गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

घर

आमचं मातीचं घर होतं. मागं सात खण इमला. पुढे पत्र्याची ओढणी. मोठं अंगण. एका बाजूला गुरांचा गोठा. वाड्याच्या बाहेरच्या भिंती शेणानं सारवलेल्या. खोल्यांमध्ये फक्त पांढऱ्या मातीचं पोतरं. खाली धूम्मस केलेल्या जमिनीवर शेणाचं सारवण. अंगणात शेणाचा सडा. सडा-रांगोळ्या झाल्यावर घर कसं लख्ख व निर्मळ वाटे.
    देव्हाऱ्यावर ज्ञानेश्वरी. तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, हरिपाठ, शिवलीलामृत आदि ग्रंथ बासनात व्यवस्थित बांधून ठेवलेले असायचे. देव्हाऱ्यात दोन लंगडे बाळकृष्ण, घोड्यावरचा सिद्धनाथ, विठ्ठल-रखुमाई, अंबाबाई, गणपती...अशी देवांची वर्दळ. अंगणात तुळशीचा कट्टा. तुळशीबुडी महादेवाची पिंड.
    इमल्याच्या दोन खोल्यांना लागून एक जुनी अंधारी खोली होती. या खोलीत फासा, कुऱ्हाडी, चाडे, नळे, कुदळी...अशी इकनं, गठुडे, घुंगुरमाळा, दृष्टमण्यांच्या माळा, मुंगसे, जुनी गंजाटलेली तलवार, पाळणा, मोठमोठ्या रव्या, हंडे, गाडग्याच्या उतरंडी, कनगी, गुम्मे....असे बरेच अडगळीचे सामान असे. त्या खोलीची मला फार भीती वाटायची. मी रूसल्यावर आजी मला भीती घालायची, "गप्प बैस, न्हायतर जुन्या खोलीत कोंडवीन."
मी शहारून गप्प बसायचो. हळूहळू या खोलीची भीती कमी झाली. आईच्या पदराला घट्ट धरून कधीमधी खोलीत जाऊ लागलो. सुट्ट्याला आत्याचे लेकरं आल्यावर मी त्यांना दहशत घालू लागलो, " जुन्या खोलीत बावा हाय." ते मानायचे नाहीत. मग मी त्यांना दारापाशी थांबायला सांगून; आत अंधारात जाऊन खुंटीवरच्या घुंगुरमाळा वाजवायचो. बाहेर येईपर्यंत सगळे आवाज ऐकून पसार झालेले असायचे. नंतर ते मला विचारायचे, "भावजी, तुला तो बावा कसा खात नाही रे?"
मी सांगायचो, " त्येनं माजा दोस्त हाय."
घरात कुणी रागावलं की, मी जुन्या खोलीत आतून कडी घालून, अंधारात दिवसभर उपाशी बसायचो." बाहेरून कुणी कित्ती विणवलं तरी बाहेर यायचो नाही. आजोबांची प्रेमळ हाक ऐकल्यावर मात्र नाईलाज व्हायचा.
      चौथीच्या इतिहासातील शिवराय व मावळ्यांचा प्रताप भान विसरून वाचायचो. अन् त्या जोशात जुन्या खोलीत जाऊन; ती काळी जड तलवार कशीबशी हातात घेऊन हात फिरवायचो. शिंक्यावरच्या मोठ्या सलदाला शत्रू समजून घाव घालायचो.
