बुधवार, ३० मे, २०१८

कुणब्याची शायरी



जुने दिवस आठवले की मनावर ढगं दाटतात. ते रानशिवारातले दिवस. पानझडीचे...खळ्यादळ्याचे दिवस..मोटनाड्यांचे दिवस...भुलईचे...जात्यावरच्या पहाटेच्या दळणाचे... ओव्यांचे..रात्रीच्या देवळातल्या भजनाचे...चावडीवरच्या गप्पांचे...हुरडापार्टीचे...मुराळ्याच्या मानाचे...सग्यासोयऱ्यांच्या वर्दळीचे...घुंगराच्या गाडीचे...कुणब्याच्या शायरीचे...सोन्यासारखे दिवस.
   तो जुन्या दिवसांच्या स्मृतीत हरवतो...
पहाटे दळताना जात्याच्या गुढगर्भ संगीताच्या ठेक्यावर वहिनीच्या मंजुळ आवाजात ओवी ऐकू यायची.
       पाट्टंच्या दळनाला
       आता उशीर झाला बाई
       नंदी गेल्यालं ठावं न्हाई
मग त्याला उत्साह वाटायचा...तो मनोमन ठरवायचा: 'उद्या वैनी उटायच्या आद्दी बैलं नाही सोडलो तर भाद्दर नाही.'
मध्येच ओवी बंद होऊन जात्याची वेगात घरघर व्हायची. थोड्या विरामानंतर पुन्हा ओवी ऐकू यायची.
       बारा बैलाचा नांगर
      चलतो वनमाळी
      ऐका भिवाची आरोळी
त्याला वाटायचं, म्याबी भिवा होईन. नांगराला जाईनच.मग खरोखरच तो वैनी उठायच्या आधी नांगराला जायचा.
       राजा गं नांगऱ्या
        सर्जा गं आगल्या
        दादा पालव्या लागल्या
असं कौतुक ऐकून त्याला हुरूप वाटायचा. माईनं केलेलं कौतुक तर   खूपच सुखद. ती गायची.
         आपट्याच्या झाडाखाली
         दोगं बसले बापल्योक
         आपली पेरनी झाली ठीक
पेरणीनंतर उभं कवळं पीक डुलायला लागे.
         तिपन्या बाईनं
         आता धरीलं उभं माळ
          रासन्याची का तारामाळ
त्याचे कष्ट त्याची होणारी तारांबळ या करूण ओवीतून ऐकल्यावर त्याचा सारा शीण ओसरून जाई.
     त्याची कवळ्या वयाची बायको भरगच्च पिकलेलं पीक पाहून हरखून जाई. तिचे ओठ गाऊ लागत
          आता शेता गं आड शेत
           कुण्या शेताला बाई जाऊ
           तिथं हेलाव्या देतो गहू
त्याची माय नव्या सुनेचं आणि आपल्या लेकीचं तोडीस तोड रूप पाहून हरखून जाई. जातं तिला गायला सांगे. मग ती नणंद भावजयीचं कौतुक जात्यावर गाऊ लागे.
           आता ननंद भावजयाs येsगं
           शिवंच्या शेता गेल्या
            इजंवनी का चमकल्या
तो पहाटे औताला जाई. त्यालाही शायरी सुचे.
          ढवळ्या रं पवळ्या चल बिगीबिगी....
मोटंच्या कुरकंए s कुरकुंए आवाजाचं संगीत त्याला आव्हान देई.
          हे s  ए  s ए s हा ss
          हो s ओ s ओ s हो ss
असं त्याचं अमूर्त गोड गाणं गळ्यातून ओसंडू लागे.
    बघता बघता पीक भराट्यात येतं. आता कापणी सुरू केली पाहिजे. बायागड्यांनी रान सजीव होतं. भल्लरी सुरू होते.
तो सवाल टाकतो.
तो: भलगडी दादा भला s रे भलगडी दादा
       ह्या वाटेनं राधा गेली का रे दादा
       तिच्या पायात तोडे होते का रे दादा
       भलगडी दादा भला s रे भलगडी दादा
साथी: मो नाही पाहिलो भले s हो भलगडी दादा

       मग कलगीतुरा रंगतो. तोड्याची वळख पटत नाही. तवा तो कमरेला माचपट्टा, गळ्यात वज्रटीक, दंडात वाक्या... अशा ओळखीच्या खुणा सांगतो. शेवटी साथीदार एखाद्या खुणेला ह्या शायरीतून वळख दाखवतो. काम ओसरत जातं. कल्पना, काव्य आणि गायन यात कामाचा त्रास वाटत नसे.
    शेवटी एकमेकांना शाबासकी दिली जाई.
       गबरूचं काम भले s हो भलगडी दादा
       जोंधळा राजा भले s हो भलगडी दादा
        लावावा पट्टा भले s हो भलगडी दादा
...... तो गतस्मृतीतून बाहेर येतो. डोळे ओले झालेले असतात. त्याची गतकाळातली मुशाफिरी संपते आणि हळूहळू तो भानावर येतो.


