बुधवार, १९ डिसेंबर, २०१८

चांदवेल

वेल म्हणजे काय? हे कळू लागलं त्या वयात रानात चरणाऱ्या बैलांमागं हिंडताना मी एका  पांढऱ्या फुलाजवळ गेलो.
आजोबांना विचारलं,
'आप्पा, ही कशाचं फूल हाय?'

आप्पा म्हणाले,
'ही चांदयेल हाय. '

'ह्येला चांदयेल का म्हनतेत?'

'ह्येचे फुलं बग.पांडरेशिप्पट हायते का न्हाई? चांदबी पांडराशिप्पट. मनून ह्या चांदावानी फुलाच्या येलाला चांदयेल मनायचं.'

आप्पाचं स्पष्टीकरण एकदम पटलं.  तेव्हापासून चांदवेल माझ्या मनात सारखी हेलकावत आहे.

   चांदवेलीपासून मला वेलींचा छंदच लागला. नवीन वेल दिसली की, आजोबांना तिचं नाव विचारायचा मी सपाटाच लावला.  एकेका वेलीचं नाव कळू लागलं. दुधानी, नागवेल, इचका, भोपळा, कारलं, मोगरा अशा अनेक वेली. कोणती वेल जनावरं खातात? कोणती नाही; ते आप्पा सविस्तर सांगत. वेलींच्या गोष्टीही सांगायचे.

  रानात कोट्यावर भोपळ्याची वेल होती. त्या वेलीला बघत होतो. आप्पांनी अकबर आणि बिरबलाची गोष्ट सांगितली. ती गोष्ट थोडक्यात अशी:

अकबर आणि बिरबल जंगलात फिरत असतात. अकबर भोळ्याच्या वेलीला लागलेले मोठमोठे भोपळे बघून बिरबलाला म्हणतो देवालाही कळालं नाही. एवढ्या नाजूक वेलीला मोठमोठे भोपळे आणि आंब्याचं झाड एवढं मजबूत आणि मोठं असून आंबे मात्र किती छोटे. असं म्हणत अकबर आंब्याच्या झाडाखाली बसतो. बिरबल हळूच झाडावर चढतो आणि एक आंबा तोडून अकबराच्या अंगावर टाकतो. अकबर कळवळतो. बिरबल म्हणतो, एवढ्याशा आंब्याच्या मारानं एवढं ओरडताय. भोपळ्याएवढे आंबे असते तर काय झालं असतं? अकबराला त्याची चूक कळते. तो म्हणतो देवानं बरोबरच केलंय.

     आजी घराच्या अंगणात कारल्याचं बी लावायची. वेल मोठी झाल्यावर मी तिला मांडव करू लागायचो. वेल मांडवभर पसरली की, आम्ही मुलं मांडवाखाली घरकूल करून खेळायचो.

   शेताच्या वाटेनं दुतर्फा मिरगुडाची भरपूर झुडपं होती. त्यावर पिवळी सोन्याच्या तारेसारखी अमरवेल यायची. तिला आमच्याकडं सोनवेल म्हणतात. आम्ही पोरं या वेलीला वायर म्हणायचो. हे वायर ओरबडून घ्यायचो. सारी मिरगूड ह्या पिवळ्या पानं नसलेल्या वायरसारख्या सोनवेलीनं झाकून गेलेली असायची.

    पुढं महाविद्यालयात गेल्यावर जीवशास्त्राच्या एका प्रात्यक्षिकाला ही सोनवेल पुढ्यात बघून धक्काच बसला.  मनात म्हटलं,
 ' आयला! ह्ये वायर अभ्यासक्रमातबी येऊन बसलंय की!'
 बाॅटनीच्या झोंबाडे सरांनी सांगितलं की, 'काही वनस्पती परपोषी असतात. या वनस्पती झाडांचं अन्नद्रवाय शोषून घेतात. अमरवेलही याच प्रकारची वेल आहे. हे असलं ग्यान पचनी पडायला वेळ लागला. तरी वेलींबद्दलची भावना मी रूक्ष होऊ दिली नाही.

    .....अशा अनेक वेली त्यांना चिकटलेल्या अनेक आठवणी मनात रुंजी घालतात.
       
      माझं एक स्वप्न होतं: रानातली चांदवेल पौर्णिमेच्या टप्पोऱ्या चांदण्यात बघावी. चांदवेलीचं फूल की चंद्र? कोण देखणं दिसतंय ते बघावं. माझं हे स्वप्न अद्यापही पूर्ण झालं नाही. रानात  गाजरगवत फोफावल्यापासून चांदवेल कुठं दिसतही नाही. तरी अजून चांदवेल  माझ्या मनात एकसारखी हेलकावतच आहे.

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८

गावरान

सध्या बाजारात 'गावरान' म्हणून जे खपवलं जातं; त्यातलं कितपत गावरान असतं, हा संशोधनाचाच विषय आहे. लोकांना गावरान भाजीपाला, गावरान धान्य हवं आहे; हे व्यापाऱ्यांनी अचूक हेरलंय. गावरान म्हणून विकत घेतलेला भाजीपाला फक्त दिसायला गावरान असतो. चव मात्र नसते.

   पूर्वी शेतात कायकाय असायचं. दुपारची भाकरी खाण्याआधी बाया खुरपता-खुरपता पातरंची, तांदुळजाची, करडईची भाजी गोळा करून आणायच्या. तोंडी लावायला कच्च्या भाज्या असल्याने व्हिटॅमिन कमतरतेची प्रश्नच नसायचा. 

    आम्ही शेतात कायकाय चरत फिरायचो. बोरं, जांबं, सिताफळं, जांभळं, आंबे इ. सिझनल फळे तर खायचोच; रानातल्या पिकातही रानमेवा पेरलेला असायचा. शेता आल्याबरोबर ज्वारीतल्या पिकलेल्या छिन्न्या आणि वाळकांचा घमघमाट नाकात शिरायचा. वानरासारखं वाळकं, छन्न्या खात हिंडायचो. पट्ट्यात वाट्याण्याच्या शेंगा खात फिरायचो. हरभऱ्याचे ढाळे तर आताही मिळतात; पण पूर्वी प्रत्येक शेतकरी घरी लागणारे सगळे जिन्नस पेरायचे. तीळ, जवस, मोहरी, वाटाणा, कारळे, भगर, भेंडी यांचे पिकात पट्टे असायचे. माळव्याच्या वाफ्यात कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, मेथी, पालक, चुका असा भरगच्च मेळा असायचा. तेलासाठी भुईमूग, सूर्यफूल, कुरडई, अंबाडी इ. वाण पेरले जायचे. मटकी, मसूर, बाजरी, जोडगहू, पिवळा(ज्वारी), मका, साळ इ. सगळं कुद्रू-मुद्रू पेरलं जायचं. संक्रांत, नागदिवे आणि येळवस या सणांना बाजरीच्या भाकरी, उंडे केले जातात. खिरीसाठी जोडगहू लागायचे. बाळंतिणीला आणि आजारी माणसाला लवकर ताकत यावी म्हणून काळी साळ आणि काटीजवा हमखास पेरत. काटीजवा हा गव्हाचा एक गावरान वाण आहे. याला कांडून तुपात लाडू बांधून खायला दिले की माणूस लवकर घोड्यासारखा व्हायचा. कारळ्याचं पीठ(कूट) प्रत्येक कालवणात असायचं. त्यामुळे चव यायची. आता सर्रास शेंगदाण्याचं कूट वापरलं जात. त्यामुळे भाज्या चवीला मस्सड लागतात. आता मस्सड म्हणजे काय विचारू नका! माझ्याकडे यासाठी दुसरा शब्द उपलब्ध नाही. असो.

     घरातले वर्षानुवर्षे जतन केलेले बियाणेच वापरले जायचे. माळवदाच्या हलकडीला ज्वारीचे सर्वात मोठे कणसं शेतकऱ्यांच्या घरोघरी अडकवलेले दिसत. तेच पुढच्या वर्षीचे बियाणे असे. प्रत्येकाच्या घरी लाकडी काठीच्या वळणीवर लसूण वाळत घातलेला दिसायचा. गाडग्याच्या उतरंडीत, गुम्म्यात बियाणे वाळवून राख लावून जतन केले जाई. बियाण्यांच्या गुम्म्याला वरून पाचट किंवा चगळ घालून मातीचा लेप दिला जाई. त्याला आमच्याकडे  लिपण म्हणतात. बायाच हे काम करायच्या. आमची आजी कितव्या उतरंडीला कितव्या गाडग्यात कारल्याचं किंवा भोपळ्याचं बी आहे, ते बिनचूक सांगायची. शेतातल्या कोट्यावर किंवा घरांपुढे अंगणात लाकडाचा मांडव करून त्यावर कारले, भोपळ्याच्या वेली सोडल्या जायच्या.

    गुम्मे, सलदं आणि कणग्या, दुरड्या, पाट्या गावातले किंवा फिरस्ते कैकाडी, बुरूड समाजाचे लोक तयार करून देत. यासाठी हे लोक शिंदीच्या झाडाचे फाटे कोयत्यानं सवाळून आणत. घराच्या अंगणात बसून त्यांचे हे विणकाम चाले. कणगी मोठ्या पिंपाच्या आकाराची, गुम्मे मोठ्या डब्ब्याच्या आकाराचे तर सलदं टोपलीच्या आकाराचे असायचे. सलदावर शंक्वाकार झाकण असे. सलदाचा उपयोग पापडं, खारूड्या, कुरूड्या ठेवण्यासाठीच केला जाई. नवीन गुम्मे, कणग्या, सलदं आतून बाहेरून शेणानं सारवून त्यांची छिद्रं बुजवली जात.

     आजोबा शेतावरून येताना धोतराच्या सोग्यात बांधून दररोज काहीतरी रानमेवा आणायचेच. एकदा तर काहीच नवीन नाही म्हणून त्यांनी ज्वारीचे धाटं सोलून आणले होते. ते धाट ऊसासारखे गोड लागले होते. गावरान ज्वारीची किमया. घरी खाण्यासाठी एकदोन पट्टे  गावरान ऊसाची लावणही केली जायची. एकदम मऊ आणि गोड असायचा हा ऊस. दुधाच्या दातांच्या लेकरांनो सोलून खावा असा.

    आमच्या परिसरात त्र्याण्णव साली भूकंप झाला आणि त्यात सगळं मातीत मिळालं. उतरंडी फुटल्या, गुम्मे गडप झाले. गावं नुसते मातीचे ढिगारे झाले. लोकांसोबत त्यांचे बियाणेही मातीत गडप झाले. नवीन घरातून उतरंडी, कणग्याही हद्दपार झाल्या. ते तयार करणारेही उरले नाहीत.

  हरितक्रांतीची पावलं पडत गेली तशी पारंपारिक शेती ही संपुष्टात आली. जमिनीचे तुकडीकरण झाल्याने अल्पभूधारक आणी सीमांत शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. जगण्यासाठी   क्वालिटीपेक्षा क्वांटिटी महत्त्वाची वाटू लागली. जागतिकीकरणामुळे  शेतीवर आणि शेतकऱ्यावरच अरिष्ट आलं. दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी नगदी पिकांच्या मागे लागला आणि शेतातलं बाराजिनसी कुद्रू-मुद्रू अडचणीचं ठरू लागलं आणि पर्यायाने हद्दपार झालं.  कांग्रेस म्हणजेच गाजरगवतासारखे नवनवे तणं शेतात माजू लागले. या तणांनी जुने तणं कुरघोडी करून नष्ट केले. यातच रानभाज्यांचाही अंत झाला. जास्त उतारा देणाऱ्या नव्या संकरित बियाण्यांचा सुळसुळाट झाला आणि गावरान बियाणे कुजून नष्ट झाले.

    कोंभाळणे ता.अकोले जि.अहमदनगर येथील राहीबाई पोपेरे यांनी त्यांच्या घरीच जवळपास 53 पिकांच्या 114 गावरान बियाण्यांचे जतन केले आहे. त्या अशिक्षित आहेत, हे विशेष. तर याच गावातील ममताबाई भिंगारे यांनी सुमारे 100 वाणांच्या बियाण्यांचे जतन व संवर्धन  केले आहे. त्यांचा गावरान बियाणे संवर्धनाचा प्रकल्प खूप महत्वाचा आहे. त्यांची ही गावरान बियाणे बँक पाहण्यासाठी व काही बियाणे विकत घेण्यासाठी  कोंभाळणेला जायची खूप इच्छा आहे.  राहीबाई यांच्या बियाणे संकलनामध्ये बायफ संस्थेचे मोठे योगदान आहे, असे समजते. बीबीसी मराठीने यावर स्टोरी केली आहे. युट्यूबवरही या प्रकल्पाची माहिती मिळेल.  राहीबाई, ममताबाईंच्या या धडपडीचे स्वागत तर करायलाच हवे; पण ज्याला 'गावरान' मेवा पाहिजे त्यांनीही असे प्रयत्न करायला हरकत नाही.

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

Innovation List | Teachers As Transformers - IIMa

Innovation List | Teachers As Transformers - IIMa

'Teachers As Transformers' या IIM Ahamadabad ने विकसित केलेल्या वेबसाईटवर माझे तीन नवोपक्रम प्रकाशित झाले आहेत. इथे अनेक उपक्रमशील शिक्षकांचे उत्तम नवोपक्रम आपल्याला वाचायला मिळतील. यासाठी वरील लिंकला टच करा.

मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१८

सुक ना दुक


गनामामाला सगळं गाव नेता म्हनायचं. गावात कुठला पुढारी आला, परचारसबा आसली की, गनामामा हार घालायला सगळ्यात पुडं. इस्टेजवर खुडचीत गनामामा दिम्माकात बसायचा. गनामामा आडानी  फाटका मानूस, पर कोनी 'नेते' म्हनलं, की ह्याचं आंग फुगायचं. टोप्या घालायला गनामामा वस्ताद. पैशे घेऊन कोर्टात खोट्या साक्शी द्याचं कामबी करायचा. एकदा साक्श द्यायला गेल्यावर गनामामानं पानाची पिचकारी मारली. ती नेमकं बघितलं जजनं. हूं का हूं. टाकलं बसवून. हिकडं आशील हुडकून बेजार. शेवट त्येनं दुसरा साक्शीदार हुडकून भागिवलं. येताना गनामामा दिसला. गरीबावनी तोंड करून बसलेला. दंड भरून सोडवून आनावं लागलं. पावनेरावळे हुडकत नाही तितं जायाचा. खाऊन पिऊन निगताना तिकिटाला मनून धा-पंदरा रूपय मागायचा, लईबी नाही. ह्येच्या शेतात तुरीचं धाटबी नसलं तरबी, जुन्या वळकीवर आडत्याकून तुरीवर उच्चल आनायचा.
     थोरली शकुंतला. तिला समदे 'छकी'च मनायचे. तिच्या पाठीवरचा राजा. गनामामाचं खटलं काय जास्त नव्हतं. बायकू तर गायीवनी गरीब. छकीचं लगीन झालतं. राजाचं लगीन करून गनामामानं त्येला खात-बी-बियान्याच्या दुकानात चिटकावलता. समदं मार्गी लावून गनामामा एक्या दिवशी आंगावर ईज पडून मेला.
     राजा बापाच्या वरचं निगालं. एक आवतन सोडायचंनी. आवतन नसलं तरबी खूत मारून जेऊनच निगायचं. रईवारी सुट्टीच्या दिवशी  मैस घिऊन लोकाचे बंधारे तुडवत हिंडायचं. मैस चारून तैट करायचं. कामाला जातानाबी कुनाची  फुगटची गाडी मिळत्याय का बगायचं. बाप मेल्यावर सरकारी ईमा मिळाला. कोन गाठ पडलं का त्या पैशांचंच बोलायचं. शेवटला 'माजा बाप लई चांगला  होता गा!' मनून रडायचं.
     फुटकं नशीब घेऊनच छकी जन्माला आली. छकीचा सोभाव  सुतासारका सरळ. तिला आचपेच कळतनी. भोळंभाबडं छकी. बिनमळी. सासू कजाग. भांडन केल्याबिगर तिला भाकरच गोड लागतनी. नवरा ट्रकडायवर. बेवडा. मायीचं आयकून छकीला गुरासरकं बडवायचा. जाच सोसत का व्हयना छकी नांदलालती. दोन सोन्यासरके लेकरं झाले. लेकरावाकड बगून रोजगार करत, शिव्या खात, मार खात तिनं संवसार करलालती. नवरा एडसनं धरनीला पडला. छकीनं त्येचं समदं केलं. माय मननारीबी नाकाला पदर लावून लांब बसायची. इळबर वदरायची. 'हिनंच पांडऱ्या पायाची हाय. इवशी घरात शिरली मनून तर माज्या  लेकराची कड लागली.' मनायची.
     नवरा मरून गेला. दोन लेकरं घेऊन छकी माहेरच्या आसऱ्याला आली. ह्या कडू राजाच्या जीवाला घोर लागला संबाळायचा.
वरल्या वाड्यातली सरूआत्या आलती गिरनीला दळन घेऊन. तिला बगून छकी गडबडीनं बाहीर आली.

छकी मनली,
"लई चांगलं लगीन झालं मन की ये तुझ्या पुरीचं."

" हूं! का करावं? चिट्टी दिऊनबी तू आलनीसच की लगनाला."

"लई  जीव वडलालता ये आत्या, पर ह्येन्ला  लईच  झालतं बग. हालायलाबी येना झालतं. कसं यिऊ सांग  ह्येन्ला टाकून?"

"काय बाई तुझं दैव छकी! शाऊ लेकराचं वाटूळं  झालं. रांडा सुकानं नांदलालत्या. सासू आसली. यी गं कळी न बस पाटकुळी. जाच सोसूनबी तू नांदायला नगं म्हनलनीस. कसला का आसना नवरा बिचारा, पर तुला आर्द्या हिरीत सोडून निगून गेला. म्हायेरच्या आसऱ्याला आल्यायस पर बापबी मरून गेला. राजाबी लई हावलाखोर हाय कडू भाड्या. बाईचा जलमच वंगळा बग. दुबत्या जनवारावनी जन्माला आल्याबरूबर गळ्याला दावं..."
सरूआत्या भडभडा बोललाली. छकी उगू गप आइकुलालं खाली बगत.

"म्हायेर, सासर, कोनचं आपलं की काय की? तुला बगितल्यावर पोटात चर्र करतंय बग." सरूआत्याला दुक दाटंना. पदर डोळ्याला  लावून बसली.

छकी हासंतच मनली,
"उगूच आवगड वाटून घिवलालीस माय. नशिबात आसल्यालं  का चुकतंय? माय-आन्नानं चांगलं घर हाय मनूनच दिलते की तितं. ती काय की मनतनीते गोम कुटं हाय तर...."

दोघी सुकदुक उकलत बसल्या. जरा वेळानं सरूआत्या गेली. छकी  तसंच बसलं. सुक ना दुक आसं.
     छकी आधीच काळी. त्येच्यात भुंडं कपाळ. गालं बसलेले. डोळे खोल. तोंड लईच वटवट दिसलालतं. वरचीवर बारीकबी दिसलालती. राजाचं ध्यान कुठं ऱ्हातंय घरात? त्येला बायकूकड बगायला फुरसत नाही. भैन तर लांबच ऱ्हायली.
    राजाची बायकू रंगी. तिच्या बापानं तिला वटी यिऊन वरीसबी लोटू दिलनी. हाडं भाजून मोकळा झाला. एकाम्हागं एक लेकरं हून रंगीबी पार चिपाड झालती. नवरा आसला माकडावनी.
     रात्री उशीरा मटरेल तोंडात धरून राजा आला. रंगीनं ताट वाडलं.

"ती थुका आता तोंडातलं. आन चुळ भरून जेवा."

राजा तोबरा धरून 'हूं ' मनला. चूळ भरून जेवाया बसला. वचवच वान्न्यारावनी जेवलाला. रंगीचं बोलनं चालूच होतं. आसं झालं. तसं झालं. हेचं ना जेवल्यावर ध्यान, ना बोलन्यावर.

"आवोऽ ताई लई वंगळं दिसलालत्या."

"हूं. " मचमच मच...

"त्येंचे मालक एडसनं मेलते जून की ओऽ"

"तुज्या मायला." राजा.

"तुमी काय बी मना. मला तर तीच संवशय यिवलालाय. कमीपना वाटाया का झालंय? उगवू संवशय तर काडा. लव्हाऱ्याला न्हिवून दावा. सरकारी दवाखान्यात रगत तपासल्यावर कळतंय मन ओऽ"

राजा गप हात धिऊन उटला. लक्षुमीच्या कट्ट्यावर आला. समोरच्या टपरीत एक छिटा सुपारी सांगून रामतात्याजवळ येऊन बसला.

 " आज केलो बगा एक नोट खडी तात्या."

आसलंच बोलनं कडूच्या तोंडात. हावरं मुलकाचं. सदा डोस्क्यात  पैशाचं येड. आसा मनात इचार करत तात्या मनले,
 "छकीला का झालंय रे? लई वंगाळ दिसलाल्याय. जरा दावावं का न्हाई डाक्टरला. काय तर टानिकबिनीक दिल्यावर फरक पडतंय."

" अय! का होतंय तात्या? आसं झालंय मनून दोसरा काडल्याय जून. कायबी झालनी."

" तसं नव्हं रे, दावायचं दाव बर!" जोर देऊन तात्या मनले

"हूं! बगू."  राजा.

        शेवट राजानं शकूताईला लोहाऱ्याच्या सरकारी दवाखान्यात न्हेला. रगत तपासलं. डाक्टरनं राजाला बोलवून घेऊन रिपोट दिला. एड्स हाय मनून सांगितलं. भाऊ बाहीर आल्याआल्या छकीनं  इचारलं,

"का मन ये भाऊ डाकटर?"

"कायबी नाही चल."
मनत राजा  छकीला घेऊन स्ट्यांडवर आला.
यसटीत बसून राजानं पक्का इचार केला. उद्या शकूताईला रानातल्या कोट्यात हालवायचं.
    छकीला  कोट्यात टाकल्यापसून सोयरे, गावातले लोकं रोज बगायला याचा सपाटा सुरू झाला. येवस्ता करायला मायीशिवाय कोन ऱ्हातंय? रंगीला तर घर सोडाया कसं जमतंय? तिचे दोन, छकीचे दोन लेकरं, नवरा, सासू-नंदंचा डब्बा... छकी मयाळू. त्येच्यात तिच्या आयुश्याचं आसं मातरं  झाल्यानं लोकबी लईच सुटलं तिला बगाया  कोट्यावर. गावकरीच शेत होतं. काय आवगडबी नाही. रोज सकाळी घरला येताना माय कोट्यातले बिस्कुटपुडे आनायची. रंगीच्या, छकीच्या लेकरावाला रोज च्यासंगं बिस्कुटं खायाला मिळलाले. राजाबी मागायचाच दोन बिस्कुटं.

    उनासंगं छकीचं दुकनंबी वाडत चाललं होतं...........

      उनाचं जिजाक्का छकीला बगाया आलती. जिजाक्काची छकीवर बारकी आसल्यापसूनच मया. 'बाजंवर पडल्याली छकी हातरूनात दिसना सुद्द्या झाल्याय की माय!' वाटलं जिजाक्काला.

आक्काला बगून छकी उल्लास आनून मनलं,
"यी ये! ह्यवडं उनाचं का आल्यायस आक्का? जरा तवरून येवं का न्हाई ये?"

 आक्का बाजंवर बसत मनली,
"आले माय. घरातबी रकरक करलालतं. तुजीच याद यिवलालती. आले सरसर. का लई लांब हाय?"

जिजाक्कानं पुडा हातात दिल्यावर छकी रागानं मनली,
"मी का नेनती हाव का ये? कशाला आनल्यायस? उगू बोलून जायाचं दोन गोश्टी."

कोरड्या व्हटावर जीब फिरवत छकी बोललाली.
" आक्का, मायच करलाल्याय बग माजं समदं. आता हामी मायीचं करायचं, तर आजूबी मायीकूनच करून घेवं का ये? मी मेल्यावर आता कुटं जातेव ये? पुन्ना मला आसली माय मिळंल का ये?"

 छकीचे डोळे डबडब भरले. मायनं रडायचा सूरच काडला. जिजाक्का दोगीलाबी समजावलाली. आपूनबी रडलाली.

"माय, आक्काला शरबत तर कर ये. लिंबू हाय जून की. " छकी.

" गप्प. रोज तुला बगाया ढिगारा लोकं यितीते. का सगळ्याला शरबत पाजवत बसाया जमतंय?" आक्का कळवळून मनली.

    छकीनं डोळे झाकल्यावनी केली. पुना डोळे उगडून मनली,
" बग माय, तुला अक्काच्या पुडं सांगलालेव. मी मेल्यावर पंडूचं ट्याकटर सांगून न्ही ट्याकटरमदी. कुनाच्या तोंडाकड बगत बसनूक. लोकं कायबी बोलतीते. ध्यान दिवनूक. तुला बोलनं सोसतनी आदीच. लोकाचे तोंडं का धराया येतंय, व्हय ये आक्का?"

मधीच छकी आक्काकड वळली.
"बग ये आक्का, माजंमाजं ताट, वाटी येगळं ठीव मनलं तर आयकंना माय. त्येच्यातच जेवत्याय आपूनबी. आपलापून जपून ऱ्हावं का नाही बर? तू तर सांग ये!"

जिजाक्का चमकून मनली,
"व्हय वो, लेकराचं खरंच हाय की!"

"....आनी का माय, माजी पोरगी तू संबाळ. आजू नेनती हाय. पोराला सासूकड सोडून यी. तिला तर दुसरं कोन हाय? आनी दोनीबी लेकरं तुज्याच गळ्यात नकू माय..."

बोलत बोलत छकीची नजर कोट्याबाहीर गेली. उनानं एकदम तिचे डोळे बांदल्यावनी झालं. बोडक्या रानावर चिटपाखरू दिसत नव्हतं. उनाच्या झळानं शिवार करपल्यावनी झालतं. व्हावटळीनं कडब्याचा पाचोळा गरगरत वर वर आबाळाला जावलालता.
------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिध्दी: मिळून साऱ्याजणी (डिसेंबर 2010) साभार
 चित्रे साभार- सुयोग कांबळे
टिप- कथेचे पुनर्लेखन केलेले आहे.