      वाड्यात एका बाजूला अर्धवट बांधकाम झालेला गोबरगॅस होता. दोन्ही बाजूंच्या हौदांमधून आत उतरायचो. आतील भाग मंदिरासारखा. वर गोलाकार घुमट. उन्हाळ्यात तिथं थंडगार वाटायचं. हीच आमची खेळायची जागा.
       मी चौथीला गेल्यावर शेजारच्या मनामायनं अभ्यासासाठी तिनं स्वतः तयार केलेली चिमणी दिली होती. माझ्या शिक्षणाला मिळालेली ही पहिली प्रेरणा! त्या दिव्याउजेडी बसून मी कवाबवा घटकाभर पुस्तकातली चित्रं बघायचो. चिमणीचा धूर नाकात जाऊन नाक काळंभोर झालेलं सकाळी दिसायचं.
     पडवीला वडील, चुलते, बामणाचा पबाकाका, हबीबचाचा यांच्या रामायण, महाभारत, पुराण, संत, भक्ती, शेती या विषयांवरच्या गप्पा चालत. आम्ही भावंडं शांत बसून या गोष्टी ऐकायचो. काही कळायचं. काही कळायचं नाही.
      आप्पांची बाज अंगणात. मी त्यांच्याजवळ झोपायचो. ते चांदण्या रात्री आकाशातील तिफण, इच्चू, ध्रुव अशा नक्षत्रांची ओळख करून द्यायचे. मला चांदण्या मोजून दाखव म्हणायचे. थोडावेळ माझी मज्जा बघायचे. आप्पांनी मला बाजेवर पडल्या-पडल्या अनेक अभंग शिकवले. नाटी शिकवल्या. मी त्यांच्या मागे म्हणायचो.
    'आम्ही कुणबियांची मुलं।
     आम्हा सार्थक विठ्ठल ॥
     धरिला द्रव्याचा नांगर ।
     काशा काढितो सागर ॥
     रामनामाची कुऱ्हाडी ।
     प्रपंचाच्या पालव्या तोडी ॥
  मी अभंग म्हणत होतो. वडील आप्पांना म्हणाले, " उगू कायबी शिकवनूक त्येला. ही अभंग गाथ्यात नाही. मनानं जोडलेला हाय."
आप्पा म्हणाले, " हाय गा ! नामदेवाच्या गाथ्यात हाय." मग वडील निरूत्तर होत.
      जनावरांचा गोठा साफ करून वाड्याचं सडासारवण करता-करता आई मेताकुटीला यायची. घरात दारिद्र्य असूनही सडासारवण, रांगोळ्या अशा नीटनेटकेपणामुळेच या घरच्या लेकी म्हणजे आमच्या आत्या चांगल्या घरी गेल्या. अडीनडीला, दुष्काळानं गांजून एकेक जनावर विकून टाकल्यानं गोठा रिकामा झाला. काही दिवसांनी गोठाही काढून टाकण्यात आला.
