रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

मोठा आशय असलेल्या 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या'


प्रसाद कुमठेकर या लेखकाची ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ही बहुचर्चित कादंबरी नुकतीच वाचली. म्हटलं तर ही कादंबरी आहे. म्हटलं तर हा कथासंग्रह आहे. म्हटलं तर ही व्यक्तीचित्रे आहेत. एक वेगळाच फॉर्म लेखकाने वापरला आहे. यात एकतीस ष्टोऱ्या आहेत. लघुकथेसारखी दीड ते अडीच पानांची एक ष्टोरी. प्रत्येक ष्टोरीचा निवेदक हा वेगळा आहे. हे निवेदक वेगवेगळ्या वयोगटातील व वेगवेगळ्या स्तरातील आहेत. या ष्टोऱ्यांचा एकमेकाशी संबंध आहे. त्यामध्ये एक सूत्र आहे. म्हणून या रचनाबंधाला कादंबरी असं म्हणता येतं. मराठीत बहुधा कादंबरीचा निवेदक एकच असतो. वि. स. खांडेकरांनी ‘ययाती’ या कादंबरीत ययाती, शर्मिष्ठा, देवयानी या तिघांच्या निवेदन व दृष्टिकोनातून गोष्ट सांगितली आहे. इथे तर प्रत्येक ष्टोरीचा निवेदक वेगळा आहे. त्याची भाषाशैली वेगळी आहे. असे प्रयोग करायला गेल्यास कादंबरी फसण्याची शक्यता असते, पण कुमठेकरांनी यात यश मिळवले आहे. याला कथेकरी फॉर्म म्हणता येईल. हा आपल्या मातीतलाच फॉर्म आहे. जातककथा, लीळांशी नाते सांगणारा हा वाड्.मयप्रकार आहे.
        पूर्णपणे उदगिरी बोलीचा वापर हे या कादंबरीचे एक ठळक वैशिष्ट्य! बोलीभाषेचा इतका सुंदर वापर खूपच कमी कादंबऱ्यांतून झालाय. उदगिरी बोली लेखकाने खूप बारकाव्याने आणि तिच्या अंगभूत वैशिष्ट्यांसह वापरली आहे. उच्चारानुसारी लेखनामुळे बोलीचा लहजा सांभाळण्यात लेखक यशस्वी झाला आहे. कादंबरीच्या शेवटी शब्दार्थाचे परिशिष्टही जोडले आहे. त्यामुळे या बोलीचा परिचय नसणाऱ्या वाचकालाही समजायला कुठेच अडथळा येत नाही.
        ह्या ष्टोऱ्या खूपच गमतीशीर पद्धतीने सांगितल्या आहेत. त्यामुळे कुठेही कंटाळवाण्या वाटत नाहीत. या ष्टोऱ्यांमध्ये ह्युमरही आहे आणि त्याखाली दडलेली करूणाही आहे. लेखकाने आजचे वास्तव खूपच समंजसपणे व प्रत्ययकारी पद्धतीने मांडले आहे. यात दोन पिढ्यांमधला मूल्यसंघर्ष आहे. अलीकडे गावात झालेले बदल आहेत. वास्तवाचा आरसा दाखवणे एवढेच काम निवेदक करत नाही; तर प्रत्येक निवेदकाला स्वतःची मतं आहेत. लेखक परंपरेतल्या सगळ्याच गोष्टींचे उदात्तीकरण करत नाही. जे आऊटडेटेड आहे ते सोडून द्यायची त्याची तयारी आहे. मराठी लेखकांमध्ये विशेषतः ग्रामीण लेखकांच्या लेखनात जो भाबडेपणा दिसतो, तो या पुस्तकात कुठेच आढळत नाही. किंवा सगळंच टाकाऊ आहे; असा उद्दाम अभिनिवेशही नाही. यासाठी लेखकांनं तटस्थतेनं भवतालाकडे पाहणं आवश्यक असतं. असा तटस्थपणा प्रसाद कुमठेकर यांना साधला आहे.
 ‘भिजकं घोंगडं’ ह्या ष्टोरीतले भाऊ गावकडे मिळूनच राहतात. यातले बाकीचे शहरात तर एक गावात असतो. घर एकत्र ठेवल्याचा त्यांना अभिमानही आहे. पण शहरात शिकलेली त्यांची मुलं प्रॅक्टिकल आहेत. जे आमचं आहे ते आम्हाला देऊन टाका; असं मुलं म्हणतात. शेवटी व्हायचा तो इमोशन ड्रामा होतोच. मुलं वाटणी करून घेतात आणि काही झालंच नाही असं एकमेकांशी गप्पा मारत एकाच चुलीवर केलेलं आनंदानं जेवतात. लाठ्याकाठ्या न घेताही वाटणी होऊ शकते हे गावातल्या लोकांसाठी नवीनच आहे. ह्या ष्टोरीचा शेवट यादृष्टीने बघण्यासारखे आहे-
“ पर असं वाटन्यायचं भिजकं घोंगडं घरच्यांच सगळ्यांनी मिळून बकिटीबाहीर काढून, त्येला व्यवस्थित पिळून असं दाराम्होरल्या दोरीवर व्यवस्थित वाळत घातलेलं घर, त्यांनी पहिल्यांदाच पाहत आस्तीन.”
    बदलते दृष्टिकोन, बदलती मानसिकता, बदलता गाव हे सर्व लेखकाने खूपच अचूकतेने टिपले आहे. कादंबरीची अर्पणपत्रिका लक्ष वेधून घेते. ही अर्पणपत्रिका मला एक स्वतंत्र कविताच वाटते.
    मितव्ययी लेखनशैली हे या लेखकाचे आणखी एक वैशिष्ट्य नजरेत भरण्यासारखे आहे. कवितेत असतो तसा गोळीबंद आशय प्रत्येक ष्टोरीत आहे. काही प्रतिमा आणि रूपकंही यात आली आहेत. जीवनाकडे पाहण्याची पूर्वग्रहरहित व मिष्किल दृष्टी असल्याशिवाय असं लेखन संभवत नाही.
   या कादंबरीची अर्पणपत्रिका लक्ष वेधून घेते. ही एक स्वतंत्र कविताच वाटते.
     उदगीर परिसराची भाषिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक,भौगोलिक वैशिष्ट्ये नोंदवणारी ही नव-देशीवादी कादंबरी आहे. ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या कादंबरीने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढून खूप पुढे नेऊन ठेवले आहे. यासाठी लेखक प्रसाद कुमठेकर यांचे अभिनंदन!
       
