रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

मोठा आशय असलेल्या 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या'


प्रसाद कुमठेकर या लेखकाची ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ही बहुचर्चित कादंबरी नुकतीच वाचली. म्हटलं तर ही कादंबरी आहे. म्हटलं तर हा कथासंग्रह आहे. म्हटलं तर ही व्यक्तीचित्रे आहेत. एक वेगळाच फॉर्म लेखकाने वापरला आहे. यात एकतीस ष्टोऱ्या आहेत. लघुकथेसारखी दीड ते अडीच पानांची एक ष्टोरी. प्रत्येक ष्टोरीचा निवेदक हा वेगळा आहे. हे निवेदक वेगवेगळ्या वयोगटातील व वेगवेगळ्या स्तरातील आहेत. या ष्टोऱ्यांचा एकमेकाशी संबंध आहे. त्यामध्ये एक सूत्र आहे. म्हणून या रचनाबंधाला कादंबरी असं म्हणता येतं. मराठीत बहुधा कादंबरीचा निवेदक एकच असतो. वि. स. खांडेकरांनी ‘ययाती’ या कादंबरीत ययाती, शर्मिष्ठा, देवयानी या तिघांच्या निवेदन व दृष्टिकोनातून गोष्ट सांगितली आहे. इथे तर प्रत्येक ष्टोरीचा निवेदक वेगळा आहे. त्याची भाषाशैली वेगळी आहे. असे प्रयोग करायला गेल्यास कादंबरी फसण्याची शक्यता असते, पण कुमठेकरांनी यात यश मिळवले आहे. याला कथेकरी फॉर्म म्हणता येईल. हा आपल्या मातीतलाच फॉर्म आहे. जातककथा, लीळांशी नाते सांगणारा हा वाड्.मयप्रकार आहे.
        पूर्णपणे उदगिरी बोलीचा वापर हे या कादंबरीचे एक ठळक वैशिष्ट्य! बोलीभाषेचा इतका सुंदर वापर खूपच कमी कादंबऱ्यांतून झालाय. उदगिरी बोली लेखकाने खूप बारकाव्याने आणि तिच्या अंगभूत वैशिष्ट्यांसह वापरली आहे. उच्चारानुसारी लेखनामुळे बोलीचा लहजा सांभाळण्यात लेखक यशस्वी झाला आहे. कादंबरीच्या शेवटी शब्दार्थाचे परिशिष्टही जोडले आहे. त्यामुळे या बोलीचा परिचय नसणाऱ्या वाचकालाही समजायला कुठेच अडथळा येत नाही.
        ह्या ष्टोऱ्या खूपच गमतीशीर पद्धतीने सांगितल्या आहेत. त्यामुळे कुठेही कंटाळवाण्या वाटत नाहीत. या ष्टोऱ्यांमध्ये ह्युमरही आहे आणि त्याखाली दडलेली करूणाही आहे. लेखकाने आजचे वास्तव खूपच समंजसपणे व प्रत्ययकारी पद्धतीने मांडले आहे. यात दोन पिढ्यांमधला मूल्यसंघर्ष आहे. अलीकडे गावात झालेले बदल आहेत. वास्तवाचा आरसा दाखवणे एवढेच काम निवेदक करत नाही; तर प्रत्येक निवेदकाला स्वतःची मतं आहेत. लेखक परंपरेतल्या सगळ्याच गोष्टींचे उदात्तीकरण करत नाही. जे आऊटडेटेड आहे ते सोडून द्यायची त्याची तयारी आहे. मराठी लेखकांमध्ये विशेषतः ग्रामीण लेखकांच्या लेखनात जो भाबडेपणा दिसतो, तो या पुस्तकात कुठेच आढळत नाही. किंवा सगळंच टाकाऊ आहे; असा उद्दाम अभिनिवेशही नाही. यासाठी लेखकांनं तटस्थतेनं भवतालाकडे पाहणं आवश्यक असतं. असा तटस्थपणा प्रसाद कुमठेकर यांना साधला आहे.
 ‘भिजकं घोंगडं’ ह्या ष्टोरीतले भाऊ गावकडे मिळूनच राहतात. यातले बाकीचे शहरात तर एक गावात असतो. घर एकत्र ठेवल्याचा त्यांना अभिमानही आहे. पण शहरात शिकलेली त्यांची मुलं प्रॅक्टिकल आहेत. जे आमचं आहे ते आम्हाला देऊन टाका; असं मुलं म्हणतात. शेवटी व्हायचा तो इमोशन ड्रामा होतोच. मुलं वाटणी करून घेतात आणि काही झालंच नाही असं एकमेकांशी गप्पा मारत एकाच चुलीवर केलेलं आनंदानं जेवतात. लाठ्याकाठ्या न घेताही वाटणी होऊ शकते हे गावातल्या लोकांसाठी नवीनच आहे. ह्या ष्टोरीचा शेवट यादृष्टीने बघण्यासारखे आहे-
“ पर असं वाटन्यायचं भिजकं घोंगडं घरच्यांच सगळ्यांनी मिळून बकिटीबाहीर काढून, त्येला व्यवस्थित पिळून असं दाराम्होरल्या दोरीवर व्यवस्थित वाळत घातलेलं घर, त्यांनी पहिल्यांदाच पाहत आस्तीन.”
    बदलते दृष्टिकोन, बदलती मानसिकता, बदलता गाव हे सर्व लेखकाने खूपच अचूकतेने टिपले आहे. कादंबरीची अर्पणपत्रिका लक्ष वेधून घेते. ही अर्पणपत्रिका मला एक स्वतंत्र कविताच वाटते.
    मितव्ययी लेखनशैली हे या लेखकाचे आणखी एक वैशिष्ट्य नजरेत भरण्यासारखे आहे. कवितेत असतो तसा गोळीबंद आशय प्रत्येक ष्टोरीत आहे. काही प्रतिमा आणि रूपकंही यात आली आहेत. जीवनाकडे पाहण्याची पूर्वग्रहरहित व मिष्किल दृष्टी असल्याशिवाय असं लेखन संभवत नाही.
   या कादंबरीची अर्पणपत्रिका लक्ष वेधून घेते. ही एक स्वतंत्र कविताच वाटते.
     उदगीर परिसराची भाषिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक,भौगोलिक वैशिष्ट्ये नोंदवणारी ही नव-देशीवादी कादंबरी आहे. ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या कादंबरीने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढून खूप पुढे नेऊन ठेवले आहे. यासाठी लेखक प्रसाद कुमठेकर यांचे अभिनंदन!
       
                 - प्रमोद कमलाकर माने

कादंबरीचे नाव -बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या
                          (द्वितीय आवृती)
लेखक- प्रसाद कुमठेकर
प्रकाशक- पार पब्लिकेशन्स्
पृष्ठे – 120
मूल्य- ₹180

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गझल

  गझल ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आ...