       खोल्यातली भूई खडबडीत झाल्यावर धूम्मस केली जाई. जमीन खोदून, पाणी-माती कालवून, सपाट करून, पुन्हा बडवून सपई केली जाई. उन्हाळ्याच्या दिवसांत धूम्मस केलेल्या घरात थंडगार वाटे. वर लाकडी फळ्यांचा इमला (माळवद). इमल्याच्या खोलीत उन्हाळ्यात थंडगार तर हिवाळ्यात उबदार वाटे. हा इमला वडिलांनी माळाला सात पोते तुरी झाल्यावर घातला. पाच पोत्यांना  तेराशे रूपये पट्टी आली आणि वडलांचं 'इमल्याचं' स्वप्न पूर्ण झालं. इमला घातला त्यावेळी मी रांगत होतो म्हणे!
      मोठ्या माणसांचा डोळा चुकवून  न्हाणीघराच्या आखूड भिंतीवरून उडी मारून मी पाटलाच्यात टीव्ही पहायला जाई. तेव्हा गावात तेवढाच एक टीव्ही होता. एकदा टीव्ही बघत पाटलाच्या सोप्यात बसलो होतो. बाहेर खूप अंधार पडलेला. दारातून हाळी ऐकू आली, "बाग्याऽव" मी तटकन उठून बाहेर आलो. बाहेर मुसळधार पाऊस. वडील पोत्याचं घोंगतं पांघरून आलेले. वारं-वावधान. ईजा चमकत होत्या. वडलांच्या पुढंपुढं घरी आलो. मोठ्या दारातून आत आलो. समोरची सोप्याची भिंत ढासळून पत्रे खाली आले होते. वडलांनी शिव्या-मन-शिव्या दिल्या. पोटभर शिव्या खावून झोपी गेलो. नशीब! मार मिळाला नाही. वडलांनी कधी पाची बोटांनी शिवलं नाही. आईचा मार मात्र उठता-बसता खायचो. कामाच्या दगदगीनं आणि घरातल्या लोकांच्या बोलाला वैतागून सगळा राग ती माझ्यावर काढायची.
     पुढं भूकंप झाला. तेव्हा अंगणात पत्र्याच्या खोपी घातल्या गेल्या. तेव्हा साऱ्या गावात खोपीच खोपी. माणसांना या खोलीत वाकूनच वावरावं लागे. या त्रासाला कंटाळून शेवटी आम्ही बैलगाडीनं वढ्यातले बेशरमाचे सोट कापून आणले. त्यांचं कूड गुंफून अंगणात पत्र्याच्या दोन वढण्या घातल्या. बरीच वर्षं त्या बेशरमाच्या कुडाच्या घरात राहिलो. कधी स्वप्नातही असं रहायचा विचार केला नव्हता.
       पुढं काही वर्षांनी भूकंप पूनर्वसन अनुदान म्हणून एक खोलीच्या बांधकामाचे साहित्य आणि थोडे पैसे मिळाले. त्यात काही पैसे घालून आम्ही पक्क्या विटांचा वाडा बांधला. खोल्यांना दारं, भिंतींना गिलावा, फरशी....काहीच करू शकलो नाही. या पक्क्या इटकुराच्या लाल घरातही बरीच वर्षं काढली. पुढे दहाबारा वर्षांनी उरलेली कामं माझ्या हातानं झाली. घराला घरपण आलं. आता तर आरसीसी घरही बांधून झालं. पण वडलांनी हौसेनं बांधलेलं मातीचं, इमल्याचं, धूम्मस केलेलं, सडा-सारवण-रांगोळ्यांचं, गोठ्यासहित मोठ्या अंगणाचं ऐटदार घर; 'घर' या नावाला शोभणारं होतं.

