रविवार, २४ डिसेंबर, २०१७

इंधन : समृद्ध करणारी कादंबरी

हमीद दलवाई यांच्या 'इंधन' या कादंबरीत कोकणातल्या तत्कालीन समाजजीवनाचे अतिशय कलात्मक आणि वास्तव चित्रण येते. स्वतःच्याच समाजातल्या वाईट प्रवृत्ती आणि चालीरितींच्या विरोधात नायक ठामपणे उभा राहतो; यातून लेखकाचं विवेकीपण अधोरेखित होतं.
     अनेकवेळा नायकाला गावाच्या बिघडलेल्या वातावरणात काहीच हस्तक्षेप करता येत नाही. नायक खूप वर्षांनी गावात आल्याने येतानाच एक अपराधीपणा मनात घेऊन येतो. नायकाने मधल्या काळातला आयुष्यकाल समाजसुधारणा आणि प्रबोधनाच्या चळवळीत घालवेला आहे. गावापासून तुटल्यानंतर गाव कुठल्याच गोष्टीत नायकाला आणि त्याच्या विचारांनाही स्वीकारत नाही. त्याच्या शब्दालाही किंमत देत नाही. स्वतःच्या समाजाचा तर नायकावर हा धर्म बुडवतोय म्हणून रागच आहे. वडील आणि भाऊ या घरातल्या व्यक्तींचाही या गोष्टींमुळे रागच आहे पण एकीकडे नायकाच्या प्रकृतीची काळजीही आहे.
     जीवनातल्या व गावातल्या घटनांवरून नायक नैतिक-अनैतिक संकल्पना, प्रेमभाव, वैर, इत्यादी अनेक मानवी भावभावनांविषयी अनेक अंगांनी विचार करत राहतो. स्वतःलाच तपासत जातो.
      या कादंबरीत कोकणातला निसर्गही एक स्वतंत्र पात्र म्हणूनच येतो. निसर्गाची आणि भवतालाची लेखकाने सजगपणे सूक्ष्म दखल घेतली आहे.
     अनेक हादरवून टाकणाऱ्या घटनाक्रमानंतर नायक मुंबईला निघून जातो तरी त्याचे मन गावातच अडकून पडलेले आहे. गावातल्या भयानक घटनेनंतर गावात काय काय होईल याचा अंदाज नायक बांधत राहतो. पुढील घटनाक्रम तो जुळवत राहतो आणि गाव हळुहळू पूर्वपदावर कसे येत जाईल हे सांगत असतानाच ही कादंबरी संपते.
   भाषेचा योग्य वापर , मनाचा ठाव घेणारे निवेदन, कथावस्तूची कलात्मक बांधणी, निसर्गाचा पार्वभूमीसारखा वापर इत्यादी गोष्टींनी कादंबरी परिपूर्ण झाली आहे.
     या कादंबरीने मला खूप समृद्ध अनुभव दिला. जीवनाविषयीचे माझे आकलन वाढावयास मदत झाली. इतक्या उशीरा मला ही कादंबरी वाचायला मिळाली याची हळहळ वाटत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गझल

   ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आया ...