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

घर

आमचं मातीचं घर होतं. मागं सात खण इमला. पुढे पत्र्याची ओढणी. मोठं अंगण. एका बाजूला गुरांचा गोठा. वाड्याच्या बाहेरच्या भिंती शेणानं सारवलेल्या. खोल्यांमध्ये फक्त पांढऱ्या मातीचं पोतरं. खाली धूम्मस केलेल्या जमिनीवर शेणाचं सारवण. अंगणात शेणाचा सडा. सडा-रांगोळ्या झाल्यावर घर कसं लख्ख व निर्मळ वाटे.
    देव्हाऱ्यावर ज्ञानेश्वरी. तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, हरिपाठ, शिवलीलामृत आदि ग्रंथ बासनात व्यवस्थित बांधून ठेवलेले असायचे. देव्हाऱ्यात दोन लंगडे बाळकृष्ण, घोड्यावरचा सिद्धनाथ, विठ्ठल-रखुमाई, अंबाबाई, गणपती...अशी देवांची वर्दळ. अंगणात तुळशीचा कट्टा. तुळशीबुडी महादेवाची पिंड.
    इमल्याच्या दोन खोल्यांना लागून एक जुनी अंधारी खोली होती. या खोलीत फासा, कुऱ्हाडी, चाडे, नळे, कुदळी...अशी इकनं, गठुडे, घुंगुरमाळा, दृष्टमण्यांच्या माळा, मुंगसे, जुनी गंजाटलेली तलवार, पाळणा, मोठमोठ्या रव्या, हंडे, गाडग्याच्या उतरंडी, कनगी, गुम्मे....असे बरेच अडगळीचे सामान असे. त्या खोलीची मला फार भीती वाटायची. मी रूसल्यावर आजी मला भीती घालायची, "गप्प बैस, न्हायतर जुन्या खोलीत कोंडवीन."
मी शहारून गप्प बसायचो. हळूहळू या खोलीची भीती कमी झाली. आईच्या पदराला घट्ट धरून कधीमधी खोलीत जाऊ लागलो. सुट्ट्याला आत्याचे लेकरं आल्यावर मी त्यांना दहशत घालू लागलो, " जुन्या खोलीत बावा हाय." ते मानायचे नाहीत. मग मी त्यांना दारापाशी थांबायला सांगून; आत अंधारात जाऊन खुंटीवरच्या घुंगुरमाळा वाजवायचो. बाहेर येईपर्यंत सगळे आवाज ऐकून पसार झालेले असायचे. नंतर ते मला विचारायचे, "भावजी, तुला तो बावा कसा खात नाही रे?"
मी सांगायचो, " त्येनं माजा दोस्त हाय."
घरात कुणी रागावलं की, मी जुन्या खोलीत आतून कडी घालून, अंधारात दिवसभर उपाशी बसायचो." बाहेरून कुणी कित्ती विणवलं तरी बाहेर यायचो नाही. आजोबांची प्रेमळ हाक ऐकल्यावर मात्र नाईलाज व्हायचा.
      चौथीच्या इतिहासातील शिवराय व मावळ्यांचा प्रताप भान विसरून वाचायचो. अन् त्या जोशात जुन्या खोलीत जाऊन; ती काळी जड तलवार कशीबशी हातात घेऊन हात फिरवायचो. शिंक्यावरच्या मोठ्या सलदाला शत्रू समजून घाव घालायचो.
      वाड्यात एका बाजूला अर्धवट बांधकाम झालेला गोबरगॅस होता. दोन्ही बाजूंच्या हौदांमधून आत उतरायचो. आतील भाग मंदिरासारखा. वर गोलाकार घुमट. उन्हाळ्यात तिथं थंडगार वाटायचं. हीच आमची खेळायची जागा.
       मी चौथीला गेल्यावर शेजारच्या मनामायनं अभ्यासासाठी तिनं स्वतः तयार केलेली चिमणी दिली होती. माझ्या शिक्षणाला मिळालेली ही पहिली प्रेरणा! त्या दिव्याउजेडी बसून मी कवाबवा घटकाभर पुस्तकातली चित्रं बघायचो. चिमणीचा धूर नाकात जाऊन नाक काळंभोर झालेलं सकाळी दिसायचं.
     पडवीला वडील, चुलते, बामणाचा पबाकाका, हबीबचाचा यांच्या रामायण, महाभारत, पुराण, संत, भक्ती, शेती या विषयांवरच्या गप्पा चालत. आम्ही भावंडं शांत बसून या गोष्टी ऐकायचो. काही कळायचं. काही कळायचं नाही.
      आप्पांची बाज अंगणात. मी त्यांच्याजवळ झोपायचो. ते चांदण्या रात्री आकाशातील तिफण, इच्चू, ध्रुव अशा नक्षत्रांची ओळख करून द्यायचे. मला चांदण्या मोजून दाखव म्हणायचे. थोडावेळ माझी मज्जा बघायचे. आप्पांनी मला बाजेवर पडल्या-पडल्या अनेक अभंग शिकवले. नाटी शिकवल्या. मी त्यांच्या मागे म्हणायचो.
    'आम्ही कुणबियांची मुलं।
     आम्हा सार्थक विठ्ठल ॥
     धरिला द्रव्याचा नांगर ।
     काशा काढितो सागर ॥
     रामनामाची कुऱ्हाडी ।
     प्रपंचाच्या पालव्या तोडी ॥
  मी अभंग म्हणत होतो. वडील आप्पांना म्हणाले, " उगू कायबी शिकवनूक त्येला. ही अभंग गाथ्यात नाही. मनानं जोडलेला हाय."
आप्पा म्हणाले, " हाय गा ! नामदेवाच्या गाथ्यात हाय." मग वडील निरूत्तर होत.
      जनावरांचा गोठा साफ करून वाड्याचं सडासारवण करता-करता आई मेताकुटीला यायची. घरात दारिद्र्य असूनही सडासारवण, रांगोळ्या अशा नीटनेटकेपणामुळेच या घरच्या लेकी म्हणजे आमच्या आत्या चांगल्या घरी गेल्या. अडीनडीला, दुष्काळानं गांजून एकेक जनावर विकून टाकल्यानं गोठा रिकामा झाला. काही दिवसांनी गोठाही काढून टाकण्यात आला.
       खोल्यातली भूई खडबडीत झाल्यावर धूम्मस केली जाई. जमीन खोदून, पाणी-माती कालवून, सपाट करून, पुन्हा बडवून सपई केली जाई. उन्हाळ्याच्या दिवसांत धूम्मस केलेल्या घरात थंडगार वाटे. वर लाकडी फळ्यांचा इमला (माळवद). इमल्याच्या खोलीत उन्हाळ्यात थंडगार तर हिवाळ्यात उबदार वाटे. हा इमला वडिलांनी माळाला सात पोते तुरी झाल्यावर घातला. पाच पोत्यांना  तेराशे रूपये पट्टी आली आणि वडलांचं 'इमल्याचं' स्वप्न पूर्ण झालं. इमला घातला त्यावेळी मी रांगत होतो म्हणे!
      मोठ्या माणसांचा डोळा चुकवून  न्हाणीघराच्या आखूड भिंतीवरून उडी मारून मी पाटलाच्यात टीव्ही पहायला जाई. तेव्हा गावात तेवढाच एक टीव्ही होता. एकदा टीव्ही बघत पाटलाच्या सोप्यात बसलो होतो. बाहेर खूप अंधार पडलेला. दारातून हाळी ऐकू आली, "बाग्याऽव" मी तटकन उठून बाहेर आलो. बाहेर मुसळधार पाऊस. वडील पोत्याचं घोंगतं पांघरून आलेले. वारं-वावधान. ईजा चमकत होत्या. वडलांच्या पुढंपुढं घरी आलो. मोठ्या दारातून आत आलो. समोरची सोप्याची भिंत ढासळून पत्रे खाली आले होते. वडलांनी शिव्या-मन-शिव्या दिल्या. पोटभर शिव्या खावून झोपी गेलो. नशीब! मार मिळाला नाही. वडलांनी कधी पाची बोटांनी शिवलं नाही. आईचा मार मात्र उठता-बसता खायचो. कामाच्या दगदगीनं आणि घरातल्या लोकांच्या बोलाला वैतागून सगळा राग ती माझ्यावर काढायची.
     पुढं भूकंप झाला. तेव्हा अंगणात पत्र्याच्या खोपी घातल्या गेल्या. तेव्हा साऱ्या गावात खोपीच खोपी. माणसांना या खोलीत वाकूनच वावरावं लागे. या त्रासाला कंटाळून शेवटी आम्ही बैलगाडीनं वढ्यातले बेशरमाचे सोट कापून आणले. त्यांचं कूड गुंफून अंगणात पत्र्याच्या दोन वढण्या घातल्या. बरीच वर्षं त्या बेशरमाच्या कुडाच्या घरात राहिलो. कधी स्वप्नातही असं रहायचा विचार केला नव्हता.
       पुढं काही वर्षांनी भूकंप पूनर्वसन अनुदान म्हणून एक खोलीच्या बांधकामाचे साहित्य आणि थोडे पैसे मिळाले. त्यात काही पैसे घालून आम्ही पक्क्या विटांचा वाडा बांधला. खोल्यांना दारं, भिंतींना गिलावा, फरशी....काहीच करू शकलो नाही. या पक्क्या इटकुराच्या लाल घरातही बरीच वर्षं काढली. पुढे दहाबारा वर्षांनी उरलेली कामं माझ्या हातानं झाली. घराला घरपण आलं. आता तर आरसीसी घरही बांधून झालं. पण वडलांनी हौसेनं बांधलेलं मातीचं, इमल्याचं, धूम्मस केलेलं, सडा-सारवण-रांगोळ्यांचं, गोठ्यासहित मोठ्या अंगणाचं ऐटदार घर; 'घर' या नावाला शोभणारं होतं.

    (पूर्वप्रकाशित : तिफण)

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

आमराईतले दिवस


  शाळेच्या परीक्षा संपल्या की, कोंडलेलं मांजर धूम पळावं तसं मी आमराई गाठायचो. मला बघितल्यावर गुरं सोडून आमराईत धिंगाणा घालणारे गुराखी लगोलग गुरं वळवायचे.
    आख्खं शिवार जळताना आमराईतली सावली थंडगार वाटायची. दिवसभर आमराई हलू द्यायची नाही. आमराई साऱ्या शिवाराला साद घालायची. सकाळची कुळवपाळी आटपून आजूबाजूचे कुळवकरी दुपारी आमराईत टेकायचे; अन् बापाचा गप्पांचा फड रंगायचा. आम्ही पोरं इळभर सुरपारंब्या खेळण्यात दंग. माकडासारखं ह्या फाट्यावरून त्या फाट्यावर. आमचा गलका वाढला की बाप वरडायचा. मग आम्हाला गुपचूप ओळीनं झोपावं लागायचं. खेळून, दमून गडद झोप लागायची. ऊनाचा एखादा चुकार ठिपका तोंडावर आला की, झोपमोड व्हायची. बाप जागा बदलून झोपायला सांगायचा. आमराईत ऊनाच्या झळाही लागत नसत. थंडगार! झिरपणाऱ्या खापरातल्या बिंदगीतलं पाणीही थंडगार!
    मग झोप मारून झाल्यावर पडल्या-पडल्या नजर इकडून तिकडं पळणाऱ्या खारींवर जायची. तुरूतुरू एखादी खारूताई वर-वर जायची. माझ्या नजरेचा पाठलागही सुरूच असायचा. एक नेमक्या आंब्याजवळ जाऊन खारूताई त्याला टोकरायची. त्या टोकरलेल्या ठिकाणी लालबुंद दिसायचं. मी एकदम आनंदानं उठून; सरसर चढून तो पहिला पाड तोडून आणायचो. पडलेल्या पाडांवरून आम्हा पोरांची भांडणं लागायची. मग वाटणी. मला फक्त कोय!
     पहिल्या पाडाचा शोध खारूताईनं लावल्यापासून, आमराईची राखण करायची एक नवी जिम्मेदारी आमच्यावर न सांगता पडायची. मग दररोज सकाळी जल्दी उठून, भाकर घेऊन आमची टोळी आमराईत दाखल व्हायची. गेल्याबरोबर पाड हुडकायची स्पर्धा लागायची. दुपारपर्यंत पडलेले पाड तोंडी लावायला घेऊन आम्ही जेवायचो. साधंच जेवण अगदी गोड लागायचं.
       आमराईतलं प्रत्येक झाड वेगळं. एक गुठली आंबा. त्याचे आंबे फारच लहान. साखरआंबा खूप गोड. शेपूच्या भाजीच्या चवीचा शेपूआंबा.  केसरआंब्याच्या कोयीला केसरच जास्त. एक खाराचा (लोणचं) आंबा. रसाचा आंबा. या गावरान आंब्यांच्या जाती आता नामशेष होत आहेत. आमच्या साखरआंब्याच्या चवीपुढे तर हापूस सुद्धा झक मारतो. साखरआंब्याचा एक तरी आंबा खाल्ला तरच मला आंबा खाल्ल्यासारखं वाटतं. या आंब्याच्या कोया मी लावल्या होत्या. दोन उन्हाळे जमादाराच्या डुबीचं पाणी खांद्यावर आणून झाड जगवले. तरी झाडं पुढं जगले नाहीत. बारक्या बंधूनेही अशीच खटपट करून पाहिली; पण यश आलं नाही. असो.
     पाड पडल्यानंतर आम्ही पोरं एकमेकांना चोरून आंब्याची अढी घालायचो. एकमेकांच्या अढ्या शोधून काढायचो. दुसऱ्याच्या अढीतले आंबे बिनपत्त्यानं फस्त करताना मजा वाटायची. पुन्हा बघतो तर माझ्या अढीचाही कुणीतरी चोरून फडशा पाडलेला असायचा.
  उन्हाळ्याचे रखरखीत दिवस आमराईच्या संगतीनं सुखात जायचे. आंबे उतरवताना हातांना, तोंडाला चीक उतून दुखं पडायचे, तरी त्याचा तेव्हा गुमानच नसायचा. आंबे उतरून झाल्यावर आमराई सुनी-सुनी वाटायची.
  माणसांना, गुरांना, पशुपाखरांना, भर उनात मायेची सावली देणारी आमराई...पुरणपोळीला मधुर आमरस देणारी आमराई... मधमाशांना पोळं करायला आसरा देणारी आमराई... ती आमराई आता उध्वस्त झालीय. त्यातलं एक आंब्याचं झाड वाढत्या वयाच्या खुणा अंगावर वागवत कसंबसं तग धरून उभं आहे. तेही बिचारं एकटेपणानं कावून गेलंय. जास्त दिवस टिकेल असं वाटत नाही.