    (पूर्वप्रकाशित : तिफण)

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

बाईपणातून जाणाऱ्या बाईचा प्रवास: झिम पोरी झिम



  बालाजी मदन इंगळे यांची 'झिम पोरी झिम' ही पहिलीच कादंबरी.  यापूर्वी त्यांचा 'मातरं' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.  या संग्रहाने त्यांना ग्रामीण कवी म्हणून मान्यता मिळवून दिली. त्यांच्या काही कवितांमधून  स्त्रीचे भावविश्व साकारले आहे. ग्रामीण स्त्रीचे समग्र भावजीवन त्यांना नेहमीच खुणावत असावे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी कादंबरी हा जास्त अवकाश असणारा वाङ्मयप्रकार जाणीवपूर्वक निवडलेला दिसतो.

       या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र असलेल्या जनीचे प्रथमपुरुषी निवेदन वाचकाला सरळ तिच्या गावात, तिच्या घरी नेऊन सोडते. जनी ही कुठल्याही खेड्यातली, कुठल्याही सामान्य कुटुंबातली एक सामान्य मुलगी आहे. ती तिच्या जीवनातल्या वरवर सामान्य वाटणार्‍या गोष्टी सांगत एक असामान्य अनुभव देते. मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे तिचे त्या घरातले दुय्यम स्थान तिला शंकर या तिच्या भावाच्या जन्मानंतर प्रकर्षाने जाणवते. तिच्या जन्माच्या वेळी 'दुसऱ्या वेळीही मुलगीच झाली' हा मायबापाचा असंतोष तिच्या वाट्याला आलेला असतो. मात्र जनी आजारी पडते तेव्हा हेच मायबाप तिची काळजी घेतात, हा विरोधाभासही तिला जाणवतो. यातून लेखक खेड्यातल्या माणसांच्या स्वभावातील सूक्ष्म बारकावेही किती नेमकेपणाने मांडतो आहे, हे कळून येते.