                 - प्रमोद कमलाकर माने

कादंबरीचे नाव -बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या
                          (द्वितीय आवृती)
लेखक- प्रसाद कुमठेकर
प्रकाशक- पार पब्लिकेशन्स्
पृष्ठे – 120
मूल्य- ₹180

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

पाखरं

जवारीचे कणसं निसवल्यावर, कणसात दुधाचा हुरडा भरल्यावर, भल्या पहाटे रानात पाखरं राखायला जावं  लागायचं. न्याहारीला रात्रीचीच शिळी भाकर, जवसाची चटणी, वर थोडं दही नाहीतर घण्याचं गोडंतेल घातलेलं. चिरगुटात भाकर बांधून, गोफण आणि पत्र्याचा एक डबा घेऊन मी वडील, चुलते किंवा आजोबांसोबत झुंजूरक्याच रानात जायचो. जवारीतल्या आटुळ्यावर उभारून गोफण फिरवायचो.  हाऽ असा आवाज करत काठीनं पत्र्याचा डब्बा वाजवत फिरायचो. गोफणीतून सुटलेला खडा पिकात भिर्रकन पडायचा आणि पाखरांचा थवा चिवचिवत उडून बाजूच्या झाडावर जाऊन बसायचा. मागून उगीचंच वाईट वाटायचं.  भरल्या ताटावरून हात धरून उठवलेल्या लेकरासारखी वाटायची ती पाखरं.
       घरासमोर अंगणात भलंमोठं बाभळीचं झाड होतं. उन्हाळा आला की, आजी कुंभारानं दिलेलं काळंभोर लोटकं झाडाच्या फाट्याला बांधायची. रोज सकाळी मला त्या लोटक्यात पाणी भरायला सांगायची. अंगणात दाणे पसरायची. दाणे टिपायला चिमण्यांची झिम्मड पडायची. तहानलेली पाखरं त्या लोटक्यातल्या पाण्यात चोची बुडवून तृप्त होत. खरंतर तेव्हापासूनच मला पाखरांचा लळा लागला.
     चिमण्या अंगणात बिनधास्त यायच्या. वळचणीला घरटं करायच्या. एकदा चुकून वळचणीचं घरटं हलून त्यातली चिमणीची इवलीइवली लालबुंद पिलं भुईवर पडली आणि चोची वासून मरून गेली. आजही ती घटना आठवली की, अंगावर सर्र्कन काटा येतो. पिसाटलेल्या चिमणीनं दिवसभर घरात हैदोस घातला. शेवटी कुठं बेपत्ता झाली कुणास ठाऊक?
      पिवळ्या पायाच्या काळ्या साळुंकीची आजी गोष्ट सांगायची: ‘साळुंकीचे पाय काळे होते. मोराचे पाय पिवळे. एके दिवशी लग्नाला जाताना साळुंकीनं मोराचे पाय उसने घेतले. घेतले ते  घेतले, पुन्हा परतच केले नाहीत. म्हणून अजूनही मोराचे पाय काळे आणि साळुंकीची पाय पिवळेच दिसतात. म्हणूनच अजूनही मोर नाचताना पायाकडे पाहून रडतो.’ मला खरंखरं वाटायचं. ही लोककथा पिढ्यानुपिढ्या चालत आलेली. आणि शेवटच्याच मुक्कामावर असलेली.
       कधीकधी शेतात हिंडताना अचानक मोरपीस दिसतं; तेव्हा गुप्तधनाचा हंडा सापडल्यासारखा आनंद होतो. कधीकधी वढ्याकडून म्याँवऽ म्याँव ऽ असा मोठा केकारव ऐकू येतो. सकाळी मुगाच्या पिकात फिरताना मोरांच्या पावलांचे ठसे दिसतात. मुगाची सालपटं ओळीनं पडलेली दिसतात. एकदा एकटाच शेताकडे निघालो असताना पिसारा फुलवून नाचणारा मोर समोर दिसला. अनाहूत. मंत्रमुग्ध होऊन जागच्या जागी थिजल्यासारखा उभारून ते अलौकिक आणि दुर्मिळ दृश्य पाहिलं. मोराच्या नाचायच्याही ठरलेल्या जागा असतात. आमच्या चवाळीचं कोपरं, बापूच्या मोरंडीतलं विहिरीजवळचं उमाट... याठिकाणीच हमखास मोर नाचताना दिसायचा.
