बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

आटलेल्या पावसाची फाटलेल्या शेताची कविता




-केशव सखाराम देशमुख

   शेतकऱ्यांच्या लेकरांना कविता लिहायचा ‘सराव’ करावा लागत नाही. शब्दांच्या बुडबुड्याशी खेळून कवितांचे छूमंतर करण्याचा नाद मग जडत नाही. खरे म्हणजे, कविता उदंड झाली. ऊठसूट, जो तो उठतो तो कविताच लिहितो.

     शेती म्हणजे आतबट्ट्यांचा धंदा! व्यथा पुष्कळ. कथाही पुष्कळ. पावलोपावली होरपळ. शेतीच्या धंद्यात पडणं म्हणजे होरपळीची हमी. होलपटीचे वाटेकरी. दुष्काळाशी सामना आणि शोषणाचे कायम मानकरी! अशा दुष्कृत्याची कारूणिक व्यथा शेतकऱ्यांची ‘कवी’ झालेली लेकरं मांडत आहेत. प्रमोद कमलाकर माने हे असंच कवितेमधलं गुणी लेकरू आहे!!

   ‘कोरडवाहू’ शीर्षकाचा प्रमोदचा ६४ पानांचा प्रामाणिक अनुभवांनी व्यापलेला आणि शेतकऱ्यांची पावसाबिगर सुरू असणारी कुत्तरओढ मांडणारा हा कवितासंग्रह आहे.

     प्रमोदची आरंभीची पावलं या त्याच्या कवितेत उमटतात. रचनेचा त्याला फारसा सराव नाही. साधेपणाचे लावण्य लेवूनच तो कविता लिहितो. त्याच्या कवितेच्या जन्मकळा पुष्कळ इमानी आहेत. अनुभव घट्ट मांडण्यात तो कमी पडतो. तरीही; कविता लिहिताना विषयांची उसनेगिरी वा उचलेगिरी करायचे त्याला काम पडत नाही. जगणे व भोगणे हे प्रमोदच्या कवितेचे प्रमुख मैदान आहे! भुकेच्या अवकळा हा त्याच्या कवितेचा प्रांत ठरतो. जमिनीच्या भेगा व न बरसणारे ढग: हे प्रमोदच्या कवितेची निर्मितीप्रक्रिया होय. प्रमोदला दुःखातून फुटून व्यक्त झाल्याशिवाय आनंद मिळत नाही.

     ‘रवंथ’ या कवितेत दुष्काळ आणि ढोरवासरांच्या दैना प्रमोदने नेमक्या शब्दांतून मांडल्यात. कुणब्याच्या घरातली गरीबी ‘बळीराजा’ कवितेतून मुखरीत होते. उपासमारी व अवहेलनेचे करूण चित्र ‘दुस्काळ’ कवितेतून उमटते. ‘रंगारी’ या कवितेतून अवर्षण आणि शेतीपाणीवर गुदरलेले संकट फार प्रभावीपणे येते. ‘जुवाखाली’ कवितेत शिवाराची सावली, लक्ष्मी असलेल्या बैलांचे शब्दचित्र आले आहे. ‘कुठवर’ या कवितेत गरीबीचे दाह सोसून आकार पावणारे बंड येते!! थोडक्यात काय तर, ‘कोरडवाहू’ कविता ही करपलेल्या शिवारांची आणि होरपळलेल्या कष्टकऱ्यांची कविता आहे. या अवघ्या होरपळीचा प्रमोद हा कवी साक्षीदार आहे.  ही अवघी कविता लिहिताना प्रमोदला कुणाची नक्कल करावी लागत नाही. त्याला कवितांचे क्षेत्र शोधावे लागत नाही. जगणे, भोगणे,  आठवणे आणि  लिहिणे ही क्रियापदं प्रमोदच्या कवितेची उगमांची स्थळे आहेत.