       घरातल्या कामाचा भोगवटा ग्रामीण भागातल्या मुलींच्या वाट्याला अगदी कोवळ्या वयापासूनच येतो. जनीही त्याला अपवाद नाही. हे शेतकरी कुटुंब या घरातल्या मुलीच्या लग्नपाई सावकाराच्या पाशात सापडते व त्याच्या शोषणामुळेच भूमिहीन होऊन उघड्यावर येते. जनीचे माय, बाप, बहीण या साऱ्यांनाच लोकांच्या शेतात मजुरीने कामाला जावे लागते. जनीला अपरिहार्यपणे घरातल्या कामाचा बोजा पडतो. तिला तिची शाळा सांभाळून घरातली कामं करावी लागतात. जरा सवड मिळाली की हळूच ती मैत्रिणींसोबत खेळायला सटकते. हे सर्व अत्यंत चित्रमय पद्धतीने लेखकाने सजीव केले आहे.

       जनीचे घरातल्या प्रत्येकासोबत असलेले नैसर्गिक भावबंध लेखकाने अत्यंत कारागिरीने विणले आहेत. खेड्यातल्या चालीरीती, हुंडाप्रथेमुळे मुलीच्या लग्नाची मायबापाच्या मनातली धास्ती, या लोकांच्या जगण्यावर पडलेल्या मर्यादा अचूकपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. आजच्या टीव्ही चॅनल्सच्या युगात लोप पावत चाललेली खेळगाणी, लोकगीते या मुलीच्या जगण्याचा एक भाग बनून येतात.  ही गीते वजा केली तर तिच्या या गोष्टीला अर्थच उरणार नाही, इतकी ती तिच्या व्यक्तिमत्त्वाशी, जीवनाशी एकरूप होऊन येतात.

      ग्रामीण बोलीच्या सहजतेसह कादंबरीचा ओघवतेपणाही लक्षात येतो. या कादंबरीच्या भाषेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही केवळ मराठवाड्यातील उमरगा परिसराची बोली नसून; ती या प्रदेशातील ग्रामीण स्त्रीची अस्सल बोली आहे. ग्रामीण बोलीचा जिवंतपणा पुरुषांपेक्षाही स्त्रीच्या बोलण्यातचं अधिक शिल्लक आहे. सुरुवातीला वाचताना शहरी पांढरपेशा वाचकाला काहीसं अडखळल्यासारखं झालं तरी, पुढे वाचक या भाषेला सरावतो. 'करलालतं',  'वाटलालं',  'काढलालेव',  'यिवलालतं',  'दिसलालतं', 'दुखलालंय' यासारखी क्रियापदं ह्या भाषेला सुलभ व गोड बनवतात, तसेच लयही प्राप्त करून देतात. या भाषेसह या प्रदेशातील म्हणींचाही वापर व्हायला हवा होता, असं मात्र जाणवतं.  'येळवस' या सणाचे, लग्नाचे वर्णन वाचताना आपल्याला या प्रदेशाच्या ग्रामीण कृषिनिष्ठ संस्कृतीचीही ओळख व्हायला मदत होते.