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

नांदून केलं नाव

माझ्या आईच माहेर गावातलंच. तिचं घर भजनाचा वाडा म्हणून ओळखलं जातं. तिच्या ढेळजंला दररोज रात्री पंचपदीचं भजन व्हायचं. तिचे वडील हरिभाऊ हे मृदंग वाजवायचे. प्रसंगी कमरेला पंचा बांधून कीर्तनही करायचे. तिचे चुलते रामभाऊ हे उत्कृष्ट गायक. प्रचंड पाठांतर. माझ्या आजोळच्या घरासमोरच सप्ता व्हायचा. आईचं नाव चमाबाई. ती थोरली. तिला दोन बहिणी, दोन भाऊ. मी माझ्या आजीला पाहिलं नाही. आईच्या लग्नाआधीच ती वारली. ती अतिशय सुंदर होती. नाकेली आणि गोरीपान होती, असं आई सांगते. आमच्या शेजारचं 'व्हंताळ' हे आजीचं माहेर. आजी कॅन्सरनं गेली. तिच्या थानाला गाठ आली होती. आपरेशन करून एक थान काढून टाकला होता. आईच्या लग्नाची सगळी तयारी आजीनं करून ठेवली होती. घरचा खपली-गहू, दाळी इ.तिनं कनगी, गुम्मे भरून लिपन लावून ठेवले होते, असं आई सांगते.
   आमचं वडिलांचं घरही वारकरी. आजोबा, वडील, चुलते तिच्या घरी भजनाला जायचे. आजी आमच्या वडिलांना (भाऊंना) जावईबापू म्हणायची. आज्याला मळा-माळ- बरड अशी  तीस एकर शेती होती. त्यातली सोळा एकर पुढे एमआयडीसीत गेली. असो. शेताला बघून आणि पोरगं वारकरी म्हणून माझ्या आईच माहेर गावातलंच. तिचं घर भजनाचा वाडा म्हणून ओळखलं जातं. तिच्या ढेळजंला दररोज रात्री पंचपदीचं भजन व्हायचं. तिचे वडील हरिभाऊ हे मृदंग वाजवायचे. प्रसंगी कमरेला पंचा बांधून कीर्तनही करायचे. तिचे चुलते रामभाऊ हे उत्कृष्ट गायक. प्रचंड पाठांतर. माझ्या आजोळच्या घरासमोरच सप्ता व्हायचा. आईच नाव चमाबाई. ती थोरली. तिला दोन बहिणी, दोन भाऊ. मी माझ्या आजीला पाहिलं नाही. आईच्या लग्नाआधीच ती वारली. ती अतिशय सुंदर होती नाकेली आणि गोरीपान होती, असं आई सांगते. आमच्या शेजारचे व्हंताळ हे आजीचं माहेर. आजी कॅन्सरनं गेली. तिच्या थानाला गाठ आली होती. आपरेशन करून एक थान काढून टाकला होता. आईच्या लग्नाची सगळी तयारी आजीने करून ठेवली होती. घरचा खपली-गहू, डाळी इ. तिनं कनगी गुम्मे भरून लिपण लावून ठेवले होते, असं आई सांगते.
  आमच्या वडिलांचं घर वारकरी. आजोबा, वडील, चुलते तिच्या घरी भजनाला जायचे. आजी आमच्या वडिलांना (भाऊंना) जावईबापू म्हणायची. आज्याला मळा-माळ-बरड अशी तीस एकर शेती होती. त्यातली सोळा एकर पुढे एमआयडीसीत गेली. असो. शेताला बघून आणि पोरगं वारकरी म्हणून आमच्या घरी आईला द्यावं, असं आजीला वाटायचं. पण कधीकधी इथं द्यायला तिला नकोही वाटायचं. एवढी शेती असूनही हे लोक जवारीसाठी पिशवी घेऊन हिंडतेत. लई गरीबी हाय म्हणून ती विचार झटकून टाकायची.
    आईला मुरूमचं स्थळ सांगून आलं होतं. आजोबा पाहुण्यांकडे निघाले होते. पण त्यांना कीर्तनकार महाराजांनी अडवलं. कमलाकर चांगला आहे. शेत चांगलं आहे.आज ना उद्या गरीबी हाटंल. पोराच्या वाट्याला दहा एकर शेत येतंय, असं म्हणून आजोबांची समजूत काढली. इकडच्या आज्यालाही महाराजांनी थाटवलं. अन एकोणेऐंशीच्या मार्च महिन्यात दारातल्या सप्त्याच्या मांडवातच आई-भाऊंचं लगीन झालं.
  माय गेल्यावर आई खूप खचली होती. सतत आजारी पडायची. तिच्या चुलतीनं तिला सावरलं होतं. आईचं लग्न होईपर्यंत आईच त्या घरची माय झाली होती. आजोबांनी आईला व तिच्या भावंडांना कधीच शेतातली काम लावली नाहीत. खाऊन-पिऊन सुखी असं घर होतं. प्रसंगी आजोबांनी पिठाच्या गिरणीवर, खताच्या दुकानात काम केली. पण लेकरांना सुखात ठेवले. पण आजोबांमध्ये एक अवगुण होता. ते फारच तर्कटी व हेक्काडी होते. थोडं जरी मनासारखं नाही झालं तरी ते ताट भिरकावून द्यायचे. अबोला धरायचे. आठ-आठ दिवस जेवायचे नाहीत. या स्वभावामुळे आईसकट सगळे त्यांना खूपच घाबरायचे.
      लग्न होऊन आई खोपटवजा घरात आली तेव्हा लग्नाच्या दोन नणंदा, दोन दीर होते. दोन नणंदा लग्न होऊन गेलेल्या. सात-आठ माणसांच्या खटल्यात ती दाखल झाली.
     आईला पांढऱ्या मातीची अॅलर्जी होती. तिला सतत खोकला यायचा. भाऊंना हे लग्नाआधी माहीत होतं तरी त्यांनी या 'खोकल्याम्माला' स्वीकारलं होतं. आम्ही मुलं भाऊंना चिडवतो 'तुमचं आईवर प्रेम होतं का नाही? खरं सांगा!' म्हटल्यावर ते खुलतात. मान्य करतात. तिच्याचसाठी भजनाला जायचो म्हणतात. आईही लाजून हसते. 'व्हय! खरं वाटलं बघा. लेकरावाला उगू कायबी सांगनूका. मी तर तुमाला बगायलाबी नव्हते.'  म्हणते.
 मग भाऊ छेडतात, 'चोरून बघत नव्हतीस का? तुझ्या मायला, खरं सांग.' आम्ही पोट धरुधरु हसू लागतो.
   आईचं सासरमध्ये खूप शोषण झालं. आजी तिला पहाटे चान्नी निघायला उठवायची. अन स्वतः पुन्हा झोपायची. तिला मोठा वाडा, जनावराचा वाडा झाडून, शेण काढून, दुरडीभर भाकरी बडवून, धुणं-भांडे करूनच शेताकड कामाला जावं लागे. वडील पहाटेच बैलं सोडून माळाला जायचे. पुन्हा घरी आलं की, स्वयंपाकपानी, चूलपोतरा.... त्यात आत्यांची खोचक बोलणी. आजी चुलत्यांचा लाड करायची. 'त्येंचे लेकरं का बाळं? तुमी दोघंच काम करावं लागतंय.' म्हणायची.
   आईला काम सोसायचं पण बोलणं सोसायचं नाही. आजही तिचा हाच स्वभाव आहे. घालून-पाडून बोलल्यावर ती जीव द्यायला तळ्याकडे धावत गेली होती. आजी मागं पळत गेली. 'आगंs परमुद्या... परमुद्या... रडलालंय. दूद पाजीव. फिर म्हागारी.'  एवढंच कसं तिच्या कानावर पडलं की? ती थबकली आणि पुलावरून धावत माघारी आली. आई हे खूप रंगवून सांगते.
      खोकला लागला की आईला माहेरी लावून द्यायचे. कारण दवाखान्याला न्यायची ह्या घराची ऐपत नव्हती. तिकडचे आजोबा तिला घेऊन फिरायचे पण गुण यायचा नाही. शेवटी त्यांनी जुजबी ओळखीमुळे डॉ. होगाडे यांच्याकडे सोलापूरला नेले. त्यांनी आईला इंजेक्शनचा कोर्स दिला. रात्ररात्र खोकून तिचा आवाज बसायचा. हे चार-पाच इंजेक्शन दिल्यावर खोकला हळूहळू कमी व्हायचा. नंतर कळले की ते पेनिसिलिन सारखे घातक स्टेरॉईड होते. तिच्या ओठात मुंग्या यायच्या. डोळ्यावर झापड यायची आणि पुढे कामांचा डोंगर! पुढे आजोबाच हे इंजेक्शन विकत घेऊन गावातल्या काही काळ कंपाउंडरकी केलेल्या गुंडूमामाला द्यायला लावायचे. मरताना आजोबांनी गुंडूमामाला बोलावून सांगितलं होतं की, 'माझ्या माघारी तुझ्या बहिणीला तूच वाचून शकतोस. तिच्याकडून एक रुपयाचीही अपेक्षा करू नको.' असं वचन घेऊन दहा व्हायल त्यांच्याकडे दिल्या होत्या. गुंडूमामांनी ते जिवंत असेपर्यंत हे वचन पाळले. त्यांची बायको आईला दाळ-जवारी मागायची. आई गुंडूमामाला कळू न देता तिला धान्य द्यायची.
   तर ह्या खोकल्यानं, कामाच्या रगाड्यानं आधीच लहानखुरी असलेली आई अगदीच काटकुळी दिसायची. तिचे गालफडं बसलेले. वडील शेतात राबून असेच गालफडं बसलेले. पण त्यांचा मूळ बांधा मध्यम व सशक्त आहे. आईची मला फार कीव यायची. तिला आम्ही तीन लेकरं. मी थोरला. पाठीवर भाऊ. मग बहिण. माझे पितृघराने खूप लाड केले. माझ्या लाडाइतकाच आईचा दुस्वास केला. दमेली, रोगेल अशा शब्दांनीच तिचा उल्लेख व्हायचा. आम्हा भावंडासमोरही. आईने साधी भांडी आपटली तरी सगळे भाऊंपुढे किरकिर करत. मग भाऊ वैतागून तिला जनावरासारखं मारायचे. घरच्या जिव्हारी लागणाऱ्या बोलण्याला वैतागून आई मला जनावरासारखं मारायची. इकडचे आजोबा (आप्पा) म्हणजे देवमाणूस. ते माझी आईच्या तावडीतून सुटका करत. 'चमी, जीव घेतीस का लेकराचा?  सोड नाहीतर काठीच घालीन पाठीत.' असं आप्पांनी म्हटल्यावर मी रडत असतानाही मला आनंदानं हसू यायचं. असा सगळा देखावा.
       माझ्या भावाच्या जन्मानंतर खूपच बंडाळ सुरू झाली.एका आत्याचं लग्न झालेलं. लेकराला दुधही मिळेना. आईचा जीव अर्धाअर्धा व्हायचा. मग आईने भीतभीत 'मी कामाला जाऊ का?' असं भाऊंना विचारलं भाऊ भडकले. "इज्जत घालवायचाय का घराची? आज्याबात जायचं नाही.' असं म्हणून तिला गप्प केलं. तरी ती न जुमानता एके दिवशी आयाबायांसोबत कामाला गेलीच. बाप  बिघडून बसला. घरात येऊ नको वगैरे रामायण झालं. हळूहळू विरोध मावळत गेला. टोमणे खात आई काम करून घर भागवू लागली. शेतमालक आईला कामाला आलेली बघून हळहळायचे, 'आरेआरे! चांगल्या घरचं लेकरू हाय. बापानं ऊन बघू दिलनी. येतंय का बाई तुला काम?' म्हणायचे. आईनं आम्हा लेकरांसाठी मान-अपमान सोडून दिला. मी शिकून मला नोकरी लागेपर्यंत आईची मजुरी सुरूच राहिली. घरालाही सवय झाली.
        आई केटी बंधाऱ्याच्या कामावर होती. मी आठवीत असेन. आत्याकडे शिकायला होतो. सुट्टीत गावाकड आलतो. तिची भाकर घेऊन गेलो. गाळाचे जड टोपले उचलून वरच्या बाईकडे द्यायचं तिचं काम. तेही अवघड, ओल्या निसरड्या जागेत उभारून. खोकत-खोकत तिचं काम सुरू.  ओझ्यानं पोटातली गाठ सरकून तिला परसाकड लागलेली. अधून-मधून परसाकडला जात काम करत होती. तिच्या मैत्रिणी तिची अवस्था बघून स्वतः अवघड जागेत थांबून तिला सोप्या जागेत थांबवायच्या. मला बघून तिच्या केविलवाण्या डोळ्यात आनंद. मला माझीच लाज वाटली. नंतर आई आणि भाऊ दोघंही वीटभट्टीच्या कामावर जाऊ लागले. भाऊंची मजुरीची ती पहिलीच वेळ. आधी कुळवून पेरून द्यायचे. भाडे मारायचे. पण दुष्काळी परिस्थितीने ते दोघे एक झाले. पुढे भाऊ विहीर फोडायच्या कामावरही गेले. बहात्तरच्या दुष्काळात भाऊंनी काम केले होते. खूप वर्षांनी त्यांना ही वेळ आली पण आई रूळून गेली होती. आईचं कामावरून कौतुक केलं की भाऊंना राग येतो. त्यांचा स्वाभिमान दुखावतो. 'मीबी लई काम केलाव गा! काम करून माझे हाडं कुट्ट झालते.' असं म्हणतात.
      आईनं कितीही मारलं तरी मला तिचा कधीच राग आला नाही. ती कामाला गेल्यावर तिच्या मागे कूट खाणाऱ्या घरातल्यांचा यायचा. आप्पा सोडून.
    ती निरक्षर आहे तरी तिला पैशांचा हिशेब जमतो. घड्याळातली वेळ जवळपास ओळखते. आता तर मोबाईलही वापरते. तिचा गळा गोड आहे. बुद्धी तल्लख आहे. मी म्हणतो, 'तू शिकली असतीस तर निदान मास्तरीन तर झाली असतीस.'  ती खूश होते. भाऊ हुशार आहेत. दोघांची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्या स्मरणाधारे त्यांच्या जुन्या उखाळ्यापाखाळ्या निघतात. भांडण पेटते. आम्ही मजा घेतो. घरात तीन नोकरदार आहेत. भाऊंना त्यांच्या गेलेल्या शेताचे पैसे आलेत. तिची हाऊस आता तेच फेडतात.
     बाप मेल्यावर माहेर तुटलं. एक जीव लावणारा नागूमामा त्याच्या लग्नाआधीच करेंट लागून मेला. माय, भाऊ, बाप मेल्याचं दु:ख तिनं पेललं. आता एक भाऊ आहे पण नावालाच. कोरडा. माया नाही. तरी आई बळंनच जाऊन त्याला राखी बांधून येते. कुठलीही अपेक्षा ठेवत नाही. नणंदांची बाळंतपणं केली. सासू पडून असताना तीन वर्षे तिची सेवा केली. हगणं-मुतणं-आंघोळ-खाऊ घालणं सारं केलं. राग ठेवला नाही. सासऱ्याची अशीच तीन वर्षे सेवा केली. घर-शेत-मजूरी करत हे सारं केलं. आता म्हणते, 'त्येंचाच अशीर्वाद हाय. मनून माझं समदं चांगलं झालं.'
       तिला खोटेपणाची भयंकर चीड आहे. कुणी खोटेपणा केला की, ती शिव्याश्राप द्यायची. म्हणून तिला बरेचजण वचकून असत. समदं गाव तिचं कौतुक करतं. 'लई खट्टे खाल्ल्याय. तिला संबाळा.' असं कुणीबी म्हणतं.
 'आशिलाचं होतं म्हून
नांदून केलं नाव
माय नवाजतं तुला
सारं जकेकूर गाव'
     आजीही मूळची वाईट नव्हती पन कानानं जरा हलकी होती, असं ती सांगते. मी नोकरीला लागल्यावर तिची मजुरी बंद केली. चुलते आधीच वायलं निघाले होते. घरच्या शेतात ती अजूनही राबते. मी रागावलो की म्हणते, 'काम केल्यावरच आन गोड लागतंय. काम केल्यानं मरतनी. आंग हाळू होतंय.'  तिचा खोकला वेळच्या वेळी आधुनिक उपचार केल्याने कमी होतो. तरी ती अधूनमधून येतो. मी विचारल्यावर म्हणते, 'पैलंसरका तर नाही की! रातरात झोपू द्यायचा नाही.'
      मी नोकरीला लागल्यामुळे भाऊही शिकून नोकरीला लागला. सगळ्यांची लग्नं झाली. घर सावरलं. सुनाही समजूतदार आहेत. तिला समजून घेतात. काळजी घेतात. गावाकड भाऊ, धाकटा ल्योक, सून, नातू यात ती रमून गेलीय. मी नोकरीनिमित्त जरा दूरच्या गावी राहतो....
      गावाकडून शेवटची बस येते. चौकातल्या हाटेलाच्या बाकड्यावर बसून वेड्यासारखं मी उतरणारे प्रवासी निरखीत राहतो. उतरणार्‍या बायांमध्ये आई दिसल्याचा भास होतो. ती येईल अचानक न सांगता. सप्राईज देण्यासाठी. असं वाटत राहतं. पण आईसारखी दिसणारी बाई उतरून वेगळ्याच दिशेनं चालू लागते.             
    गेल्या खेपेला ती अशीच आली होती. पाट फुटून वाहणाऱ्या पाण्यासारखं. दावं तोडून येवं गाईनं तशी आली. 'नातीला बघू वाटलालतं म्हणून आलेव.'  म्हणाली. आनंदलो. दोन दिवस घरात सणासारखं गजगज वाटलं. ती बाहेर गेली असताना पोरीला म्हणालो, 'आज्जी गेली गावाकड.' दोन वर्षांची लेक धावत आतल्या खोलीत गेली. तिची अडकवलेली पिशवी बघून पळत येऊन मला म्हणाली, 'आज्जी गेलनी... आज्जीची पिशवी हाय तित्तं.'
     तिचं मन दोनचार दिवसात उच्चाट खातं. खळेदळे, कामंधामं उरकते. येईन पुन्हा अजून चार दिवस म्हणून ती जाते. पण काय खरं नसतं. आतल्या खोलीतल्या मोळ्याला आता तिची पिशवी नसते पण लेक रोज तिच्याचविषयी बोलत राहते.
                   ---------------------------