शनिवार, २७ एप्रिल, २०१९

सुरेंद्र पाटील यांची दमदार कादंबरी: झुलीच्या खाली



    'झुलीच्या खाली' ही सुरेंद्र पाटील यांची 'चिखलवाटा' नंतरची दुसरी कादंबरी मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने काढलीय. त्यांनी आंतरभेगा या कथासंग्रहाने साहित्यविश्वात पदार्पण केले .
 या कादंबरीत श्रीशैल्य बिराजदार या शिक्षकाच्या जीवनाचा एक वर्षाचा पट लेखकाने दैनंदिनीतून उभा केलाय.
    या कादंबरीचा नायक नोकरीत येणाऱ्या वाईट अनुभवांवर चिंतन करतो.' गर्व से कहो हम गांडू है' असं उपहासाने म्हणत तो संताप व्यक्त करतो. संस्थेतलं भ्रष्ट वातावरण, राजकारण आणि गळचेपीने तो व्यथित होतो. तरीही तो आशावादी आहे. आपले काम इमानेइतबारे करत राहतो.
   त्याने गावाकडची नाळही तुटू दिली नाही. शेतीत पैसा घालणं परवडत नसतानाही तो शेतीला पैसे पुरवतोय. गावाकडे यव्वा (आई), आप्पा (वडील), अण्णा (भाऊ), वहिणी, त्यांची तीन लेकरं हा गोतावळा आहे. भावाला शेतीत साथ देऊन घराला उभं करण्यासाठी तो झटतो आहे. त्यात अण्णाला दारूचं व्यसन लागून शेतीची दुरवस्था झालीय. भावाला,शेतीला आणि दोन घरांना सावरताना त्याची दमछाक होतेय. हे सारं प्रत्ययकारीपणे या कादंबरीत आलं आहे.
    नायकाने दोन झुली पांघरल्या आहेत. एक मास्तरकीची. दुसरी गावाकडच्या जबाबदारीची. बैलाला झूल पांघरली जाते. पण त्याने पाठीवरचे वळच झाकले जातात. त्याला फक्त राबवून घेतले जाते. वरून रंगीत झूल पांघरलेला श्रीशैल्य झुलीखाली किती दबून गेलाय ते या कादंबरीतून जाणवत राहतं.
    या कादंबरीत आलेले लिंगायत समाजाचे चित्रण; हे या कादंबरीचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. या समाजाचे चित्रण करणारी ही पहिलीच कादंबरी म्हणावी लागेल.
   श्रीशैल्यच्या शाळेतील सहकाऱ्यांची व्यक्तिमत्त्वं त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह खूपच कमी शब्दात आणि ठसठशीतपणे उभी करण्यात लेखकाला यश आले आहे.
    मराठवाडा-कर्नाटक सीमावर्ती भागातील बोलीभाषा कन्नडभाषेच्या प्रभावासह या कादंबरीत छान आली आहे. नायकाची आई यव्वा हिचे माहेर कर्नाटकातील असल्याने ती अधूनमधून कन्नडमध्ये बोलते. शेवटी लेखकाने अर्थाचे कोष्टक जोडल्यामुळे अर्थ समजण्यास मदत होते.
    पकड घेणारे निवेदन आणि गोळीबंद कथासूत्र असलेली ही कादंबरी नायकाच्या जगण्याचे सर्व ताणेबाणे समर्थपणे  कवेत घेते.
    सतीश भावसार यांनी कादंबरीचं मुखपृष्ठ सुंदर केलंय.