मंगळवार, १५ मे, २०१८

जोहार : समकालीन अस्वस्थ दैनंदिनीची पाने

'जोहार' ही सुशील धसकटे यांची पहिलीच कादंबरी! लेखकाने या कादंबरीद्वारे साहित्यविशावात दमदार पाऊल टाकले आहे.   
  या कादंबरीचा नायक मल्हार हा मराठवाड्यातल्या खेड्यातल्या एका शेतकरी कुटूंबातून एम.फिल. करण्यासाठी विद्येचे माहेरघर समजल्या जाणा-या पुण्यात येतो. पुण्यात आल्यावर त्याला सर्वप्रथम जाणवते ती गोष्ट म्हणजे, खेडे आणि शहर यामधील विषमतेची प्रचंड दरी!
  विद्यापीठातले राजकारण, जातकारण, कंपूशाही बघून तो चक्रावून जातो. एकीकडे तो मराठी परंपरांच्या मुळांचा शोध घेत राहतो. जातककथा, कथासरित्सागर, गाथासप्तशती, लीळाचरित्र, संतवाड्.मय, दलित-ग्रामीण-स्त्रीवादी साहित्यप्रवाह ते आजचे साहित्य अभ्यासत जातो.
  परंपरांमधील चांगल्या-वाईट गोष्टी व त्यांचा जगण्यावर झालेल्या परिणामांचा अन्वयार्थ लावू पाहतो. तो ज्या शेतकरी समाजातून आला, त्या समाजाच्या अधोगतीचे पुरावे शोधत जातो. दुसरीकडे त्याला येणारे अनुभव पचवत जातो. या अनुभवांची गाथा म्हणजेच जोहार ही कादंबरी होय.
   सध्याच्या अस्वस्थ महाराष्ट्राच्या दैनंदिनीची पानेच या कादंबरीत आलेली आहेत. अलीकडे ज्या घडामोडी झाल्या, एका विशाल समूहाकडून जो असंतोष प्रकट झाला, त्याची कारणे किंवा पार्श्वभूमी शोधायची असल्यास 'जोहार' ही कादंबरी वाचावी लागेल. या अस्वस्थ कालखंडाचे दस्तावेज म्हणून ही कादंबरी महत्त्वाची आहे.
  सांप्रतकाळी चहूबाजूंनी होत असलेली मूल्यांची पडझड, अंगावर येणारी विषमता, जातीय ध्रुवीकरण, टोकदार झालेल्या जातीय अस्मिता, बोकाळलेला चंगळवाद, समाजमनाला आलेले बधीरपण, भ्रष्ट व्यवस्था, कमालीचा स्वार्थभाव, भ्रष्ट साहित्यव्यवहार, खुज्यांची सर्वच क्षेत्रातली लुडबूड व त्यांना आलेले महत्त्व, शेतक-यांची सर्व बाजूंनी होत असलेली नाकेबंदी, गिळंकृत करू पाहणारा जागतिकीकरणाचा कराल जबडा इ. आस्थेच्या प्रश्नांविषयी ही कादंबरी बोलत राहते. या सा-या प्रश्नांनी भोवंडून गेलेला मल्हार मग आधुनिक लीळा रचत राहतो.
   विकासाच्या कुठल्याच संधी नसल्यानं मागे राहिलेल्या ज्या समाजातून मल्हार आलाय, त्या समाजाविषयी तो मूलभूत चिंतन करतो. मोठेपणाच्या चुकीच्या कल्पनांमध्ये अडकून पडलेला, कुप्रथांनी वेढला गेलेला, परंपरांच्या दुष्टचक्रात अडकलेला, व्यवस्थेने उपेक्षित ठेवलेला हा समाज, या समाजाला आलेले दलितत्व, या समाजातली सर्वात शोषित घटक स्त्री व तिचा वेदनेचा प्रवास, हे सर्व या कादंबरीत प्रभावीपणे आणण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
   चार्वाक, बुद्ध, कबीर, तुकाराम,म. फुले,राजर्षी शाहू, डाॅ.आंबेडकर, महर्षी वि.रा. शिंदे, काॅ. शरद पाटील, आ.ह. साळुंखे ही प्रगल्भ वैचारिक परंपरा मानणारा हा तरुण लेखक हा समृद्ध वारसा घेऊन आजचे वास्तव डोळसपणे अधोरेखित करतो. ही कादंबरी आजच्या तरूणाला आत्मभान देण्यास सक्षम असून, खुसखुशीत नर्मविनोदी भाषा, बोलीचा योग्य वापर, उपरोधिक व तिरकस शैली ही या कादंबरीची आणखी काही वैशिष्ट्ये.
   या कादंबरीवर 'नेमाडपंथी' असा शिक्काही मारण्यात आला. पण कुठेच निव्वळ अनुकरण न करता ही कादंबरी स्वतंत्र भूमिका आणि विचार जोरकसपणे मांडते, हे कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय कळणार नाही. नेमाडे पचवून त्यापुढचा टप्पा
या कादंबरीने गाठला आहे.
 भाषेचा वापर, निवेदन, मांडणीचे तंत्र, रचना इ. सर्वच पातळ्यांवर 'जोहार' ही कादंबरी वेगळी आणि सरस ठरली आहे. यासाठी लेखकाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

गझल

   ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आया ...