मंगळवार, १७ जुलै, २०१८

पाऊसझड

मला पाऊस आवडतो पण पावसाळ्यातली चिकचिक, चिखलराडा, ओंगळघाण आवडत नाही. जीव वैतागतो.
      उन्हाळ्यात अचानक अवकाळी पाऊस गाठतो. तापलेल्या मातीवर पडलेल्या पहिल्या सरींनी मातीला सुटलेला खमंग वास छाती भरून घ्यावासा वाटतो. अनेक फुलांचे, अत्तरांचे सुगंध घेतले पण पहिल्या पावसानं मातीला सुटलेला गंध सर्वांत श्रेष्ठ वाटतो.
    अवकाळी(वळवाचा) पाऊस, आषाढातला पाऊस, श्रावणातला पाऊस, भादातला पाऊस... किती वेगळेवेगळे...
   अवकाळी पाऊस मनाची मरगळ धुवून काढतो. मिरगाचा पाऊस मनात उल्हास, स्वप्नं पेरतो. झडीचा पाऊस अंतर्मुख करतो. अंगात आळस भरतो.
   पाऊस कधी नुसताच पहावा. कधी अंगभर गोंदून घ्यावा. पाऊस एकसारखा नसतो. तसं पावसाचे आवाजही एकसारखे नसतात. कोरड्या रानावर पडताना होणारा टपटप्....नंतर सडडड्...असा आवाज. पत्र्यावर पडताना होणारा हलगी वाजवल्यासारखा आवाज, पाऊस थांबल्यावर ओघळणाऱ्या थेंबांचा होणारा टिबुक...थिबुक असा आवाज. ओढ्यानाल्यातून वाहताना होणारा खळखळाट...
      पाऊस ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट करत येऊन दिपवून जातो. दहशतही घालतो. पाऊसच इंद्रधनुष्याची किमया करतो. इंद्रधनुष्य हा फारच पुस्तकी शब्द झाला. आम्ही त्याला धामीनकाठी म्हणायचो.
       दारापुढील वळचणीच्या सोन्याचांदीच्या धारा पुढं बोरकरांच्या कवितेत सापडल्या. उन्हात पाऊस आला की आम्ही कोल्ह्याचं लगीन लागलं म्हणून नाचायचो.
   ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा
   पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
 असं म्हणत अंगणात गिरक्या घेत आपण मोठे झालो.
     उन्हाळ्यात भरपूर आंबे खाऊन कोया उंकड्यावर टाकल्यामुळे पावसाळ्यात उकंड्यावर आंब्याची भरपूर रोपं यायची. कोवळी चाॅकलेटी पान असलेली रोपं उपसून खालच्या मऊ पडलेल्या कोया दगडावर घासून आम्ही त्याच्या पुंग्या करून वाजवत फिरायचो. गोगलगाईच्या चंदेरी रस्त्यांचा शोध घेत फिरायचो.
      पाऊस कधी पिकाला आंजारत गोंजारत येतो तर कधी पिकाला आडवं पडेपर्यंत तुडवतो.. प्रत्येक नक्षत्राचा पाऊस वेगळा...त्यानुसार म्हणीही तयार झाल्या.
 वानगीदाखल-
पडला हस्त तर कुणबी झाला मगरमस्त.
पडल्या चित्ती तर उतरतीला भीती.
पडतील सायीसाती तर पिकतील माणिकमोती.
पडल्या मघा तर चुलीपुढी हगा,
नाही पडल्या मघा तर आभाळाकड बघा.
    झडीचा पाऊस तर अंतच बघतो. झड लागल्यावर बाहेर कामच नसेल तर मज्जा वाटते. वाकळ पांघरून, पाय पोटात घेऊन पडून रहावं. चुलीवरच्या भुगण्यात चहाचं आधण ठेवलेलं असावं... पण असं होत नाही. झडीतच जास्त कामं निघतात. बाहेर पडावंच लागतं.. टपरीवच्या उकळणाऱ्या चहाचा सुगंध थेट नाकात घुसतो..
    जळण, गवऱ्या भिजल्यानं आईची चुल पेटायला सळायची. वल्ल्या गवरीनं धुपन होऊन घर धुरानं भरून जायचं. मोठ्या पावसातही न गळणारं घर भिजपावसात गळायचं. भिंतीना वलगरा चढून पोपडे पडायचे. दाराला पोत्याचं घोंगतं अडवलेलं असायचं. बाहेर जाणाऱ्याने ते पांघरून जायचं आणि बाहेर गेलेला येईपर्यंत बाकीच्यांनी त्याची वाट बघायचं. झडीत लघवीला जोर. चिखलात संडासला जायचं तर जीवावरच येई.
    झडीतही जनावरांना वैरणपाणी करायला बापाला शेतात जावंच लागायचं. बाप काकडून जायचा.
     बालपणी ढगाच्या गडगडाटाला मी घाबरायचो तेव्हा आजी म्हणायची, 'भिऊ नकू! आबाळात म्हातारी दळलाल्याय. तिच्या जात्याचा आवाज हाय.' मी विचार करायचो: म्हातारी दळत असेल तर खाली पीठ पडलं पाहिजे. मग पाणी कसं पडतंय? मग वाटायचं: म्हातारी बर्फाचे खडे दळत असेल. आज या गोष्टीचं हसू येतं.
       शेतातल्या कोट्यात जनावरांसोबत बसून शेणामूताचा वास घेत रानावरची झड बघण्यातला आनंदच निराळा...
      झडीत काॅलेजला जाताना वह्या शर्टखाली पोटात खुपसून जायचो. स्लीपरमुळे पाठीमागे पँटशर्टवर चिखलाचे शितोडे उडालेले असायचे.
         सहवासाने पाऊस संगीत वाटतो तर विरहात विद्ध करतो. छत्री नेल्यावर पाऊस येत नाही. विसरली की हमखास येतो. हे आधीच एका लेखकानं नोंदवून ठेवलंय. खरंय.
   पाऊस कधी बाजिंदा वाटतो. कधी हेक्काडी, कधी धटिंगन तर कधी अवचिंद वाटतो.
    पाऊस आवडतो तरी मी त्याच्या गुणदोषांसकट त्याला स्वीकारत नाही.