--------------------------------------------------

कादंबरीचे नाव- झुलीच्या खाली

लेखक- सुरेंद्र पाटील

प्रकाशक- मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- 114

मूल्य- ₹120

गुरुवार, १४ मार्च, २०१९

सप्ता

माझं घर वारकरी संप्रदायाचा वारसा नेटानं आणि निष्ठेनं  चालवणारं. गावातले जवळपास निम्मे लोक माळकरी. माझंही घर वारकरी घराणं म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द होतं; आणि आजही आहे. आमच्या घरी एकूण तेरा माणसं. सर्वांच्या गळ्यात तुळशीच्या माळा. आजोबा लहानपणापासूनच भजनाला जात. मोडकळीला आलेला संप्रदाय आजोबांनी पुन्हा सावरला आणि संप्रदायाचा चांगलाच जम बसला. आजोबांनी पोरं गोळा केले. त्यांना भजन शिकवलं. गोडी लावली. मोडलेलं भजन सुरू झालं; तेव्हापासून गावकरी आजोबांना मास्तर म्हणू लागले.
        मीही इयत्ता पहिलीला असल्यापासून टाळ घेऊन भजनाला उभारायचो. सगळं गाव माझ्या न चुकणाऱ्या टाळंच्या ठेक्याचं कौतुक करायचं. मला लहान टाळ होती पण मी मोठीच टाळ घ्यायचो. मोठी टाळ आवरायची नाही. हात भरून यायचे. कधीकधी बोटही ठेसून निघायचे. आज्जा, बाप, चुलता आणि मी असे एकाच घरातले चौघं भजनाला उभारायचो. आजोबा विणेकरी होते; आणि आम्ही तिघं टाळकरी. चुलता पट्टीचा गायक होता. चाल म्हणायला पटाईत. वडलांचा आवाज गायकीला  साजेसा नव्हता; पण पाठांतर प्रचंड होतं. किर्तनकारानं प्रमाण म्हणून कुठलाही अभंग दिला तरी वडील तो उचलून पूर्ण करायचे. प्रमाण आलं की सगळे वडलाकडच बघायचे. आजोळ गावातलं होतं. तिकडचे सख्खे- चुलत आजोबा, मामालोकही भजनात असायचे. पखवाज वाजवायला तिकडच्या दोन आजोबापैकीच एक असायचे. अशाप्रकारे दोन्हीकडच्या लोकांना माझं कौतुक होतं.
       आजोबा थकले; वय ऐंशीच्या घरात गेलं. भजनात तीनचार तास उभं राहणं जड जाऊ लागलं. ते ओळखून वारकऱ्यांनी मास्तरांना बळजबरीनं भजनातून रिटायर केलं. आजोबानंतर घराणेशाहीमुळे नाही तर पाठांतरामुळे विणा वडलांकड आला. विणेकरी हा हुशार, वारकरी परंपरेचं काटेकोरपणे पालन करणारा आणि आचरण चांगले असणारा असावा लागतो. ह्या कसोटीवर वडीलच टिकले. विणा गळ्यात येणं ही मोठीच जबाबदारी असते. भजनाला चकल्या, बुट्ट्या मारता येत नाहीत. आता आजोबा आणि वडीलांची विण्याची परंपरा आम्ही भाऊ सांभाळू की नाही याची शंका वाटते.
     गावात सप्त्याची परंपरा कधीपासून सुरू झाली हे कुणालाच खात्रीनं सांगता येत नाही; इतकी ती जुनी आहे. आजोबांना त्यांचे आजोबा सांगायचे की, “ मला कळतंय तसं गावात सप्ता होतोच.”
    सप्त्याच्या आधी गावात पट्टी गोळा केली जाते. पूर्वी सप्त्याच्या आधी लोक घरं सारवून घ्यायचे. आता एवढा उत्साह नसतो. आदल्या दिवशीच मंडप उभारला जातो. दर्शनी भागात विठ्ठल आणि संतांच्या प्रतिमा लावून त्यांना सजवले जाते. सप्त्याच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला विणा उभा राहतो. हा विणा सात दिवस (रात्रीसह) जमिनीला टेकवायचा नसतो. हातोहात हा विणा सात दिवस अधांतरी झंकारत ठेवायचा. रात्री, अपरात्री, पहाटे विण्याच्या पहाऱ्यासाठी उत्स्फूर्त स्वयंसेवकांची कधीच कमी पडत नाही. पंढरपूरच्या श्री.ह.भ.प. धोंडोपंत दादांच्या फडात तर ह्या फडाच्या स्थापनेपासून आजतागायत विणा उभा आहे. पुढेही विण्याचा पहारा सुरूच राहील. हा विणा टेकवलाच जाणार नाही. कधीच.