 पूर्वप्रकाशित- वाघूर 2017  (दिवाळीअंक) आभार: नामदेव कोळी
चित्र साभार: श्रीधर अंभोरे.

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

अनिकेत पाहुणे



 आम्हाला तिसरीला 'वासुदेव' ही कविता होती.
  'मोरपिसांचा टोप घालुनी
   टिल्लिम टिल्लिम टाळ वाजवित
   वासुदेव आला...
   मुखी हरीचे नाम गर्जितो...
   प्रभातकाळी थयथय नाचत स्वारी आली' अशा काही ओळी आठवतात. माझ्या बालपणीही वासुदेव कधीतरीच यायचा. उशीरा उठायचो त्यामुळे त्याची गाठ पडायची नाही. एकदा तो योग आलाच. मग मीही लहान टाळ एका हाताला त्याच्यासारखं गुंडाळून, डोक्यावर टोपी घालून घरी नक्कल करू लागलो. अभंग तर हुबेहूब त्याच्याच ठेक्यात म्हणायचो. कौतुक करून घ्यायचो.
      मरगम्मा (कडकलक्ष्मी) आणि पोतराजांची खूप भीती वाटायची. आत लपून बसायचो. मरगम्माच्या ढोलकीचं गुरगुंsपांग  गुरगुंsपांग ऐकू आलं की पोटात भीतीनं गोळा यायचा, आणि तो आवाज आपल्याच पोटातून येतोय असं वाटायचं. पोतराजाचं चाबकानं स्वतःवर आसूड ओढणं आणि त्याच्या पायातल्या घुंगरांचा आवाज भयानक वाटायचा.
     मसणजोग्यांनाही खूप भ्यायचो. त्यांचा रंगीबेरंगी विचित्र पोषाख, हळदी कुंकवाच्या रेघोट्या ओढलेला भेसूर चेहरा. एका हातात काठी, एका हातात घंटा आणि काखेत झोळी असा अवतार! गावातली कुत्री यांना पाहून जोरजोराने भुंकत. काठी त्यासाठीच घेत असावेत. कुणीतरी सांगितलेलं की, मसणजोगी मंत्र मारून लहान मुलांना चिमणी किंवा कावळा करून झोळीत घालून घेऊन जातात. मग काय? घाबरगुंडी. नुसतं बघायलाही भ्यायचो. त्याच्या नजरेस पडू नये म्हणून आत सांदाडीला जाऊन बसायचो.
   पोपटवाले जोशी भविष्य सांगताना फार चटपटी बोलायचे. बाया तर फार लवकर यांच्यावर विश्वास ठेवायच्या.
  'तुझं मन लई मोठं हाय माय. मनानं लई चांगली हाईस. तुजं मन कळनाऱ्यालाच कळतं. दुसऱ्यासाटी तू लई करतीस पन तुजी कदर कुनालाच नाही. तुज्या हातचं मीट आळनी हाय माय' त्यानं असं म्हणलं की, बाया पदर डोळ्याला लावत.
 'खरं हाय बाबा' म्हणून पसापायली धान्य जास्तच वाढायच्या. हे जोशी मनकवडे असतात. त्यांना आपल्या मनातलं सम्दं कळतंय, असं बोललं जायचं. 'तुला तीन पोरं आनी दोन पोरी हायत' असं परफेक्ट सांगून ते थक्क करीत. एका जोश्यानं भविष्य सांगत सांगत आमच्या वडलांना 'तू तुजं रगत तुज्या डोळ्यानं बगून मरनार हायस' असं म्हटल्यामुळे वडील कुठं गावाला गेले की, माझ्या मनात   काहूर दाटून येई.
 काळा कोटवाले जोशी सनई फार छान वाजवित. ऐकत रहावंसं वाटे.
   गावात नंदीवाला आला की, आम्ही पोरं त्याच्या मागे गावभर फिरायचो. यामागे उत्सुकती अशी की, नंदीबैल गुबूगुबू मान हलवून सगळ्यांनाच होकार देतो की नाहीही म्हणतो, ते बघावं. असे दोन नंदीसारखे भव्य बैल आपल्याही शेतात असावेत असं वाटायचं.
   दरवेशीही वर्षातून एकदा न चुकता गावात यायचा. त्याचं ते केसाळ अस्वल तो सांगेल तसं वागताना पाहून त्याच्या धाडसाचं कौतुक वाटे. आजी दरवेशाला सूप भरून जवारी वाढायची. त्याचं अस्वलाची वेसण खेचणं, कायम दंडुक्यानं मारणं बघून अस्वलाची दया यायची. आजी दरवेशाकडून पेटी घेऊन आमच्या गळ्यात बांधायची. या बारक्या पेटीत दरवेशी अस्वलाचे केस मंतरून घालतो. त्यामुळे भीती वाटत नाही. भूतबाधा होत नाही. अशी लोकांची भाबडी कल्पना.
   गावात येणारे आणखी एक डेंजर पाहुणे म्हणजे गारूडी. आम्ही त्यांना सरपवाले म्हणतो. वेताच्या टोपलीतला साप बघून काळजाचा ठोका चुकायचा.
   बालपणी कशाकशाला भ्यायचो हे आठवून हसू येतं. पोलीसांना बघून आम्ही गांडीला पाय लावून पसार व्हायचो. ते पोलीस म्हणजे राईंदर! हे पोलीस हसवतात हे कळल्यावर त्यांचं बोलणं ऐकायला मज्जा येऊ लागली.
 'हं! चला काकू लग्नाला चला
  लेकरं बांधा खुट्टीला
   कुत्रे घ्या काखंला
चला चला लग्नाला चला'
  'कुटं हाय सायेब लगीन?' असं कुणी विचारलं की,
'खाली गेल्यावर वरीच हाय. एक्कावन वाजून बावन मिंटाला आक्षता हायत्या. नवरा नांदायला जायला नगं मनून रडलाला, पळून चालला तर गोळ्या घालायला हे पिस्तूल आनलाव.' असं काहीबाही  बोलून, घराबाराला हसवून, मूठपसा घेऊन हा राईंदर नावाचा खोटा पोलीस झोळीचं ओझं पेलत, काठी आपटत निघून जाई. दुसरीकडे आणि वेगळंच काहीतरी बोलून हसवत फिरत राही. विनोदाची चांगली जाण आणि हजरजवाबीपणा हे त्याचे विशेष गुण. आता टिव्हीवर विनोदी कार्यक्रमात विनोद करण्यासाठी साडी नेस, मुलीचा ड्रेस घाल असे कितीतरी सायास केले जातात तरी हसू येत नाही. राईंदर संवादातून विनोदाची पखरण करायचा.
   'सूयाsपिनाs केसाsवरsयss' अशी बोहारणींची विशिष्ट लयीतली आरोळी ऐकू आली की, आमची तायडी पळत येऊन आईला सांगायची. मग आई खिळपटात जमा केलेले केस देऊन टिकल्या, पिना इ. घ्यायची. मुलींनाच यात इंटरेस्ट! माझं लक्ष त्यांच्या पाठीला बांधलेल्या झोळीतल्या टुळटुळ बघणाऱ्या लेकरांकडे जायचं. आई त्यांना भाकरी कालवण खायला द्यायची. तिथंच खाऊन गटगट पाणी पिऊन या बाया पुढे जायच्या.
   गावात कधीकधी डोंबारी यायचे. ढोल वाजवणं, तारेवर चालणं, उलट्या उड्या मारणं. जाळ लावलेल्या गोल तारेतून माकड्याच्या उड्या मारणं, रचलेल्या बाटल्यांवर उभं राहणं, उभी मातीतली सुई पापण्यांनी उचलणं, केसांनी गाडी ओढणं अशा अचाट कसरती डोळे विस्फारून टाळ्या पिटत बघताना भान हरपून जाई. त्यांना काहीतरी द्यावं असं खूप वाटायचं पण चड्डीच्या खिशात पाच पैसेही नसायचे. फुकट खेळ बघून अपराधी मनानंच घरी परतायचो.
   दारावरच्या एका पाहुण्याला आमच्या घरी खूप मान होता. ते म्हणजे दत्तसंप्रदायी भगवी कफनी आणि हातात शेर घेऊन भिक्षा मागणारे संन्यासी. त्यांनी घरी बोलावून आजी चहा पाजायची. काही महाराज घरोघरी नावानं हाका मारायचे.
  ' कुठं गेले बाबाराव? आहेत का? ' म्हणतच दारात प्रकटायचे.
   झाडावर झोपणारा पांगूळ वगैरे मी बघितले नाहीत. ते आमच्याही पिढीआधीच अस्तंगत झाले. घिसाडी रबरी फुग्याचा भाता लावायचे. घिसाडणी कोळसा मागायला यायच्या. फासा खुरपे शेवटून द्यायचे. फुटके टोपले, घागरी नीट करून द्यायचे. घिसाडी, फासेपारधी यांची पालं तर आमच्या शाळेमागच्या मैदानातच पडायचे. त्यांचं पालातलं ऊन-वारा-पावसातलं जगणं बघून गरिबीतही आपण खूप सुखी आहोत, असं मनोमन वाटायचं. पालात चितरं, होले हीच मेजवानी असायची. मासाचे तुकडे उन्हात वाळत घातलेले असायचे. भूकेची बेगमी करून ठेवत.
   साच्यात मूर्त्या करून देणारे, गाढवावर दगडी खलबत्ते, उखळ विकणारे, लाकडी रव्या, चाटू, मुसळ करून देणारे, चिंध्यांचे दोर वळून देणारे, कात्री-विळा-खुरप्याला धार लावून देणारे, सुटकेस घेऊन मोती विकत फिरणारे मोतीवाले, एक हात कमरेवर ठेवून त्यावर चादरी-सतरंज्याचा भार पेलत विकणारे, तेलाच्या डब्याच्या कोठ्या तयार करून देणारे, स्टो रिपेरीवाले, असे कितीतरी फिरस्ते यायचे.
      मेंढ्यांचे कळप घेऊन धनगर यायचे. त्यांच्या बायका तीन दगडांच्या चुलीवर पातळ भाकरी सराईपणे करायच्या. खतासाठी रानात मेंढ्या बसवल्या जायच्या. धनगर किराना मालासाठी गावात यायचे. कैकाडी दुरड्या, सुपं, डाली आणायचे.
   असे अनेक अनिकेत पाहुणे वर्षानुवर्षे ठरलेल्या काळात न चुकता यायचे. गावोगावी त्यांच्या ओळखीही असायच्या. जुने लोक मायाळू होते. पसापायली द्यायला हात अखडत नसत. आता चुकून एखादा फिरस्ता मागायला आला तर अक्षरशः त्याला हाकलून दिले जाते. थोड्याफार भटक्या-विमुक्त जातीही आता स्थिरावल्या आहेत. त्यांच्यातही आता शिक्षणामुळे थोडीबहुत प्रगती झालीय. पण जी गावं त्यांना आधार द्यायची, तीच गावं आतून बकाल झाली आहेत. शेतकरी पार भिकेला लागलाय.
( फोटो: सौजन्य इंटरनेट)

