा हेलकावे खाणारा आवाज.
   ओळखीचीच चित्रपट्टी डोळ्यांसमोरून सरकतेय. फक्त या चित्रांमध्ये थोडेसे बदल झालेत. म्हणजे पूर्वी नांगरलेल्या रानांमध्ये आता भरगच्च हिरवं पीक आहे. काही दिवसांनी पुन्हा हा रंग बदललेला दिसेल. पिवळसर छटा दिसतील. पुन्हा काही दिवसांनी ही चित्रपट्टी काळसर दिसेल.
    आपलं लक्ष खरंतर या दृश्यांवरही नाही.
आजिबात एकांत मिळालाय. कायकाय आठवत राहतं रँडमली. आपण त्या जुन्या, कालपरवाच्या आठवणी उगीच कशाकशाशी जोडतोय. त्यात तेव्हा करता न आलेल्या, विसरलेल्या गोष्टी एडिट करत राहतो. मुकपणे स्वतःशी बडबडत राहतो आपण. मध्येच एखादी चमकदार ओळ येते ओठांवर. कोट करावी अशी. अशा कितीतरी ओळी आपण सोडून दिलेल्या. जे सोडावं वाटतंय ते हात धुवून पाठीमागे लागलेलं(व्हाईसव्हर्सा)
   खूप वेळाने लक्षात येतं की आपल्या शेजारी
एक सुंदर स्त्री बसलीय. आपण चोपून बसतो. तिच्या मांडीवरचं बाळ तर खूपच सुंदर आहे. ही आपलीच बायको आणि लेकरूही आपलंच. तिला माहीतंय म्हणूनच तिनं डिस्टर्ब केलं नाही. इतकं पुरेसंय आपल्यासाठी. मी तिच्या मांडीवर झोपलेल्या बाळाकडे पाहतोय. यस्टीत बसल्यावर पाळण्यात घातल्यासारखं वाटून झोपी गेलंय...
 ( फोटो सौजन्य: इंटरनेट)

रविवार, २४ डिसेंबर, २०१७

इंधन : समृद्ध करणारी कादंबरी

हमीद दलवाई यांच्या 'इंधन' या कादंबरीत कोकणातल्या तत्कालीन समाजजीवनाचे अतिशय कलात्मक आणि वास्तव चित्रण येते. स्वतःच्याच समाजातल्या वाईट प्रवृत्ती आणि चालीरितींच्या विरोधात नायक ठामपणे उभा राहतो; यातून लेखकाचं विवेकीपण अधोरेखित होतं.
     अनेकवेळा नायकाला गावाच्या बिघडलेल्या वातावरणात काहीच हस्तक्षेप करता येत नाही. नायक खूप वर्षांनी गावात आल्याने येतानाच एक अपराधीपणा मनात घेऊन येतो. नायकाने मधल्या काळातला आयुष्यकाल समाजसुधारणा आणि प्रबोधनाच्या चळवळीत घालवेला आहे. गावापासून तुटल्यानंतर गाव कुठल्याच गोष्टीत नायकाला आणि त्याच्या विचारांनाही स्वीकारत नाही. त्याच्या शब्दालाही किंमत देत नाही. स्वतःच्या समाजाचा तर नायकावर हा धर्म बुडवतोय म्हणून रागच आहे. वडील आणि भाऊ या घरातल्या व्यक्तींचाही या गोष्टींमुळे रागच आहे पण एकीकडे नायकाच्या प्रकृतीची काळजीही आहे.
     जीवनातल्या व गावातल्या घटनांवरून नायक नैतिक-अनैतिक संकल्पना, प्रेमभाव, वैर, इत्यादी अनेक मानवी भावभावनांविषयी अनेक अंगांनी विचार करत राहतो. स्वतःलाच तपासत जातो.
      या कादंबरीत कोकणातला निसर्गही एक स्वतंत्र पात्र म्हणूनच येतो. निसर्गाची आणि भवतालाची लेखकाने सजगपणे सूक्ष्म दखल घेतली आहे.
     अनेक हादरवून टाकणाऱ्या घटनाक्रमानंतर नायक मुंबईला निघून जातो तरी त्याचे मन गावातच अडकून पडलेले आहे. गावातल्या भयानक घटनेनंतर गावात काय काय होईल याचा अंदाज नायक बांधत राहतो. पुढील घटनाक्रम तो जुळवत राहतो आणि गाव हळुहळू पूर्वपदावर कसे येत जाईल हे सांगत असतानाच ही कादंबरी संपते.
   भाषेचा योग्य वापर , मनाचा ठाव घेणारे निवेदन, कथावस्तूची कलात्मक बांधणी, निसर्गाचा पार्वभूमीसारखा वापर इत्यादी गोष्टींनी कादंबरी परिपूर्ण झाली आहे.
     या कादंबरीने मला खूप समृद्ध अनुभव दिला. जीवनाविषयीचे माझे आकलन वाढावयास मदत झाली. इतक्या उशीरा मला ही कादंबरी वाचायला मिळाली याची हळहळ वाटत आहे.

गझल

  गझल ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आ...