        या कादंबरीतून प्रकट झालेले ग्रामीण वास्तव हे पांढरपेशी शहरी वाचकांसाठी निश्चितच धक्कादायक आहे. तालुक्यापासून जवळचे गाव असूनही या मुलींना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. साठ-सत्तरच्या दशकातल्या कादंबरीत चित्रित झालेले ग्रामीण वास्तव व आजची परिस्थिती यात फारसा फरक नसल्याचे ही कादंबरी वाचताना लक्षात येते. यावरून स्वातंत्र्योत्तर पाच-दहा दशकांतली ग्रामीण विकासाची कल्पना करता येईल. त्यासाठी पंचवार्षिक योजनांचे आराखडे, आकडे, राष्ट्रीय/दरडोई उत्पन्नातील वाढ अशा गोष्टींकडे पाहण्याची गरज उरत नाही. गावात कॉइनबॉक्स आला हा वरकरणी किरकोळ वाटणारा बदलही लेखकाने टिपला आहे. गावात मोबाईल फोन, टीव्ही आले तरी जनीच्या जीवनाशी या वस्तूंचा संबंध येत नसल्याने त्यांचा उल्लेख नसावा.

    तिच्या मैत्रिणींचं वयात येणं, तिचं वयात येणं, पौगंडावस्थेत शारीरिक बदलांमुळे गोंधळलेली मानसिकता, तिच्या तईचे पाटलाच्या पोराबरोबरचे शारीरिक संबंध, बन्याचं तिच्या मागं लागणं, धोंडुरामच्या पोरांनं तिला मिठी मारणं, ती घरी एकटी असताना नात्यातला मुलगा घरी आल्यावर निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना, कावळे मास्तराचा लोचट व विकृत स्पर्श, स्वतःच्या शरीरावयवांची चीड, मैत्रिणींचे अनुभव, तिच्या अपेक्षा, शेवटी तिच्या वाट्याला आलेलं भीषण वास्तव, अशा साऱ्यातून लेखकाने जनीचे जे लैंगिक भावजीवन उभे केले आहे ते चकित करणारे आहे. स्वतः पुरुष असूनही त्यांनी आपल्या नायिकेला चांगला न्याय दिला आहे. लैंगिक बाबीवर लिहिताना त्यांच्या लेखणीचा कुठेही तोल ढळला नाही.

त्यामुळेच हे वाचताना कधीही लैंगिक भावना चाळवल्या जात नाहीत.
       जनीनं तिच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचा तपशीलही या कादंबरीचे महत्त्वाचे अंग आहे. तिच्या लग्नाचे बापाच्या डोक्यावरचे ओझेही त्यामुळे कमी झाले असले तरी; लग्नानंतर समाजमान्य चौकट लाभल्यानंतरच खऱ्या अर्थाने तिचे लैंगिक व आर्थिक शोषण सुरू होते, हे वाचताना स्त्रीला केवळ माणूस म्हणून नव्हे तर स्त्री म्हणून समजून घेता येण्याची गरज अधोरेखित होते.                                                                                                              कादंबरीचे कथानक सुरुवातीला काहीशा संथ गतीने पुढे सरकते. नंतर जनीची दहावी, बारावी, डीएड, लग्न असा थोडा वेग घेते. लेखकाला या कथानकावरची पकड ढिली होऊ द्यायची नसल्याने असे झाले असावे. मात्र त्यामुळे मूळ विषयापासून भरकटत जाण्याची व निरर्थक, अनावश्यक तपशिलांचा भरणा होण्याची भीती कमी झाली आहे हेही जाणवते. लेखकाने कथानक व पात्रांचे नैसर्गिक विकसन यांवरच भर दिला असल्याने आपोआपच अन्य गोष्टींकडे काहीसे दुर्लक्ष झाले असावे. उदाहरणार्थ, या कथानकाच्या विकासक्रमात कुठेही प्रतिमांचा वापर लेखकाने केला नाही. पण यामुळे हे कथानक कुठेही लंगडे पडले आहे, असेही म्हणता येत नाही. उलट रांगडी व जिवंत अनलंकृत बोलीभाषा तसेच वास्तवाची थेट मांडणी यामुळे ते अधिक प्रत्ययकारी झाले आहे. जगण्यातील वास्तव कलात्मकता सांभाळूनही थेटपणे मांडण्याचे आव्हान लेखकाने येथे सांभाळले आहे. वाचकाला चकित करण्यासाठी भुलवण्यासाठी अन्य कोणतीही क्लृप्ती लेखकाने वापरलेली नाही.