        सप्त्यात तुकाराम बीज आणि एकनाथ षष्ठीला गुलाल पडतो. शेवटच्या अष्टमीच्या दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फुटते. काल्याचा प्रसाद वाटला जातो. त्यानंतर गावातून नगरप्रदक्षिणेसाठी दिंडी निघते. वाटेने वारकरी पाऊल खेळतात. फुगड्या खेळतात. मनोरे रचतात. सगळा गाव ही दिंडी बघायला लोटतो. वारकरी घामेघूम होतात. आनंद. केवळ आनंद असतो.
       सप्त्याचे सात दिवस भल्या पहाटे गावातील मुले-मुली ज्ञानेश्वरीचे वाचन करतात. याला ‘पारायण’ म्हणतात. यातही काही मुलं नुसतीच बोटं फिरवतात. तर काही मुलींशी सूत जुळवू पाहतात. हरेक नमुना सापडतो. पारायणानंतर थोड्या वेळाने सकाळचे तुकाराम गाथ्याचे भजन होते. थोडा ब्रेक. त्यानंतर दुपारी गुलालाचे कीर्तन. पुन्हा प्रवचन. पुन्हा लगेच सायंकाळी हरिपाठाचे भजन होते. पुन्हा थोड्या विरामानंतर रात्रीचे कीर्तन उभे राहते. असा भरगच्च कार्यक्रम असतो.
          दुसरीला असल्यापासून मी सप्त्यात भाग घ्यायचो. पहाटेच्या पारायणापासून रात्रीच्या कीर्तनापर्यंतच्या सर्व शिफ्टमध्ये भाग घ्यायचो. कुठली ऊर्जा अंगात संचरायची कोण जाणे!
        त्या शालेय वयात माझे सदरे पोटावर छिद्र पडलेले असायचे. कारण भजन करताना टाळ आवरायची नाही. त्यामुळे पोटाच्या आधारानं टाळ पेलून वाजवायची. त्यात सदरा सापडून कुटून जायचा.
       माझ्या लहानपणी सगळा मंडप गच्च भरलेला असायचा. लोक मंडपाबाहेर बसून, आपापल्या दारापुढं बसून कीर्तन ऐकायचे. आता लहान मंडपही अर्ध्याहून अधिक रिकामाच असतो. पूर्वी मनोरंजनाची साधनं नव्हती. लोक श्रद्धाळू आणि परंपराप्रिय होते. आता ऐन काल्याच्या कीर्तनाच्या वेळी वर्ल्ड कपची मॅच सुरू असते. किंवा रात्रीच्या कीर्तनाच्या वेळी आयपीएलची मॅच सुरू असते. किंवा नवा चित्रपट सुरू असतो. गावात टिव्ही नव्हता तेव्हा सप्ता सणासारखा वाटायचा. लेकीबाळींना सप्त्यासाठी मुराळी धाडला जायचा. पाहुण्यारावळ्यांना बोलावलं जायचं. वर्षभराच्या ब्रेकनंतर भारत पाच एकदिवसीय मालिका खेळावा इतकं सप्त्याचं अप्रुप असायचं आणि मंडपाचं स्टेडियम तुडुंब भरायचं.
       अनेक वारकरी, कीर्तनकार सप्त्याला यायचे. घरोघरी त्यांची आंघोळीची, राहण्याची व्यवस्था केली जायची. ते म्हणायचे, “ अहो, तुमच्या गावच्या सप्त्याची गोडीच न्यारी बुवा! भलेमोठे सप्ते बघितले पन असा सप्ता कुठंच रंगत नाही बघा..”
   वारकरी संप्रदायाचा एक वैशिष्ट्य म्हणजे वारकरी लोक एकमेकांच्या पाया पडतात. बालक, लहान, मोठा, स्त्री, पुरूष असा भेद नसतो. तुकारामांनी लिहून ठेवलेलं तंतोतंत पाळलं जातं.
‘पंढरीस नाही।कोणा अभिमान॥पाया पडती जन।एकमेका॥‘
गाव, घर या पाहुण्या वारकऱ्यांच्या वर्दळीनं गजबजून जायचं. अनेकांचे दर्शन व आशिर्वाद मिळायचे; यातच समाधान वाटायचं. एखाद्या वर्षी एखादा परगावचा वारकरी सप्त्याला आला नाही तर गावातले लोक त्याची आठवण काढायचे. विचारपूस करायचे. तेव्हाचे वारकरीही असे जीव लावण्यासारखेच होते. निर्मोही. प्रेमळ. संतत्वाच्या जवळ गेलेले.
       आम्हाला कधी शाळेचा गणवेश फाटला तर लवकर मिळायचा नाही. कधी सणावाराला कपडे मिळायचे नाहीत पण सप्त्याचा निमित्तानं बहुधा नवे कपडे मिळायचे आणि तोही शाळेचा गणवेशच.
    अलिकडे गावोगावी सप्ते होतायत, ही आशादायक गोष्ट आहे पण कुठेच पूर्वीसारखा उत्साह दिसत नाही. ‘अखंड हरिनाम सप्ताह’ हे शब्द जरी उच्चारले तरी मनात विण्याचा षड्ज झंकारतो. पखवाजाच्या धुमाळ्या, सरपट्या घुमतात. टाळांची गाज कानात व्यापते.
     अलिकडे जातीजातीत वाढलेली दरी कमी करायची असेल तर सप्त्यासारखा सुंदर पर्याय नाही.
           





रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

मोठा आशय असलेल्या 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या'


प्रसाद कुमठेकर या लेखकाची ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ही बहुचर्चित कादंबरी नुकतीच वाचली. म्हटलं तर ही कादंबरी आहे. म्हटलं तर हा कथासंग्रह आहे. म्हटलं तर ही व्यक्तीचित्रे आहेत. एक वेगळाच फॉर्म लेखकाने वापरला आहे. यात एकतीस ष्टोऱ्या आहेत. लघुकथेसारखी दीड ते अडीच पानांची एक ष्टोरी. प्रत्येक ष्टोरीचा निवेदक हा वेगळा आहे. हे निवेदक वेगवेगळ्या वयोगटातील व वेगवेगळ्या स्तरातील आहेत. या ष्टोऱ्यांचा एकमेकाशी संबंध आहे. त्यामध्ये एक सूत्र आहे. म्हणून या रचनाबंधाला कादंबरी असं म्हणता येतं. मराठीत बहुधा कादंबरीचा निवेदक एकच असतो. वि. स. खांडेकरांनी ‘ययाती’ या कादंबरीत ययाती, शर्मिष्ठा, देवयानी या तिघांच्या निवेदन व दृष्टिकोनातून गोष्ट सांगितली आहे. इथे तर प्रत्येक ष्टोरीचा निवेदक वेगळा आहे. त्याची भाषाशैली वेगळी आहे. असे प्रयोग करायला गेल्यास कादंबरी फसण्याची शक्यता असते, पण कुमठेकरांनी यात यश मिळवले आहे. याला कथेकरी फॉर्म म्हणता येईल. हा आपल्या मातीतलाच फॉर्म आहे. जातककथा, लीळांशी नाते सांगणारा हा वाड्.मयप्रकार आहे.
        पूर्णपणे उदगिरी बोलीचा वापर हे या कादंबरीचे एक ठळक वैशिष्ट्य! बोलीभाषेचा इतका सुंदर वापर खूपच कमी कादंबऱ्यांतून झालाय. उदगिरी बोली लेखकाने खूप बारकाव्याने आणि तिच्या अंगभूत वैशिष्ट्यांसह वापरली आहे. उच्चारानुसारी लेखनामुळे बोलीचा लहजा सांभाळण्यात लेखक यशस्वी झाला आहे. कादंबरीच्या शेवटी शब्दार्थाचे परिशिष्टही जोडले आहे. त्यामुळे या बोलीचा परिचय नसणाऱ्या वाचकालाही समजायला कुठेच अडथळा येत नाही.
        ह्या ष्टोऱ्या खूपच गमतीशीर पद्धतीने सांगितल्या आहेत. त्यामुळे कुठेही कंटाळवाण्या वाटत नाहीत. या ष्टोऱ्यांमध्ये ह्युमरही आहे आणि त्याखाली दडलेली करूणाही आहे. लेखकाने आजचे वास्तव खूपच समंजसपणे व प्रत्ययकारी पद्धतीने मांडले आहे. यात दोन पिढ्यांमधला मूल्यसंघर्ष आहे. अलीकडे गावात झालेले बदल आहेत. वास्तवाचा आरसा दाखवणे एवढेच काम निवेदक करत नाही; तर प्रत्येक निवेदकाला स्वतःची मतं आहेत. लेखक परंपरेतल्या सगळ्याच गोष्टींचे उदात्तीकरण करत नाही. जे आऊटडेटेड आहे ते सोडून द्यायची त्याची तयारी आहे. मराठी लेखकांमध्ये विशेषतः ग्रामीण लेखकांच्या लेखनात जो भाबडेपणा दिसतो, तो या पुस्तकात कुठेच आढळत नाही. किंवा सगळंच टाकाऊ आहे; असा उद्दाम अभिनिवेशही नाही. यासाठी लेखकांनं तटस्थतेनं भवतालाकडे पाहणं आवश्यक असतं. असा तटस्थपणा प्रसाद कुमठेकर यांना साधला आहे.
 ‘भिजकं घोंगडं’ ह्या ष्टोरीतले भाऊ गावकडे मिळूनच राहतात. यातले बाकीचे शहरात तर एक गावात असतो. घर एकत्र ठेवल्याचा त्यांना अभिमानही आहे. पण शहरात शिकलेली त्यांची मुलं प्रॅक्टिकल आहेत. जे आमचं आहे ते आम्हाला देऊन टाका; असं मुलं म्हणतात. शेवटी व्हायचा तो इमोशन ड्रामा होतोच. मुलं वाटणी करून घेतात आणि काही झालंच नाही असं एकमेकांशी गप्पा मारत एकाच चुलीवर केलेलं आनंदानं जेवतात. लाठ्याकाठ्या न घेताही वाटणी होऊ शकते हे गावातल्या लोकांसाठी नवीनच आहे. ह्या ष्टोरीचा शेवट यादृष्टीने बघण्यासारखे आहे-
“ पर असं वाटन्यायचं भिजकं घोंगडं घरच्यांच सगळ्यांनी मिळून बकिटीबाहीर काढून, त्येला व्यवस्थित पिळून असं दाराम्होरल्या दोरीवर व्यवस्थित वाळत घातलेलं घर, त्यांनी पहिल्यांदाच पाहत आस्तीन.”
    बदलते दृष्टिकोन, बदलती मानसिकता, बदलता गाव हे सर्व लेखकाने खूपच अचूकतेने टिपले आहे. कादंबरीची अर्पणपत्रिका लक्ष वेधून घेते. ही अर्पणपत्रिका मला एक स्वतंत्र कविताच वाटते.
    मितव्ययी लेखनशैली हे या लेखकाचे आणखी एक वैशिष्ट्य नजरेत भरण्यासारखे आहे. कवितेत असतो तसा गोळीबंद आशय प्रत्येक ष्टोरीत आहे. काही प्रतिमा आणि रूपकंही यात आली आहेत. जीवनाकडे पाहण्याची पूर्वग्रहरहित व मिष्किल दृष्टी असल्याशिवाय असं लेखन संभवत नाही.
   या कादंबरीची अर्पणपत्रिका लक्ष वेधून घेते. ही एक स्वतंत्र कविताच वाटते.
     उदगीर परिसराची भाषिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक,भौगोलिक वैशिष्ट्ये नोंदवणारी ही नव-देशीवादी कादंबरी आहे. ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या कादंबरीने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढून खूप पुढे नेऊन ठेवले आहे. यासाठी लेखक प्रसाद कुमठेकर यांचे अभिनंदन!
       