       कोकीळच्या  कुहूऽला हुबेबूब कुहूऽनं उत्तर द्यायला मजा यायची. मोठा झालो तरी हा मोह आवरत नाही. लेकरांसोबत मीही लेकरू होतो. रान पाखरांच्या संगितानं जिवंत वाटायचं. चिवचिवऽ चिवचिवऽ... कॉयकॉयऽ कॉयकॉय...टिट्ऽ टटिव टिट् ऽटटिव...कुहूऽकुहूऽ... या आवाजांमध्येही मेळ असतो. टिटवीचा आवाज मात्र अजूनही मनात भीतीचं काहूर निर्माण करतो.
    हिवाळ्यात तळ्यावर लांबलचक कारकोचे यायचे. कारकोचांचा थवा उडताना फार सुंदर दिसतो. नंतर कळलं की; हे परदेशी पाहुणे आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून ते आपल्या गावच्या तळ्यावर आलेत याचं अप्रुप वाटायचं. एकदा एक जखमी कारकोचा मासे धरणाऱ्या पोरांनी उचलून आणला. तेव्हा त्याचा भलामोठा आकार पाहून भीतीच वाटली. उडताना किती लहान दिसतात अन् प्रत्यक्ष एवढा मोठा! हल्लीच्या दुष्काळी दिवसात तळंच कोरडं असतं. अर्थातच कारकोचेही येत नाहीत.
       रात्री पिंपळावर झोपी गेलेले बगळे फारच सुंदर दिसतात. पिंपळ पांढराशुभ्र होतो. गुरं चरताना त्यांच्या मागं मागं पळणारा, पाठीवर बसणारा बगळा ध्यान देऊन पहावा. वरून उडणाऱ्या बगळ्यांकडे बघत, हाताच्या बोटांचे नख एकमेकांवर घासत ‘बगळ्या बगळ्या कवड्या दे’ म्हणत बालपण भुर्र्कन केव्हा उडून गेलं कळलंच नाही.
        गुरुजींनी ‘चित्र काढा रे!’ म्हटल्यावर पोपटाचंच चित्र काढायचो. सुंदर पक्षी. निळकंठराजाही असाच सुंदर!
      चिमणी, कावळा, मोर, पोपट, घार, कोकीळ, पावश्या (चातक), सुगरण, साळुंकी, होला, चित्तर, सुतारपक्षी, बदक, बगळा, नीळकंठराजा, हंस इतकेच पक्षी ओळखता येतात. काही ओळखीचे आहेत पण नावं माहीत नाहीत. कित्येक पक्षी माहितीही नाहीत. आमच्या भागातले गुंजोटीचे पक्षीनिरीक्षण करणारे डॉ. सुहास मोहरीर हे कॅमेरा घेऊन आमच्या तळ्यावर पक्षीनिरीक्षणार्थ यायचे. त्यांचे लेखही छापून यायचे. अशा वेड्या लोकांचं मला कौतुक वाटतं.
      पक्ष्यांची संख्या लक्षणीय कमी झालीय. पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले. कित्येक प्रजाती नष्ट झाल्या. माळढोक सारख्या काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
   चिमण्या तर बेपत्ताच आहेत. मोबाइलच्या रेडिएशचाही पक्ष्यांवर घातक परिणाम होतोय, असं वाचलंय. आपण पाखरं जगावीत म्हणून मोबाईल काही सोडणार नाही. मोबाईलवरच पाखरांचे वॉलपेपर, स्क्रीनसेव्हर ठेवू. आणि कलरवाचा रिंगटोन!

   


गझल

  गझल ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आ...