मंगळवार, १७ जुलै, २०१८

पाऊसझड

मला पाऊस आवडतो पण पावसाळ्यातली चिकचिक, चिखलराडा, ओंगळघाण आवडत नाही. जीव वैतागतो.
      उन्हाळ्यात अचानक अवकाळी पाऊस गाठतो. तापलेल्या मातीवर पडलेल्या पहिल्या सरींनी मातीला सुटलेला खमंग वास छाती भरून घ्यावासा वाटतो. अनेक फुलांचे, अत्तरांचे सुगंध घेतले पण पहिल्या पावसानं मातीला सुटलेला गंध सर्वांत श्रेष्ठ वाटतो.
    अवकाळी(वळवाचा) पाऊस, आषाढातला पाऊस, श्रावणातला पाऊस, भादातला पाऊस... किती वेगळेवेगळे...
   अवकाळी पाऊस मनाची मरगळ धुवून काढतो. मिरगाचा पाऊस मनात उल्हास, स्वप्नं पेरतो. झडीचा पाऊस अंतर्मुख करतो. अंगात आळस भरतो.
   पाऊस कधी नुसताच पहावा. कधी अंगभर गोंदून घ्यावा. पाऊस एकसारखा नसतो. तसं पावसाचे आवाजही एकसारखे नसतात. कोरड्या रानावर पडताना होणारा टपटप्....नंतर सडडड्...असा आवाज. पत्र्यावर पडताना होणारा हलगी वाजवल्यासारखा आवाज, पाऊस थांबल्यावर ओघळणाऱ्या थेंबांचा होणारा टिबुक...थिबुक असा आवाज. ओढ्यानाल्यातून वाहताना होणारा खळखळाट...
      पाऊस ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट करत येऊन दिपवून जातो. दहशतही घालतो. पाऊसच इंद्रधनुष्याची किमया करतो. इंद्रधनुष्य हा फारच पुस्तकी शब्द झाला. आम्ही त्याला धामीनकाठी म्हणायचो.
       दारापुढील वळचणीच्या सोन्याचांदीच्या धारा पुढं बोरकरांच्या कवितेत सापडल्या. उन्हात पाऊस आला की आम्ही कोल्ह्याचं लगीन लागलं म्हणून नाचायचो.
   ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा
   पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
 असं म्हणत अंगणात गिरक्या घेत आपण मोठे झालो.
     उन्हाळ्यात भरपूर आंबे खाऊन कोया उंकड्यावर टाकल्यामुळे पावसाळ्यात उकंड्यावर आंब्याची भरपूर रोपं यायची. कोवळी चाॅकलेटी पान असलेली रोपं उपसून खालच्या मऊ पडलेल्या कोया दगडावर घासून आम्ही त्याच्या पुंग्या करून वाजवत फिरायचो. गोगलगाईच्या चंदेरी रस्त्यांचा शोध घेत फिरायचो.
      पाऊस कधी पिकाला आंजारत गोंजारत येतो तर कधी पिकाला आडवं पडेपर्यंत तुडवतो.. प्रत्येक नक्षत्राचा पाऊस वेगळा...त्यानुसार म्हणीही तयार झाल्या.
 वानगीदाखल-
पडला हस्त तर कुणबी झाला मगरमस्त.
पडल्या चित्ती तर उतरतीला भीती.
पडतील सायीसाती तर पिकतील माणिकमोती.
पडल्या मघा तर चुलीपुढी हगा,
नाही पडल्या मघा तर आभाळाकड बघा.
    झडीचा पाऊस तर अंतच बघतो. झड लागल्यावर बाहेर कामच नसेल तर मज्जा वाटते. वाकळ पांघरून, पाय पोटात घेऊन पडून रहावं. चुलीवरच्या भुगण्यात चहाचं आधण ठेवलेलं असावं... पण असं होत नाही. झडीतच जास्त कामं निघतात. बाहेर पडावंच लागतं.. टपरीवच्या उकळणाऱ्या चहाचा सुगंध थेट नाकात घुसतो..
    जळण, गवऱ्या भिजल्यानं आईची चुल पेटायला सळायची. वल्ल्या गवरीनं धुपन होऊन घर धुरानं भरून जायचं. मोठ्या पावसातही न गळणारं घर भिजपावसात गळायचं. भिंतीना वलगरा चढून पोपडे पडायचे. दाराला पोत्याचं घोंगतं अडवलेलं असायचं. बाहेर जाणाऱ्याने ते पांघरून जायचं आणि बाहेर गेलेला येईपर्यंत बाकीच्यांनी त्याची वाट बघायचं. झडीत लघवीला जोर. चिखलात संडासला जायचं तर जीवावरच येई.
    झडीतही जनावरांना वैरणपाणी करायला बापाला शेतात जावंच लागायचं. बाप काकडून जायचा.
     बालपणी ढगाच्या गडगडाटाला मी घाबरायचो तेव्हा आजी म्हणायची, 'भिऊ नकू! आबाळात म्हातारी दळलाल्याय. तिच्या जात्याचा आवाज हाय.' मी विचार करायचो: म्हातारी दळत असेल तर खाली पीठ पडलं पाहिजे. मग पाणी कसं पडतंय? मग वाटायचं: म्हातारी बर्फाचे खडे दळत असेल. आज या गोष्टीचं हसू येतं.
       शेतातल्या कोट्यात जनावरांसोबत बसून शेणामूताचा वास घेत रानावरची झड बघण्यातला आनंदच निराळा...
      झडीत काॅलेजला जाताना वह्या शर्टखाली पोटात खुपसून जायचो. स्लीपरमुळे पाठीमागे पँटशर्टवर चिखलाचे शितोडे उडालेले असायचे.
         सहवासाने पाऊस संगीत वाटतो तर विरहात विद्ध करतो. छत्री नेल्यावर पाऊस येत नाही. विसरली की हमखास येतो. हे आधीच एका लेखकानं नोंदवून ठेवलंय. खरंय.
   पाऊस कधी बाजिंदा वाटतो. कधी हेक्काडी, कधी धटिंगन तर कधी अवचिंद वाटतो.
    पाऊस आवडतो तरी मी त्याच्या गुणदोषांसकट त्याला स्वीकारत नाही.

सोमवार, ९ जुलै, २०१८

गाव



गावात काय? गाव तो गाव. माझा गाव नक्की कुठून सुरू होतो, नक्की ठरवता येत नाही. गावाची वेस पडकी. हरेक गावच्या वेशी पडक्याच का? हे मला न सुटलेलं कोडं आहे. माझं गाव पांढऱ्या मातीचं म्हणून 'गावपांढरी'. (गावपंढरी नव्हे) आता आमचे गावकरी म्हणजे एक नंबर इर्रसाल! त्यांच्याच नजरेतून गावाची समीक्षा: 'ह्या पांढरीत कोण उबदऱ्या आलंय गा?' खरंच आमच्या गावात आजवर कोणीच वर आलं नाही. चुकून वर आला रे आला, थोड्या दिसातच पार रसातळाला गेलाच म्हणून समजा. पायली भरायला उशीरच लागतनी. असं ह्ये नंबरी खेक्कड गाव.
      माझं गाव एका लहानशा वळणदार नदीकाठी वसलंय. पण नदीला नावच नाही. अनेक नामकरण विधी होतात; पण नदीचं नामकरण करायला कुणीच तयार नाही. मीच नदीचं बारसं केलं: 'चंद्रगंगा' अजून हे नाव मी कुणालाच सांगितलं नाही. ही गोष्ट नदी आणि मी दोघातच आहे. का? बापरे! लोकांना हा प्रकार कळला तर तेच माझं 'येडं भास्कऱ्या' असं नामकरण करतील हो!
     माझा गाव अर्धा उमाटावर अर्धा गारीत वसलेला. वरली आळी. खाल्ली आळी अशी गल्ल्यांना नावं त्यामुळेच पडलीत. माझ्याही गावात बक्कळ देवळात बक्कळ देव निवास करतात.माझ्या गावातही नियमाप्रमाणे म्हारूतीचं देऊळ वेशीबाहेरच आहे. शिवारात हिराई, सटवाई आदि महान देव्या निवसन्ति। गावात एक मशीद व एक बौद्धविहारही आहे.
    माझ्या गावात उत्खननात सापडलेल्या अनेक सुंदर मूर्त्या आहेत. मूर्त्यांना काव कुत्र्यांचा. कारण त्या उघड्यावरच आहेत. गावतील या प्राचीन अवशेषांवर लातूरच्या एका (हुशार) प्राध्यापकानं पीएचडी केल्याचंही ऐकिवात आहे. त्याने पुरातत्व खात्याला पत्र पाठवून या सांस्कृतिक ठेव्याची माहितीही दिली होती म्हणे! मूर्त्या न्यायला गावात ट्रक आले; पण काय बिशाद आहे त्यांची मूर्त्या न्यायची? सारा गाव एक झाला. हात नाही लावू दिला. हे एक बरं झालं. मूर्त्या वस्तूसंग्रहालयात ठेवायला पळवल्या असत्या; तर आमच्या गालफुग्या कशा नीट झाल्या असत्या? मूर्तीच्या तोंडाला काव फासून, देवाचं तोंड लाल करून; गालफुगीवर तो काव लावला की रोग दुरूस्त. माझी गालफुगीही एकदा याच प्रकारानं ठीक झाली. आता गुण दगडाचा, देवाचा की कावाचा? एक त्या मूर्तीला अन् दुसरं त्या गालफुगीलाच ठावं.
      गावापासून एक-दीड किमी अंतरावर एक दर्गा आहे. त्याला हिंदू-मुस्लिम सगळे भंजतात. मुस्लिम त्याला 'राजाबक्सार' म्हणतात, तर हिंदू 'राजेभास्कर' म्हणतात. मुस्लिमांचं मत की तो त्यांचा 'पीर' आहे. हिंदूंचं मत की, कबरीखाली शिवलिंग आहे. तरी यावरून कधीच मोठा वाद झाला नाही. मला वाटतं की, ती सूफी संताची कबर असावी. पूर्वी दर्ग्याच्या भोवती बारा एकरांवर घनगर्द झाडी होती. हे आमचं 'मिनी जंगल'. माझ्या लहाणपणी भर दिवसाही दर्ग्यात जायला भीती वाटायची. तरी साताठ पोरं मिळून कवठं, सिताफळं आणायला जायचोच. आता दर्गा ओसाड दिसतो. लोकांनी सरपणासाठी झाडं तोडून दर्ग्याची वाट लावली. दर्ग्यात दर गुरूवारी कंदुरीचा नवस फेडण्यासाठी अफाट गर्दी असते. आधीच माल मारून आलेले काही लोक कंदुरीचं जेवण करून वाटेवरच्या आमच्या शेतातल्या आंब्याखाली येऊन लुडकतात. शाकाहारी लोक दर्ग्यात मलिदा-भाताचा निवद दाखवतात.
       पहाटे मशिदीतील अजाँने उठणारा माझा गाव रात्री देवळातल्या भजनानंतर झोपी जातो.
         गावाला एक पाणंद आहे. लोक परसाकडला तिकडंच जातात. बायका अलिकडे. पुरूष थोडं पलिकडे. येणाऱ्या-जाणाऱ्या पुरूषांमुळे बायकांना अवघडंन उठून उभारावं लागतं. प्रत्येक गावात ही ठरलेली गैरसोय. माझा गावही याला अपवाद नाही. आताशा शासनाच्या 'हगणदरीमुक्त गाव' धोरणामुळे पाणंदीकडची वर्दळ बरीच कमी झालीय.
  पूर्वी गावात एकच जिल्हा परिषदेची शाळा होती. आता एक खासगी माध्यमिक शाळा आणि एक आश्रमशाळाही सुरू झालीय. आता गावची मुलं गावातच शालेय शिक्षण घेतात. आम्ही आठवीला   एसटीनं उमरग्याला जायचो. कुणी सायकलवरून जायचं.
      गावेत पूर्वी इस्पट चालायचं पण चोरून. रानारानानं. मध्यंतरी ते हाॅटेल-कम-क्लबातून चालायचं. आता हा प्रकार कमी झालाय. आमच्या लहानपणी सोंगट्यांचा (सारीपाट) खेळ रात्ररात्रभर चालायचा. तोडी होईपर्यंत.
      पूर्वी गावात एकच पक्ष होता. आता बरेच पक्ष आलेत. प्रत्येकाची कार्यालयं वेगळी. गावाबाहेर कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्या तशा पक्ष व संघटनांच्या पाट्यांची गर्दी आहे. उलट कुत्र्याच्या छत्र्या उगवायचं आता कमी झालंय.
    गावात इतर कंपलसरी सणांसोबतच काही वेगळे सण-समारंभही परंपरेने साजरे केले जातात. उदाहरणार्थ हरिनाम सप्ताह, मोहरमचे पीर बसवणे. यानिमित्त फैतरा हा खेळ खेळणे, कारवनी (बैलांचा सण), येळवस, दर्ग्याची जत्रा, बिरूदेवाची जत्रा इत्यादी. गावात जयंत्यामयंत्याही उत्साहात साजऱ्या होतात. पूर्वी शिवजयंती व भीमजयंतीला हमखास मारामाऱ्या व्हायच्या. वातावरण तंग असायचं. आता लोक शहाणे झालेत. एकमेकांच्या जयंतीत  सहभागी होतात. शिक्षणाची किमया.
     पूर्वी गावात हातभट्टी काढली जायची. गावातले लोक गोळा करून सहज खडा मारला तर तो बेवड्यालाच लागावा, इतके प्रमाण होते. एक दक्ष फौजदारामुळे गावातून हातभट्टी निर्मूलन झाले. तरी बेवडे आजूबाजूला जावून भागवतात; पण प्रमाण कमी झालंय.
    गावातून राष्ट्रीय महामार्ग जातो. सडकेला पानटपऱ्या व हाॅटेलांची संख्या वाढलीय. प्रत्येक टपरीवर बेकार पोरांचा एकेक ग्रूप मावा चघळत व थूंकत कायम पडीक असतो. गावात चांगलं शैक्षणिक वातावरणच नाही, त्यामुळं बेकार जास्त. मग पोट भरायचे तीनच पर्याय एक पुणे- मुंबई, दुसरा पानटपरी लावणे, तिसरा ऑटोरिक्षा चालवणे. हे तीनही न जमणाऱ्याला गावात बेकार म्हणतात. गावाला सुपीक जमीन असूनही अनेकांना करणं होत नाही. तालुक्याचा गाव जवळ. रोजच दौरा.
      घरोघरी रंगीत टिव्ही आले. मोबाईल आले. वाटलं गावचा विकास झाला. कशाच काय न् फाटक्यात पाय. गाव आतून बकाल आणि दरिद्रीच आहे. गावच्या आरोग्याबद्दल तर बोलायलाच नको. विकास हा शब्द तर काहीच्या नावापुरता आहे. असो. माझा गाव शेवटी माझा आहे. मला तो प्रिय वाटतो.