सोमवार, ९ जुलै, २०१८

गाव



गावात काय? गाव तो गाव. माझा गाव नक्की कुठून सुरू होतो, नक्की ठरवता येत नाही. गावाची वेस पडकी. हरेक गावच्या वेशी पडक्याच का? हे मला न सुटलेलं कोडं आहे. माझं गाव पांढऱ्या मातीचं म्हणून 'गावपांढरी'. (गावपंढरी नव्हे) आता आमचे गावकरी म्हणजे एक नंबर इर्रसाल! त्यांच्याच नजरेतून गावाची समीक्षा: 'ह्या पांढरीत कोण उबदऱ्या आलंय गा?' खरंच आमच्या गावात आजवर कोणीच वर आलं नाही. चुकून वर आला रे आला, थोड्या दिसातच पार रसातळाला गेलाच म्हणून समजा. पायली भरायला उशीरच लागतनी. असं ह्ये नंबरी खेक्कड गाव.
      माझं गाव एका लहानशा वळणदार नदीकाठी वसलंय. पण नदीला नावच नाही. अनेक नामकरण विधी होतात; पण नदीचं नामकरण करायला कुणीच तयार नाही. मीच नदीचं बारसं केलं: 'चंद्रगंगा' अजून हे नाव मी कुणालाच सांगितलं नाही. ही गोष्ट नदी आणि मी दोघातच आहे. का? बापरे! लोकांना हा प्रकार कळला तर तेच माझं 'येडं भास्कऱ्या' असं नामकरण करतील हो!
     माझा गाव अर्धा उमाटावर अर्धा गारीत वसलेला. वरली आळी. खाल्ली आळी अशी गल्ल्यांना नावं त्यामुळेच पडलीत. माझ्याही गावात बक्कळ देवळात बक्कळ देव निवास करतात.माझ्या गावातही नियमाप्रमाणे म्हारूतीचं देऊळ वेशीबाहेरच आहे. शिवारात हिराई, सटवाई आदि महान देव्या निवसन्ति। गावात एक मशीद व एक बौद्धविहारही आहे.
    माझ्या गावात उत्खननात सापडलेल्या अनेक सुंदर मूर्त्या आहेत. मूर्त्यांना काव कुत्र्यांचा. कारण त्या उघड्यावरच आहेत. गावतील या प्राचीन अवशेषांवर लातूरच्या एका (हुशार) प्राध्यापकानं पीएचडी केल्याचंही ऐकिवात आहे. त्याने पुरातत्व खात्याला पत्र पाठवून या सांस्कृतिक ठेव्याची माहितीही दिली होती म्हणे! मूर्त्या न्यायला गावात ट्रक आले; पण काय बिशाद आहे त्यांची मूर्त्या न्यायची? सारा गाव एक झाला. हात नाही लावू दिला. हे एक बरं झालं. मूर्त्या वस्तूसंग्रहालयात ठेवायला पळवल्या असत्या; तर आमच्या गालफुग्या कशा नीट झाल्या असत्या? मूर्तीच्या तोंडाला काव फासून, देवाचं तोंड लाल करून; गालफुगीवर तो काव लावला की रोग दुरूस्त. माझी गालफुगीही एकदा याच प्रकारानं ठीक झाली. आता गुण दगडाचा, देवाचा की कावाचा? एक त्या मूर्तीला अन् दुसरं त्या गालफुगीलाच ठावं.
      गावापासून एक-दीड किमी अंतरावर एक दर्गा आहे. त्याला हिंदू-मुस्लिम सगळे भंजतात. मुस्लिम त्याला 'राजाबक्सार' म्हणतात, तर हिंदू 'राजेभास्कर' म्हणतात. मुस्लिमांचं मत की तो त्यांचा 'पीर' आहे. हिंदूंचं मत की, कबरीखाली शिवलिंग आहे. तरी यावरून कधीच मोठा वाद झाला नाही. मला वाटतं की, ती सूफी संताची कबर असावी. पूर्वी दर्ग्याच्या भोवती बारा एकरांवर घनगर्द झाडी होती. हे आमचं 'मिनी जंगल'. माझ्या लहाणपणी भर दिवसाही दर्ग्यात जायला भीती वाटायची. तरी साताठ पोरं मिळून कवठं, सिताफळं आणायला जायचोच. आता दर्गा ओसाड दिसतो. लोकांनी सरपणासाठी झाडं तोडून दर्ग्याची वाट लावली. दर्ग्यात दर गुरूवारी कंदुरीचा नवस फेडण्यासाठी अफाट गर्दी असते. आधीच माल मारून आलेले काही लोक कंदुरीचं जेवण करून वाटेवरच्या आमच्या शेतातल्या आंब्याखाली येऊन लुडकतात. शाकाहारी लोक दर्ग्यात मलिदा-भाताचा निवद दाखवतात.