         कादंबरीचा शेवट करतानाही लेखक वास्तवाची कास सोडत नाही. 'आजपसून निवड मंडळाच्या परीक्षेचा अभ्यास चालू करू आसं ठरविले. वतलापुढून उठले. करकचून केस बांधले अन् आंघोळीला आले.'  या शेवटच्या ओळी जनीचा संघर्ष लग्नानंतरही सुरूच आहे, हे सूचित करतात. बाया खंबीरपणे वास्तवाला तोंड देतात. जीवन थांबत नसतं ही लेखकाची जाण इथे प्रकट होते.               
थोडक्यात, ग्रामीण स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण शिक्षणामुळे सकारात्मकपणे बदलणारी तिची मानसिकता, बाईपणातून जाणाऱ्या कुठल्याही बाईच्या मानसिक, भावनिक, लैंगिक व बौद्धिक गुंतागुंतीचे अनेक पदर त्या गुंतागुंतीच्या नैसर्गिक बंधासह प्रभावीपणे लेखकाने मांडले आहेत.

(साभार : नवाक्षर दर्शन, जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर 2009)

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

आमराईतले दिवस


  शाळेच्या परीक्षा संपल्या की, कोंडलेलं मांजर धूम पळावं तसं मी आमराई गाठायचो. मला बघितल्यावर गुरं सोडून आमराईत धिंगाणा घालणारे गुराखी लगोलग गुरं वळवायचे.
    आख्खं शिवार जळताना आमराईतली सावली थंडगार वाटायची. दिवसभर आमराई हलू द्यायची नाही. आमराई साऱ्या शिवाराला साद घालायची. सकाळची कुळवपाळी आटपून आजूबाजूचे कुळवकरी दुपारी आमराईत टेकायचे; अन् बापाचा गप्पांचा फड रंगायचा. आम्ही पोरं इळभर सुरपारंब्या खेळण्यात दंग. माकडासारखं ह्या फाट्यावरून त्या फाट्यावर. आमचा गलका वाढला की बाप वरडायचा. मग आम्हाला गुपचूप ओळीनं झोपावं लागायचं. खेळून, दमून गडद झोप लागायची. ऊनाचा एखादा चुकार ठिपका तोंडावर आला की, झोपमोड व्हायची. बाप जागा बदलून झोपायला सांगायचा. आमराईत ऊनाच्या झळाही लागत नसत. थंडगार! झिरपणाऱ्या खापरातल्या बिंदगीतलं पाणीही थंडगार!
    मग झोप मारून झाल्यावर पडल्या-पडल्या नजर इकडून तिकडं पळणाऱ्या खारींवर जायची. तुरूतुरू एखादी खारूताई वर-वर जायची. माझ्या नजरेचा पाठलागही सुरूच असायचा. एक नेमक्या आंब्याजवळ जाऊन खारूताई त्याला टोकरायची. त्या टोकरलेल्या ठिकाणी लालबुंद दिसायचं. मी एकदम आनंदानं उठून; सरसर चढून तो पहिला पाड तोडून आणायचो. पडलेल्या पाडांवरून आम्हा पोरांची भांडणं लागायची. मग वाटणी. मला फक्त कोय!
     पहिल्या पाडाचा शोध खारूताईनं लावल्यापासून, आमराईची राखण करायची एक नवी जिम्मेदारी आमच्यावर न सांगता पडायची. मग दररोज सकाळी जल्दी उठून, भाकर घेऊन आमची टोळी आमराईत दाखल व्हायची. गेल्याबरोबर पाड हुडकायची स्पर्धा लागायची. दुपारपर्यंत पडलेले पाड तोंडी लावायला घेऊन आम्ही जेवायचो. साधंच जेवण अगदी गोड लागायचं.
       आमराईतलं प्रत्येक झाड वेगळं. एक गुठली आंबा. त्याचे आंबे फारच लहान. साखरआंबा खूप गोड. शेपूच्या भाजीच्या चवीचा शेपूआंबा.  केसरआंब्याच्या कोयीला केसरच जास्त. एक खाराचा (लोणचं) आंबा. रसाचा आंबा. या गावरान आंब्यांच्या जाती आता नामशेष होत आहेत. आमच्या साखरआंब्याच्या चवीपुढे तर हापूस सुद्धा झक मारतो. साखरआंब्याचा एक तरी आंबा खाल्ला तरच मला आंबा खाल्ल्यासारखं वाटतं. या आंब्याच्या कोया मी लावल्या होत्या. दोन उन्हाळे जमादाराच्या डुबीचं पाणी खांद्यावर आणून झाड जगवले. तरी झाडं पुढं जगले नाहीत. बारक्या बंधूनेही अशीच खटपट करून पाहिली; पण यश आलं नाही. असो.
     पाड पडल्यानंतर आम्ही पोरं एकमेकांना चोरून आंब्याची अढी घालायचो. एकमेकांच्या अढ्या शोधून काढायचो. दुसऱ्याच्या अढीतले आंबे बिनपत्त्यानं फस्त करताना मजा वाटायची. पुन्हा बघतो तर माझ्या अढीचाही कुणीतरी चोरून फडशा पाडलेला असायचा.
  उन्हाळ्याचे रखरखीत दिवस आमराईच्या संगतीनं सुखात जायचे. आंबे उतरवताना हातांना, तोंडाला चीक उतून दुखं पडायचे, तरी त्याचा तेव्हा गुमानच नसायचा. आंबे उतरून झाल्यावर आमराई सुनी-सुनी वाटायची.
  माणसांना, गुरांना, पशुपाखरांना, भर उनात मायेची सावली देणारी आमराई...पुरणपोळीला मधुर आमरस देणारी आमराई... मधमाशांना पोळं करायला आसरा देणारी आमराई... ती आमराई आता उध्वस्त झालीय. त्यातलं एक आंब्याचं झाड वाढत्या वयाच्या खुणा अंगावर वागवत कसंबसं तग धरून उभं आहे. तेही बिचारं एकटेपणानं कावून गेलंय. जास्त दिवस टिकेल असं वाटत नाही.