रविवार, २४ जून, २०१८

गझल

1
आठवणींची धास्ती कशाला
रोजच असते रात्र उशाला

हाडवैरी झोप ही असली
बोलत बसतो रामोशाला

चांदण्यांची संगत होते
लटकत डोळे आकाशाला

अजून संयम आहे बाकी
वाटेतच जरि मधुशाला

आता कुठे लागले कळाया
किंमत नसते भरवशाला
------------------------------
2
तुझ्या गोऱ्या उन्हात मला जळू दे
कुंतलांच्या सावलीला निथळू दे

हरिणकाळीज तू सैरभैरशी
हिर्व्या रानालाही जरा कळू दे

डोळ्यात तुझ्या मी उगवलो होतो
आता तिथेच मला मावळू दे

बांधून तुला नजरेने केवळ
तुझ्या नाजूक ओठांना छळू दे

तू मिठीत माझ्या सावळी झालेली
रंग जरासा आता निवळू दे
---------------------------------------
3
डोळ्यात चंद्र आणि हातात फूल होते
होशील तूच माझी डोक्यात खूळ होते

ती प्रीत चांदण्यात होती विरून गेली
ते चांदणेच तेव्हा झाले गढूळ होते

श्वासात श्वास जावा मिसळून एकदा
ही कल्पनाच खोटी हेही कबूल होते

मागे तुझ्या स्वरांच्या कैफात धावलो मी
 वाटेवरी फुलांचे नाजूक सूळ होते

स्वप्नात रंगण्याचे सरले दिवस हळवे
आकाशवेड आणि मातीत मूळ होते
--------------------------------------------
4
साहतो आहे सुना वनवास आता
झाला ना माझाही देवदास आता

विसरलो मी मोगरीचे रूपही ते
शुभ्र, कोमल, गंधित आभास आता

तू नको त्या पैंजणांनी जाग आणू
होईल नशाच सारी खलास आता

संपले तारे कसे गगनातले
चंद्र एकट हिंडतो भकास आता

कोड घेऊन चांदण्यांची रात्र येते
वाहतो आहेच वारा उदास आता
------------------------------------
        प्रमोद कमलाकर माने.
सूचना: परवानगीशिवाय काॅपी अथवा शेअर करू नये.

गुरुवार, ७ जून, २०१८

कारवनी

वैशाख शुक्ल पौर्णिमेला कर्नाटकचा पोळा हा सण असतो. बैलपोळ्यासारखाच हा सण.  या कर्नाटकी पोळ्याचे नाव आहे 'कारहुणवी'. पण आमच्याकडे 'कारवनी' म्हणतात. माझं गाव मराठवाड्याच्या टोकाला कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ आहे. आमच्या भागात काही गावात पोळा तर काही गावात कारवनी साजरी करतात. उमरगा या तालुक्याच्या शहरातही निम्मे शेतकरी पोळा, निम्मे कारवनी करतात.
    कारवनी मृगात येत असल्याने उन्हाळ्यापासूनच कारवनीची तयारी सुरू व्हायची. ओढ्यात भिजायला टाकलेल्या अंबाडीच्या सलमकाड्यांपासून अंबाडा सोलण्याची जणू स्पर्धाच चाले. मला अजून याद आहे: वैशाखातल्या रणरणत्या उन्हात चावडीतल्या थंडगार सावलीला बसून वृद्ध मंडळी बैलांसाठी अंबाड्यापासून मुंगसे, बाशिंग, कान्या, कासरे, म्होरक्या, वेसणी, कंडे, माटाट्या असे साज तयार करायचे. बैठक मारून, हाताला थुंकी लावून मांडीवर दावे वळायचे. चावडीम्होरं गोट्या खेळणाऱ्या आम्हा पोरांना बोलावून घोडा नाचवायला सांगायचे. म्हणजे दाव्याचे दोन टोक हातात धरून पिळ्या द्यायचं काम.
     गावातले नुकतेच कुणबिकीत पडलेले शेतकरी कुणबिकीतून निवृत्त झालेल्या म्हाताऱ्यांकडे यायचे आणि अंबाड्याचे साज करून घ्यायचे. आमच्या आजोबांकडे चापे, घाणे, लिंबोळ्या, लागबंद हे बैलांचे साज करून घ्यायला रीघ लागायची. आप्पा वैतागायचे. 'तुमी कवा शिकनार?' असं म्हणायचे. पण कुण्या बापड्याला ते नाउमेद करत नसत. आप्पांचाही दुपारचा वकत चांगला गुजरत असे. उरलेल्या अंबाड्यापासून आप्पा आम्हाला चाबकं करून द्यायचे. आम्ही दिवसभर चाबकाचे आवाज काढत हिंडायचो. लाकडाचा दांडा तासून त्याला चाबूक बांधायचो आणि रंगाऱ्याजवळ तीन रंगात रंगवून घ्यायचो. रंग हडकेपर्यंतही दम पडायचा नाही.
      कारवनीचा आदला दिवस म्हणजे 'खंडमळण्या'. त्या दिवशी वडलांबरोबर मी रानात जायचो. नदीवर बैलांना घासूनपुसून अंघोळ घालायचो. थंडगार पाणी बैलांच्या पाठीवर उडवल्यावर तिथली कातडी थरथरायची. मारका 'इंग्रज्या' नावाचा बैल सतवायचा. बैलांची लख्ख अंघोळ झाल्यावर गाय, म्हैस, वासरं, कारवडी, वागारी यांचीही अंघोळ व्हायची. घरून आईनं दिलेल्या हळद व लोण्यानं बैलांच्या माना चोळायचो. नांगराचा, कुळवाचा, गाडीचा 'जू' घेऊन घट्टे पडलेल्या माना बघून वाईट वाटायचं. लोण्यानं चोळल्यावर मान गुळगुळीत मऊ पडायची. मग वडील बैलांचे शिंग घासून घासून गुळगुळीत करायचे. वारनेसनं रंगवल्यावर शिंगं कशी ऐटदार वाटत.
      कारवनी दिवशी बैलांना गावात आणलं जाई. माने-मंडळीच्ये सगळ्या बैलांची एकत्र मिरवणूक निघे. रंगीत शिंगांना चमकीचे पट्टे लावलेले. फुगे बांधलेले. पाठीवर झूल, गळ्यात घुंगुरमाळा, दृष्टमण्यांच्या माळा, शिंगांच्या टोकांना पितळेच्या शिंगोट्या, रंगीबेरंबी माटाट्या, बाशिंग, पायात काळे कंडे, कातरून आकार दिलेली गोंडेदार शेपटं, अंगावर पिवडी... बैलं नवरदेवापेक्षा देखणे दिसायचे.वाटायचं जणु आज बैलांचं लगीनच हाय. मिरवणुकीपुढं बाजा, धनगराचे ढोल, झांजा. सुतळीबाँबच्या आवाजानं बैल बिचकायचे.बुजायचे. बारके पोरं भिऊन लांब पळायचे. म्हारतीपुढं पूजा होऊन वाजतगाजत मिरवणूक घराकडे येई. सर्वात पुढे रहायचा मान पाटलाच्या बैलांचा बाकीचे सगळे मागे. दिवसभर मिरवणूका. बैलांवर उधळलेल्या चुरमुऱ्यांमुळे रस्ते पांढरेशिप्पट दिसायचे. जमादारांच्या बैलांच्या मिरवणूकीपुढं पोतराज व गुरगुंपांग वाजवणाऱ्या मरगम्मा (कडकलक्ष्मी) असल्यामुळे ही मिरवणूक बघायला गर्दी व्हायची.
           मिरवणूक झाल्यावर दारापुढे बैलांची पूजा होई. वडील दोन्ही बैलांच्या म्होरक्या धरून मधी उभारायचे. आई पूजा करायची. मग बैलांना पूरणपोळी चारली जाई. एखादा बैल पोळी खाईना झाला की; सगळे 'बैल रूसला...बैल रूसला ' म्हणायचे. मग भजे घुगऱ्या, कोडबळ्यांचं गाडगं बैलांच्या तोंडाला लावलं जाई. वरून गुळवणी पाजलं जाई. शिंगात कोडबळे अडकवले जात. शेवटी घरातले सगळेजण बैलांच्या पाया पडायचे.
    ज्यांच्याकडे पोळा असतो असे पाहुणे घरोघरी आल्याने कारवनीला गाव गजबज वाटायचा. आमच्याडे किल्लारीचे दादा आवर्जून यायचे. जाताना पोळ्याचं आवतन देऊन जायचे. ते रात्री आम्हा मुलांना चमत्कारिक गोष्टी सांगायचे. एक गोष्ट तीन-चार दिवस चालायची. त्यांना काल गोष्ट कुठपर्यंत आली होती ते आधी आम्ही सांगावं लागायचं. मगच पुढची गोष्ट ऐकायला मिळायची. एकदा त्यांनी घोरण्याचा विषय काढला. मी त्यांना विचारलं, 'दादा, घुरतात कसं ओ?' त्यांनी घोरण्याचं प्रात्यक्षिक मला साग्रसंगीत दाखवलं आणि माझ्याकडून करूनही घेतलं. तेव्हापासूनच मी रात्री झोपेत घोरायला लागलो म्हणे! पुन्हा दादा कधी आले की विचारायचे, 'कुटं गेला तो घुऱ्या?' माझं नावच त्यांनी घुऱ्या पाडलं.
      कारवनीच्या दिवशी बैलांच्या खांद्यावर जू दिला जात नाही. अगदी महत्त्वाचं काम असलं तरी बैलांना गाडीला जुंपत नाहीत.
    कारवनीचं वैशिष्ट्य हे आहे की; हा सण पोळ्यासारखं हंगामाच्या अधेमधे येत नाही; तर मृगाच्या सुरूवातीला येतो. बैलांची पूजा करून, कौतुक करून, कृतज्ञता व्यक्त करूनच त्यांना कामाला जुंपले जाते.
       आता कारवनीची ती मजा राहिली नाही. उन्हाळ्यात बैलांचे साज तयार करणारे, दावे वळणारे बुजूर्ग आता दिसत नाहीत. सगळे साज आता बाजारात आयताळ मिळतात. सुताचे.
        आता चाबुक वाजवणारे मुलं दिसत नाहीत तर बैलांसोबत सेल्फी घेणारे आहेत. एकूण लहानपणीचा तो आनंद उरला नाही.

सोमवार, ४ जून, २०१८

गेंद्या

   मी लहान असताना आमच्या घरी एक बैलजोडी होती. गेंद्या व घरड्या. त्यातला गेंद्या हा घरच्या गाईचा खोंड होता. दरबारी नावाच्या गाईला झालेला हा खोंड. आईसारखाच बांडा होता. गोल टोकदार शिंगं. नंदीबैल वाटावा असा हा बैल. हा खोंड लहान असतानापासूनच त्याला आजोबांनी म्हणजेच आप्पांनी लळा लावला. पुढे गेंद्या खूप प्रसिद्ध झाला.
     लहानपणी गुरांच्या वाड्यात गेंद्या आईला पिताना आप्पांनी ' हं, चल आता पुरं कर.' म्हटलं की; गेंद्या तोंडातलं थान सोडून वाड्याकड निघायचा. एरवी थान सोडेल ते वासरू कसलं? ओढून काढलं तरी आचळाखालून निघत नाहीत. शेताकडून येताना पुढं गेंद्याची माय. मागे गेंद्या. त्यामागे आप्पा. वाटेत कुणाला आप्पा बोलत थांबले की  गेंद्याही आप्पाचं बोलणं होईपर्यंत थांबायचा.
        थोरले काका आजीला चोरून हरभऱ्याची दाळ टोपीत आणून गेंद्याला चारायचे. वडील त्याला हरभऱ्याचा ढाळा चारायचे.  आजी भरडा, पेंड चारायची. साऱ्या घराचेच गेंद्याला लाड होते.
    पुढे आप्पांनी त्याला विहिरीत उडी मारायला शिकवले. पाठीवर हात थोपटून ' हं, मार हुडी.' म्हटल्याबरोबर गेंद्या थोडं मागं सरकून सुसाट धावत येऊन कठोकाठ विहिरीत उडी मारायचा. पोहत एक फेरी पूर्ण करूनच बाहेर यायचा. एकदा शेतात साळ खुरपणाऱ्या बायांनी विषय काढला, 'तुमचा गेंद्या हिरीत हुडी मारतोय मन ! खराय का?' आप्पांनी बांधावर चरणाऱ्या गेंद्याला हाक मारली. आप्पा म्हणाले, ' ही बाया तुला पवायला येतनी मनलालत्या. चल मार बर हुडी ' असं म्हटल्याबरोबर गेंद्यानं धावत जाऊन उडी मारली. बाया कौतुकानं चेकाळू लागल्या. बाहेर येऊन गेंद्या पुन्हा चरू लागला. आप्पांना अजून हुक्की आली. ते गेंद्याला म्हणाले, 'बाया तुला भेलं म्हनलालत्या. आरे मर्दासरका मर्द तू. यी. मारून दाव आजू एक हुडी.' गेंद्यानं कान टवकारले. तोंडातलं धाट टाकून सुसाट विहिरीकडं धावत आला आणि उडी मारली. एक फेरी घालून बाहेर आला. सगळ्या बाया अवाक.
     गेंद्या स्वतःच शिंगांनी जू खांद्यावर घ्यायचा. मग उचललेल्या जुवाखाली घरड्या मान घालायचा. आप्पांनी त्याला कधीच हातांनी जुंपले नाही. आमची दोन शेतं होती. दूरदूरवर. मळा आणि माळ. गेंद्या-घरड्या मळ्यात असायचे. आजोबा गावातून माळाकडे जायचे. मळ्यातून वडील बैलांना सोडून द्यायचे. दोन्ही बैल सोबत माणूस नसताना सरळ माळाला जाऊन आंब्याखाली उभारायचे. मग आप्पा येऊन पाळी मारून बैल मोकळे सोडून सांजच्यापारी घरी. दोन्ही बैल सरळ मळ्यात येऊन वडलांजवळ. माळाकडून मळ्याकडे बैल निघाले की; वाटेने जाणारे शेतकरी म्हणायचे, 'निघाले बघा नंदी !'
       एकदा आत्त्याच्या गावी(मंगरूळ) पोळ्याच्या आदल्या दिवशी (खंडमळण्या) वडील नदीवर गेंद्या-घरड्याला धूत होते. घरड्याला धूताना त्यांनी ' हं, कर पाय वरी.'  म्हल्याबरोबर घरड्यानं पाय वर उचलला. तो पाय धुवून 'आता ही पाय कर वरी' म्हटल्यावर त्यानं दुसरा पाय वर केला. त्या गावचे लोक आपापले बैल धुवायचे सोडून ही गंमत आश्चर्याने बघू लागले. घरड्याला आप्पांनीच हे शिकवलं होतं.
    एकदा नांगरताना घरड्याच्या खुरात तुराटीची कोयली घुसली. बैल लंगडू लागला. घरड्याला पाय वर करायला सांगितल्यावर त्याने पाय वर केला. घरड्याचा पाय मांडीवर घेऊन वडलांनी ते धस्कट मोठ्या सायासांनी काढलं. वेदना होत असूनही घरड्यानं लाथ झाडली नाही. त्याचं सारं अंग थरथरत होतं. तोंड वासलं होतं. पायाला रक्ताची धार लागलेली. वडलांचं धोतर लालबुंद. घरड्यानं सोसलं पण मालकाला त्रास दिला नाही.
     गेंद्या रात्री रानातून बरेचदा दावं तोडून सुटायचा. रात्रभर कुठं चरून यायचा, की काय करायचा देव जाणे! पहाटे आपल्याच जागेवर घरड्याशेजारी उभा असलेला दिसायचा. कधीच कुण्या शेतकऱ्याची 'आमचं पीक खाल्लं' म्हणून तक्रार आली नाही. रात्री गेंद्या सुटलेलं लक्षात आलं तरी वडील-चुलते त्याला शोधत नसत. त्यांना वाटायचं ' कुटं जातोय? पाट्टं यील की आपल्या जाग्याला.'