                 - प्रमोद कमलाकर माने

कादंबरीचे नाव -बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या
                          (द्वितीय आवृती)
लेखक- प्रसाद कुमठेकर
प्रकाशक- पार पब्लिकेशन्स्
पृष्ठे – 120
मूल्य- ₹180

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

पाखरं

जवारीचे कणसं निसवल्यावर, कणसात दुधाचा हुरडा भरल्यावर, भल्या पहाटे रानात पाखरं राखायला जावं  लागायचं. न्याहारीला रात्रीचीच शिळी भाकर, जवसाची चटणी, वर थोडं दही नाहीतर घण्याचं गोडंतेल घातलेलं. चिरगुटात भाकर बांधून, गोफण आणि पत्र्याचा एक डबा घेऊन मी वडील, चुलते किंवा आजोबांसोबत झुंजूरक्याच रानात जायचो. जवारीतल्या आटुळ्यावर उभारून गोफण फिरवायचो.  हाऽ असा आवाज करत काठीनं पत्र्याचा डब्बा वाजवत फिरायचो. गोफणीतून सुटलेला खडा पिकात भिर्रकन पडायचा आणि पाखरांचा थवा चिवचिवत उडून बाजूच्या झाडावर जाऊन बसायचा. मागून उगीचंच वाईट वाटायचं.  भरल्या ताटावरून हात धरून उठवलेल्या लेकरासारखी वाटायची ती पाखरं.
       घरासमोर अंगणात भलंमोठं बाभळीचं झाड होतं. उन्हाळा आला की, आजी कुंभारानं दिलेलं काळंभोर लोटकं झाडाच्या फाट्याला बांधायची. रोज सकाळी मला त्या लोटक्यात पाणी भरायला सांगायची. अंगणात दाणे पसरायची. दाणे टिपायला चिमण्यांची झिम्मड पडायची. तहानलेली पाखरं त्या लोटक्यातल्या पाण्यात चोची बुडवून तृप्त होत. खरंतर तेव्हापासूनच मला पाखरांचा लळा लागला.
     चिमण्या अंगणात बिनधास्त यायच्या. वळचणीला घरटं करायच्या. एकदा चुकून वळचणीचं घरटं हलून त्यातली चिमणीची इवलीइवली लालबुंद पिलं भुईवर पडली आणि चोची वासून मरून गेली. आजही ती घटना आठवली की, अंगावर सर्र्कन काटा येतो. पिसाटलेल्या चिमणीनं दिवसभर घरात हैदोस घातला. शेवटी कुठं बेपत्ता झाली कुणास ठाऊक?
      पिवळ्या पायाच्या काळ्या साळुंकीची आजी गोष्ट सांगायची: ‘साळुंकीचे पाय काळे होते. मोराचे पाय पिवळे. एके दिवशी लग्नाला जाताना साळुंकीनं मोराचे पाय उसने घेतले. घेतले ते  घेतले, पुन्हा परतच केले नाहीत. म्हणून अजूनही मोराचे पाय काळे आणि साळुंकीची पाय पिवळेच दिसतात. म्हणूनच अजूनही मोर नाचताना पायाकडे पाहून रडतो.’ मला खरंखरं वाटायचं. ही लोककथा पिढ्यानुपिढ्या चालत आलेली. आणि शेवटच्याच मुक्कामावर असलेली.
       कधीकधी शेतात हिंडताना अचानक मोरपीस दिसतं; तेव्हा गुप्तधनाचा हंडा सापडल्यासारखा आनंद होतो. कधीकधी वढ्याकडून म्याँवऽ म्याँव ऽ असा मोठा केकारव ऐकू येतो. सकाळी मुगाच्या पिकात फिरताना मोरांच्या पावलांचे ठसे दिसतात. मुगाची सालपटं ओळीनं पडलेली दिसतात. एकदा एकटाच शेताकडे निघालो असताना पिसारा फुलवून नाचणारा मोर समोर दिसला. अनाहूत. मंत्रमुग्ध होऊन जागच्या जागी थिजल्यासारखा उभारून ते अलौकिक आणि दुर्मिळ दृश्य पाहिलं. मोराच्या नाचायच्याही ठरलेल्या जागा असतात. आमच्या चवाळीचं कोपरं, बापूच्या मोरंडीतलं विहिरीजवळचं उमाट... याठिकाणीच हमखास मोर नाचताना दिसायचा.