       पहाटे मशिदीतील अजाँने उठणारा माझा गाव रात्री देवळातल्या भजनानंतर झोपी जातो.
         गावाला एक पाणंद आहे. लोक परसाकडला तिकडंच जातात. बायका अलिकडे. पुरूष थोडं पलिकडे. येणाऱ्या-जाणाऱ्या पुरूषांमुळे बायकांना अवघडंन उठून उभारावं लागतं. प्रत्येक गावात ही ठरलेली गैरसोय. माझा गावही याला अपवाद नाही. आताशा शासनाच्या 'हगणदरीमुक्त गाव' धोरणामुळे पाणंदीकडची वर्दळ बरीच कमी झालीय.
  पूर्वी गावात एकच जिल्हा परिषदेची शाळा होती. आता एक खासगी माध्यमिक शाळा आणि एक आश्रमशाळाही सुरू झालीय. आता गावची मुलं गावातच शालेय शिक्षण घेतात. आम्ही आठवीला   एसटीनं उमरग्याला जायचो. कुणी सायकलवरून जायचं.
      गावेत पूर्वी इस्पट चालायचं पण चोरून. रानारानानं. मध्यंतरी ते हाॅटेल-कम-क्लबातून चालायचं. आता हा प्रकार कमी झालाय. आमच्या लहानपणी सोंगट्यांचा (सारीपाट) खेळ रात्ररात्रभर चालायचा. तोडी होईपर्यंत.
      पूर्वी गावात एकच पक्ष होता. आता बरेच पक्ष आलेत. प्रत्येकाची कार्यालयं वेगळी. गावाबाहेर कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्या तशा पक्ष व संघटनांच्या पाट्यांची गर्दी आहे. उलट कुत्र्याच्या छत्र्या उगवायचं आता कमी झालंय.
    गावात इतर कंपलसरी सणांसोबतच काही वेगळे सण-समारंभही परंपरेने साजरे केले जातात. उदाहरणार्थ हरिनाम सप्ताह, मोहरमचे पीर बसवणे. यानिमित्त फैतरा हा खेळ खेळणे, कारवनी (बैलांचा सण), येळवस, दर्ग्याची जत्रा, बिरूदेवाची जत्रा इत्यादी. गावात जयंत्यामयंत्याही उत्साहात साजऱ्या होतात. पूर्वी शिवजयंती व भीमजयंतीला हमखास मारामाऱ्या व्हायच्या. वातावरण तंग असायचं. आता लोक शहाणे झालेत. एकमेकांच्या जयंतीत  सहभागी होतात. शिक्षणाची किमया.
     पूर्वी गावात हातभट्टी काढली जायची. गावातले लोक गोळा करून सहज खडा मारला तर तो बेवड्यालाच लागावा, इतके प्रमाण होते. एक दक्ष फौजदारामुळे गावातून हातभट्टी निर्मूलन झाले. तरी बेवडे आजूबाजूला जावून भागवतात; पण प्रमाण कमी झालंय.
    गावातून राष्ट्रीय महामार्ग जातो. सडकेला पानटपऱ्या व हाॅटेलांची संख्या वाढलीय. प्रत्येक टपरीवर बेकार पोरांचा एकेक ग्रूप मावा चघळत व थूंकत कायम पडीक असतो. गावात चांगलं शैक्षणिक वातावरणच नाही, त्यामुळं बेकार जास्त. मग पोट भरायचे तीनच पर्याय एक पुणे- मुंबई, दुसरा पानटपरी लावणे, तिसरा ऑटोरिक्षा चालवणे. हे तीनही न जमणाऱ्याला गावात बेकार म्हणतात. गावाला सुपीक जमीन असूनही अनेकांना करणं होत नाही. तालुक्याचा गाव जवळ. रोजच दौरा.
      घरोघरी रंगीत टिव्ही आले. मोबाईल आले. वाटलं गावचा विकास झाला. कशाच काय न् फाटक्यात पाय. गाव आतून बकाल आणि दरिद्रीच आहे. गावच्या आरोग्याबद्दल तर बोलायलाच नको. विकास हा शब्द तर काहीच्या नावापुरता आहे. असो. माझा गाव शेवटी माझा आहे. मला तो प्रिय वाटतो.


गझल

  गझल ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आ...