         गेंद्या म्हातारा झाला तरी त्याला आप्पांनी विकला नाही. एके दिवशी म्हातारा गेंद्या चरता चरता मागचे पाय निसटून तोल जाऊन आमच्या त्याच विहिरीत पडला. सात पुरूष खोल विहिरीत एकदीड पुरूषच पानी होतं. आपटल्याने जबरदस्त मार लागला. सगळ्यांनी त्याला बाहेर काढलं. चारपाच दिवसानंतर गेंद्यानं डोळे मिटले. आप्पा, वडील, चुलते धाय मोकलून रडले. सारं घर...सारा शिवार रडला. गेंद्याला शेतातच पुरलं.

बुधवार, ३० मे, २०१८

कुणब्याची शायरी



जुने दिवस आठवले की मनावर ढगं दाटतात. ते रानशिवारातले दिवस. पानझडीचे...खळ्यादळ्याचे दिवस..मोटनाड्यांचे दिवस...भुलईचे...जात्यावरच्या पहाटेच्या दळणाचे... ओव्यांचे..रात्रीच्या देवळातल्या भजनाचे...चावडीवरच्या गप्पांचे...हुरडापार्टीचे...मुराळ्याच्या मानाचे...सग्यासोयऱ्यांच्या वर्दळीचे...घुंगराच्या गाडीचे...कुणब्याच्या शायरीचे...सोन्यासारखे दिवस.
   तो जुन्या दिवसांच्या स्मृतीत हरवतो...
पहाटे दळताना जात्याच्या गुढगर्भ संगीताच्या ठेक्यावर वहिनीच्या मंजुळ आवाजात ओवी ऐकू यायची.
       पाट्टंच्या दळनाला
       आता उशीर झाला बाई
       नंदी गेल्यालं ठावं न्हाई
मग त्याला उत्साह वाटायचा...तो मनोमन ठरवायचा: 'उद्या वैनी उटायच्या आद्दी बैलं नाही सोडलो तर भाद्दर नाही.'
मध्येच ओवी बंद होऊन जात्याची वेगात घरघर व्हायची. थोड्या विरामानंतर पुन्हा ओवी ऐकू यायची.
       बारा बैलाचा नांगर
      चलतो वनमाळी
      ऐका भिवाची आरोळी
त्याला वाटायचं, म्याबी भिवा होईन. नांगराला जाईनच.मग खरोखरच तो वैनी उठायच्या आधी नांगराला जायचा.
       राजा गं नांगऱ्या
        सर्जा गं आगल्या
        दादा पालव्या लागल्या
असं कौतुक ऐकून त्याला हुरूप वाटायचा. माईनं केलेलं कौतुक तर   खूपच सुखद. ती गायची.
         आपट्याच्या झाडाखाली
         दोगं बसले बापल्योक
         आपली पेरनी झाली ठीक
पेरणीनंतर उभं कवळं पीक डुलायला लागे.
         तिपन्या बाईनं
         आता धरीलं उभं माळ
          रासन्याची का तारामाळ
त्याचे कष्ट त्याची होणारी तारांबळ या करूण ओवीतून ऐकल्यावर त्याचा सारा शीण ओसरून जाई.
     त्याची कवळ्या वयाची बायको भरगच्च पिकलेलं पीक पाहून हरखून जाई. तिचे ओठ गाऊ लागत
          आता शेता गं आड शेत
           कुण्या शेताला बाई जाऊ
           तिथं हेलाव्या देतो गहू
त्याची माय नव्या सुनेचं आणि आपल्या लेकीचं तोडीस तोड रूप पाहून हरखून जाई. जातं तिला गायला सांगे. मग ती नणंद भावजयीचं कौतुक जात्यावर गाऊ लागे.
           आता ननंद भावजयाs येsगं
           शिवंच्या शेता गेल्या
            इजंवनी का चमकल्या
तो पहाटे औताला जाई. त्यालाही शायरी सुचे.
          ढवळ्या रं पवळ्या चल बिगीबिगी....
मोटंच्या कुरकंए s कुरकुंए आवाजाचं संगीत त्याला आव्हान देई.
          हे s  ए  s ए s हा ss
          हो s ओ s ओ s हो ss
असं त्याचं अमूर्त गोड गाणं गळ्यातून ओसंडू लागे.
    बघता बघता पीक भराट्यात येतं. आता कापणी सुरू केली पाहिजे. बायागड्यांनी रान सजीव होतं. भल्लरी सुरू होते.
तो सवाल टाकतो.
तो: भलगडी दादा भला s रे भलगडी दादा
       ह्या वाटेनं राधा गेली का रे दादा
       तिच्या पायात तोडे होते का रे दादा
       भलगडी दादा भला s रे भलगडी दादा
साथी: मो नाही पाहिलो भले s हो भलगडी दादा

       मग कलगीतुरा रंगतो. तोड्याची वळख पटत नाही. तवा तो कमरेला माचपट्टा, गळ्यात वज्रटीक, दंडात वाक्या... अशा ओळखीच्या खुणा सांगतो. शेवटी साथीदार एखाद्या खुणेला ह्या शायरीतून वळख दाखवतो. काम ओसरत जातं. कल्पना, काव्य आणि गायन यात कामाचा त्रास वाटत नसे.
    शेवटी एकमेकांना शाबासकी दिली जाई.
       गबरूचं काम भले s हो भलगडी दादा
       जोंधळा राजा भले s हो भलगडी दादा
        लावावा पट्टा भले s हो भलगडी दादा
...... तो गतस्मृतीतून बाहेर येतो. डोळे ओले झालेले असतात. त्याची गतकाळातली मुशाफिरी संपते आणि हळूहळू तो भानावर येतो.


मंगळवार, १५ मे, २०१८

जोहार : समकालीन अस्वस्थ दैनंदिनीची पाने

'जोहार' ही सुशील धसकटे यांची पहिलीच कादंबरी! लेखकाने या कादंबरीद्वारे साहित्यविशावात दमदार पाऊल टाकले आहे.   
  या कादंबरीचा नायक मल्हार हा मराठवाड्यातल्या खेड्यातल्या एका शेतकरी कुटूंबातून एम.फिल. करण्यासाठी विद्येचे माहेरघर समजल्या जाणा-या पुण्यात येतो. पुण्यात आल्यावर त्याला सर्वप्रथम जाणवते ती गोष्ट म्हणजे, खेडे आणि शहर यामधील विषमतेची प्रचंड दरी!
  विद्यापीठातले राजकारण, जातकारण, कंपूशाही बघून तो चक्रावून जातो. एकीकडे तो मराठी परंपरांच्या मुळांचा शोध घेत राहतो. जातककथा, कथासरित्सागर, गाथासप्तशती, लीळाचरित्र, संतवाड्.मय, दलित-ग्रामीण-स्त्रीवादी साहित्यप्रवाह ते आजचे साहित्य अभ्यासत जातो.
  परंपरांमधील चांगल्या-वाईट गोष्टी व त्यांचा जगण्यावर झालेल्या परिणामांचा अन्वयार्थ लावू पाहतो. तो ज्या शेतकरी समाजातून आला, त्या समाजाच्या अधोगतीचे पुरावे शोधत जातो. दुसरीकडे त्याला येणारे अनुभव पचवत जातो. या अनुभवांची गाथा म्हणजेच जोहार ही कादंबरी होय.
   सध्याच्या अस्वस्थ महाराष्ट्राच्या दैनंदिनीची पानेच या कादंबरीत आलेली आहेत. अलीकडे ज्या घडामोडी झाल्या, एका विशाल समूहाकडून जो असंतोष प्रकट झाला, त्याची कारणे किंवा पार्श्वभूमी शोधायची असल्यास 'जोहार' ही कादंबरी वाचावी लागेल. या अस्वस्थ कालखंडाचे दस्तावेज म्हणून ही कादंबरी महत्त्वाची आहे.
  सांप्रतकाळी चहूबाजूंनी होत असलेली मूल्यांची पडझड, अंगावर येणारी विषमता, जातीय ध्रुवीकरण, टोकदार झालेल्या जातीय अस्मिता, बोकाळलेला चंगळवाद, समाजमनाला आलेले बधीरपण, भ्रष्ट व्यवस्था, कमालीचा स्वार्थभाव, भ्रष्ट साहित्यव्यवहार, खुज्यांची सर्वच क्षेत्रातली लुडबूड व त्यांना आलेले महत्त्व, शेतक-यांची सर्व बाजूंनी होत असलेली नाकेबंदी, गिळंकृत करू पाहणारा जागतिकीकरणाचा कराल जबडा इ. आस्थेच्या प्रश्नांविषयी ही कादंबरी बोलत राहते. या सा-या प्रश्नांनी भोवंडून गेलेला मल्हार मग आधुनिक लीळा रचत राहतो.
   विकासाच्या कुठल्याच संधी नसल्यानं मागे राहिलेल्या ज्या समाजातून मल्हार आलाय, त्या समाजाविषयी तो मूलभूत चिंतन करतो. मोठेपणाच्या चुकीच्या कल्पनांमध्ये अडकून पडलेला, कुप्रथांनी वेढला गेलेला, परंपरांच्या दुष्टचक्रात अडकलेला, व्यवस्थेने उपेक्षित ठेवलेला हा समाज, या समाजाला आलेले दलितत्व, या समाजातली सर्वात शोषित घटक स्त्री व तिचा वेदनेचा प्रवास, हे सर्व या कादंबरीत प्रभावीपणे आणण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
   चार्वाक, बुद्ध, कबीर, तुकाराम,म. फुले,राजर्षी शाहू, डाॅ.आंबेडकर, महर्षी वि.रा. शिंदे, काॅ. शरद पाटील, आ.ह. साळुंखे ही प्रगल्भ वैचारिक परंपरा मानणारा हा तरुण लेखक हा समृद्ध वारसा घेऊन आजचे वास्तव डोळसपणे अधोरेखित करतो. ही कादंबरी आजच्या तरूणाला आत्मभान देण्यास सक्षम असून, खुसखुशीत नर्मविनोदी भाषा, बोलीचा योग्य वापर, उपरोधिक व तिरकस शैली ही या कादंबरीची आणखी काही वैशिष्ट्ये.
   या कादंबरीवर 'नेमाडपंथी' असा शिक्काही मारण्यात आला. पण कुठेच निव्वळ अनुकरण न करता ही कादंबरी स्वतंत्र भूमिका आणि विचार जोरकसपणे मांडते, हे कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय कळणार नाही. नेमाडे पचवून त्यापुढचा टप्पा
या कादंबरीने गाठला आहे.
 भाषेचा वापर, निवेदन, मांडणीचे तंत्र, रचना इ. सर्वच पातळ्यांवर 'जोहार' ही कादंबरी वेगळी आणि सरस ठरली आहे. यासाठी लेखकाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

रविवार, ७ जानेवारी, २०१८

तीन लघुत्तम कथा

रात्री स्मार्टफोनमध्ये बघत, त्यावर बोटं फिरवत चालणारा तरूण आणि डेअरीत दूध घालून एका हातात रिकामं कँट घेऊन डायरीतली नोंद बघत येणारा टोपीवाला मामा यांची समोरासमोर धडक बसली.दोघांनीही एकमेकांकडे तुच्छतेनं पाहिलं आणि निघून गेले.
_________________________________________________
बस्टँडवरचा हमाल दुपारी ऊनानं कावून डेपोतल्या
ऑफिसात येऊन बसला. फॅन आहे म्हणून. पण कारकूनानं त्याला लगेच कामं सांगितलं,
 'हे सायबाला नेऊन दे.'
कागदाचं भेंडोळं घेऊन हमाल कंट्रोलरूमकडे निघाला..ऊन कुठं जातंय? ते बाहेर वाटच बघत होतं.   तरीही तो पुन्हा पुन्हा आशेनं ऑफिसात येतच राहिला...
___________________________________________________
टळटळीत दुपार.
चपल्या मारल्यावनी ऊन.
गावकरीच्या मळ्यातल्या हिरीवरच्या पैपाला पानी सुटलंय.
लोक ऊनाला इसरून तिकडं सुटलेत.
एक घागर डोस्क्यावर,
एक कमरंवर घेऊन ती ठेक्यात चाललीय...
म्हागंम्हागं तिची बारकुळी पोरगी पिल्लूघागर घेऊन आंगावर पानी सांडू सांडू तिला गाठायला बगतेय.
काठ फुटलेल्या रांजनात हिरवं पानी डुचमळतंय.
 घागरीम्हागं घागर पैपाला तरीबी पाटातून थोडं थोडं पानी ऊसाच्या खोडव्याला चाललंय.
___________________________________________________

गझल

  गझल ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आ...