       कोकीळच्या  कुहूऽला हुबेबूब कुहूऽनं उत्तर द्यायला मजा यायची. मोठा झालो तरी हा मोह आवरत नाही. लेकरांसोबत मीही लेकरू होतो. रान पाखरांच्या संगितानं जिवंत वाटायचं. चिवचिवऽ चिवचिवऽ... कॉयकॉयऽ कॉयकॉय...टिट्ऽ टटिव टिट् ऽटटिव...कुहूऽकुहूऽ... या आवाजांमध्येही मेळ असतो. टिटवीचा आवाज मात्र अजूनही मनात भीतीचं काहूर निर्माण करतो.
    हिवाळ्यात तळ्यावर लांबलचक कारकोचे यायचे. कारकोचांचा थवा उडताना फार सुंदर दिसतो. नंतर कळलं की; हे परदेशी पाहुणे आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून ते आपल्या गावच्या तळ्यावर आलेत याचं अप्रुप वाटायचं. एकदा एक जखमी कारकोचा मासे धरणाऱ्या पोरांनी उचलून आणला. तेव्हा त्याचा भलामोठा आकार पाहून भीतीच वाटली. उडताना किती लहान दिसतात अन् प्रत्यक्ष एवढा मोठा! हल्लीच्या दुष्काळी दिवसात तळंच कोरडं असतं. अर्थातच कारकोचेही येत नाहीत.
       रात्री पिंपळावर झोपी गेलेले बगळे फारच सुंदर दिसतात. पिंपळ पांढराशुभ्र होतो. गुरं चरताना त्यांच्या मागं मागं पळणारा, पाठीवर बसणारा बगळा ध्यान देऊन पहावा. वरून उडणाऱ्या बगळ्यांकडे बघत, हाताच्या बोटांचे नख एकमेकांवर घासत ‘बगळ्या बगळ्या कवड्या दे’ म्हणत बालपण भुर्र्कन केव्हा उडून गेलं कळलंच नाही.
        गुरुजींनी ‘चित्र काढा रे!’ म्हटल्यावर पोपटाचंच चित्र काढायचो. सुंदर पक्षी. निळकंठराजाही असाच सुंदर!
      चिमणी, कावळा, मोर, पोपट, घार, कोकीळ, पावश्या (चातक), सुगरण, साळुंकी, होला, चित्तर, सुतारपक्षी, बदक, बगळा, नीळकंठराजा, हंस इतकेच पक्षी ओळखता येतात. काही ओळखीचे आहेत पण नावं माहीत नाहीत. कित्येक पक्षी माहितीही नाहीत. आमच्या भागातले गुंजोटीचे पक्षीनिरीक्षण करणारे डॉ. सुहास मोहरीर हे कॅमेरा घेऊन आमच्या तळ्यावर पक्षीनिरीक्षणार्थ यायचे. त्यांचे लेखही छापून यायचे. अशा वेड्या लोकांचं मला कौतुक वाटतं.
      पक्ष्यांची संख्या लक्षणीय कमी झालीय. पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले. कित्येक प्रजाती नष्ट झाल्या. माळढोक सारख्या काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
   चिमण्या तर बेपत्ताच आहेत. मोबाइलच्या रेडिएशचाही पक्ष्यांवर घातक परिणाम होतोय, असं वाचलंय. आपण पाखरं जगावीत म्हणून मोबाईल काही सोडणार नाही. मोबाईलवरच पाखरांचे वॉलपेपर, स्क्रीनसेव्हर ठेवू. आणि कलरवाचा रिंगटोन!

   


रविवार, २७ जानेवारी, २०१९

येळवस


आमच्या उस्मानाबाद-लातूर जिल्ह्यात मार्गशीर्ष महिन्यातल्या अमावस्येला येळवस हा कृषीसंस्कृतीतला सण साजरा केला जातो. येळवस म्हणजेच वेळा-अमावस्या. थंडीचे दिवस. संक्रांतीच्या आधीचा सूर्याच्या संक्रमणाचा काळ. इथून दिवस मोठा होत जातो. म्हणूनच इकडं ‘येळवशीचा उंडा आनी दिवस झाला धोंडा’ ही म्हण प्रसिद्ध आहे.
   येळवशीच्या दिवशी जल्दी उठून कर्ता माणूस आंबीलाचं बिंदगं डोक्यावर घेऊन सगळ्यांच्या आधी शेताला जातो. मागून सगळे बैलगाडीत बसून शेताला निघतात. गाडीत सैपाकाच्या डाली कापडानं बांधून व्यवस्थित ठेवल्या जातात.  गाडीवाटेनं मुलांच्या आग्रहावरून बैलगाड्यांच्या शर्यती लागतात. एकमेकांना हुर्रे करत, धुराळा उडवत गाडी शेतात पोचते.
  येळवशीच्या आदल्या दिवशीच शेताला जाऊन वांगे, मेथी, रानभाज्या, तुरीच्या शेंगा, हरभऱ्याचे ढाळे, गाजरं, पातीचा लसून, कांदा, चिंचा, पूजेसाठी पेरू असा भरगच्च रानमेवा आणला जातो. आपल्या शेतात जे नाही ते दुसऱ्याच्या शेतातून मागून आणायचं. आपल्या शेतातलं दुसऱ्याला द्यायचं. येळवशीच्या आदल्या दिवशी खास बाजार भरतो. त्याला भाजीपाला म्हणतात.
      आणलेल्या भाज्या निवडणे, शेंगा सोलणे ही कामं लहानगे आणि गडीमाणसंही करू लागतात. रात्री ढणढणत्या चुलीवर रानमेवा शिजतो. रानमेव्याची भज्जी, सजगुऱ्याचे (बाजरीचे) उकडलेले उंडे, वांग्याचं भरीत, ताकाला पीठ लावून केलेलं आंबील, खिचडा, खीर, गूळशेंगा वाटून तयार केलेल्या कोंदीचे लाडू आणि पोळ्या असे एकाहून चढ एक पदार्थ...दोन डाली गच्च भरतात. इष्टमित्र, पाहुणे, शेजारी यांना आवतन दिलेलं असतं.
   येळवशीला प्रत्येक घरी शहरातले पाहुणे आल्यानं सकाळी गावात अनेक नवनवे चेहरे दिसू लागतात. पण दिवसभर आमच्या भागातली गावं, शहरं कर्फ्यू लागल्यासारखी दिसतात. सगळ्या बाजारपेठा बंद, दुकानं बंद, घरं बंद... सर्वत्र शुकशुकाट असतो. शिवारातली शेतं मात्र गजबजलेली असतात.
       शेतात कडब्याच्या पेंढ्या लावून लहान कोप आदल्या दिवशीच तयार केलेली असते. कोपीत पाच पांडवाचे पाच दगड ठेवलेले असतात. शेतात गेल्याबरोबर पांडवांवर मध्यभागी कावाचा गोल ठिपका आणि त्याच्याबाहेरील बाजूने चुन्न्याचा पट्टा लावून पांडवांची पूजा करतात. सगळे कोपीसमोरच झाडाच्या सावलीत बसलेले असतात. एका खापराच्या येळणीत आंबील आणि त्यात चुरलेले सजगुऱ्याचे उंडे तर दुसऱ्या येळणीत पाणी घेऊन ‘हर बोलो, भगतराजे हर बोलो ऽ  शंभूशंकराच्या नावांनं हर बोलो ऽ ढवळ्या नंदीच्या नावानं हर बोलोऽʼ म्हणत ज्वारीच्या पानाने  सगळ्या पिकात चर शिंपले जाते. वडीलधारे पुढे चर शिंपायला, तर लहानगे मागे पाणी शिंपायला. शिवार ‘हर बोलो’च्या जयघोषानं दुमदुमून जातं. चर शिंपून आल्यावर चर शिंपणाऱ्यांनी उंडा घेण्यासाठी हात मागे पाठीवर ठेवून, गुडघे टेकून पांडवांच्या पाया पडायचं. तेव्हाच बाया पाठीवरच्या उलट्या ओंजळीत हळूच सजगुऱ्याचा किंवा कोंदीचा उंडा ठेवतात. उंडा खायचा. उंडा खाल्ल्यावर भूक आणखीनच चाळवते.  त्यानंतर विहीरीला निवद दाखवून पूजा केली जाते. मग पंगत पडते. अन्न गोड लागतं. पोट भुगेस्तोवर जेवून वरून आंबील पिऊन अंग जड होतं. सुस्ती येते. पानाचे विडे खायला दिले जातात. गप्पाट्या रंगतात. माणसं तिथंच लोळतात. झोप लागते. पोरं बोरं खात, मव्हाळं शोधत रानभर हिंडतात. कुणाला मधमाशी चावल्यामुळे तोंड सुजलेलं दिसतं. जास्त आंबील पिऊनही तोंड सुजतं. डोळे तारवटून लाल होतात. मध खाऊन तोंड गोडमिट्ट पडतं. एकमेकाच्या कोपीवर बोलावलं जातं. भेटीगाठी होतात. ख्याली-खुशाली समजते. थट्टा-मस्कऱ्या रंगतात. भज्जी- उंडे खाण्याचा आग्रह होतो. ‘नको पोट तुडूंब झालंय’ म्हटल्यावर ‘खावा. आज पोट मोठ्ठं होतंय. येळवशीचं अन्न कितीबी खाल्लं तरी पचतंय.’ असं म्हटलं जातं. मग त्यांच्या भज्जीची  टेस्ट बघावीच लागते. रात्रभर जागून सैपाक केल्यामुळे जेवणानंतर बायाही तोंडावर पदर घेऊन डारडूर झोपी जातात.
           दिवस कलायला लागतो. दगडाची चूल करून त्यावर बाया खापराच्या लोटक्यात दूध-शेवयाचं आधण ठेवतात. आजूबाजूच्या काटक्या, शेण्यावर चूल पेटते. धुपू लागते. धूर पसरतो. आधण उतू जातं. ज्या दिशेला उतू गेलं तिकडचा शिवार पुढच्यासाली जास्त पिकणार असं मानलं जातं.
      सांजच्यापारी गाडी जुंपली जाते. आवराआवर होते. पसारा गाडीत भरला जातो. धुराळा उडवत सोनेरी प्रकाशात गाडी गावच्या वाटेला लागते. शेतकरी हेंडगा फिरवण्यासाठी मागे शेतातच थांबतो. पिकाला ऊब भेटावी म्हणून पेटता हेंडगा सावळ्या रानात फिरवून, घरी न येता थेट मारूतीच्या देवळापुढं हेंडगे आणून टाकले जातात.  लहानगे त्या जाळावर ऊसं भाजतात. भाजलेले ऊसं मारूतीच्या पारावर ‘बजरंग बली की जय!’ म्हणत फटाफट फोडले जातात. मग ते ऊस घरी घेऊन आल्यावर येळवस संपते. असं म्हणतात की; येळवशीपासून रानातली थंडी गावात येते.
       

गझल

  गझल ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आ...