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

नांदून केलं नाव

माझ्या आईच माहेर गावातलंच. तिचं घर भजनाचा वाडा म्हणून ओळखलं जातं. तिच्या ढेळजंला दररोज रात्री पंचपदीचं भजन व्हायचं. तिचे वडील हरिभाऊ हे मृदंग वाजवायचे. प्रसंगी कमरेला पंचा बांधून कीर्तनही करायचे. तिचे चुलते रामभाऊ हे उत्कृष्ट गायक. प्रचंड पाठांतर. माझ्या आजोळच्या घरासमोरच सप्ता व्हायचा. आईचं नाव चमाबाई. ती थोरली. तिला दोन बहिणी, दोन भाऊ. मी माझ्या आजीला पाहिलं नाही. आईच्या लग्नाआधीच ती वारली. ती अतिशय सुंदर होती. नाकेली आणि गोरीपान होती, असं आई सांगते. आमच्या शेजारचं 'व्हंताळ' हे आजीचं माहेर. आजी कॅन्सरनं गेली. तिच्या थानाला गाठ आली होती. आपरेशन करून एक थान काढून टाकला होता. आईच्या लग्नाची सगळी तयारी आजीनं करून ठेवली होती. घरचा खपली-गहू, दाळी इ.तिनं कनगी, गुम्मे भरून लिपन लावून ठेवले होते, असं आई सांगते.
   आमचं वडिलांचं घरही वारकरी. आजोबा, वडील, चुलते तिच्या घरी भजनाला जायचे. आजी आमच्या वडिलांना (भाऊंना) जावईबापू म्हणायची. आज्याला मळा-माळ- बरड अशी  तीस एकर शेती होती. त्यातली सोळा एकर पुढे एमआयडीसीत गेली. असो. शेताला बघून आणि पोरगं वारकरी म्हणून माझ्या आईच माहेर गावातलंच. तिचं घर भजनाचा वाडा म्हणून ओळखलं जातं. तिच्या ढेळजंला दररोज रात्री पंचपदीचं भजन व्हायचं. तिचे वडील हरिभाऊ हे मृदंग वाजवायचे. प्रसंगी कमरेला पंचा बांधून कीर्तनही करायचे. तिचे चुलते रामभाऊ हे उत्कृष्ट गायक. प्रचंड पाठांतर. माझ्या आजोळच्या घरासमोरच सप्ता व्हायचा. आईच नाव चमाबाई. ती थोरली. तिला दोन बहिणी, दोन भाऊ. मी माझ्या आजीला पाहिलं नाही. आईच्या लग्नाआधीच ती वारली. ती अतिशय सुंदर होती नाकेली आणि गोरीपान होती, असं आई सांगते. आमच्या शेजारचे व्हंताळ हे आजीचं माहेर. आजी कॅन्सरनं गेली. तिच्या थानाला गाठ आली होती. आपरेशन करून एक थान काढून टाकला होता. आईच्या लग्नाची सगळी तयारी आजीने करून ठेवली होती. घरचा खपली-गहू, डाळी इ. तिनं कनगी गुम्मे भरून लिपण लावून ठेवले होते, असं आई सांगते.
  आमच्या वडिलांचं घर वारकरी. आजोबा, वडील, चुलते तिच्या घरी भजनाला जायचे. आजी आमच्या वडिलांना (भाऊंना) जावईबापू म्हणायची. आज्याला मळा-माळ-बरड अशी तीस एकर शेती होती. त्यातली सोळा एकर पुढे एमआयडीसीत गेली. असो. शेताला बघून आणि पोरगं वारकरी म्हणून आमच्या घरी आईला द्यावं, असं आजीला वाटायचं. पण कधीकधी इथं द्यायला तिला नकोही वाटायचं. एवढी शेती असूनही हे लोक जवारीसाठी पिशवी घेऊन हिंडतेत. लई गरीबी हाय म्हणून ती विचार झटकून टाकायची.
    आईला मुरूमचं स्थळ सांगून आलं होतं. आजोबा पाहुण्यांकडे निघाले होते. पण त्यांना कीर्तनकार महाराजांनी अडवलं. कमलाकर चांगला आहे. शेत चांगलं आहे.आज ना उद्या गरीबी हाटंल. पोराच्या वाट्याला दहा एकर शेत येतंय, असं म्हणून आजोबांची समजूत काढली. इकडच्या आज्यालाही महाराजांनी थाटवलं. अन एकोणेऐंशीच्या मार्च महिन्यात दारातल्या सप्त्याच्या मांडवातच आई-भाऊंचं लगीन झालं.
  माय गेल्यावर आई खूप खचली होती. सतत आजारी पडायची. तिच्या चुलतीनं तिला सावरलं होतं. आईचं लग्न होईपर्यंत आईच त्या घरची माय झाली होती. आजोबांनी आईला व तिच्या भावंडांना कधीच शेतातली काम लावली नाहीत. खाऊन-पिऊन सुखी असं घर होतं. प्रसंगी आजोबांनी पिठाच्या गिरणीवर, खताच्या दुकानात काम केली. पण लेकरांना सुखात ठेवले. पण आजोबांमध्ये एक अवगुण होता. ते फारच तर्कटी व हेक्काडी होते. थोडं जरी मनासारखं नाही झालं तरी ते ताट भिरकावून द्यायचे. अबोला धरायचे. आठ-आठ दिवस जेवायचे नाहीत. या स्वभावामुळे आईसकट सगळे त्यांना खूपच घाबरायचे.
      लग्न होऊन आई खोपटवजा घरात आली तेव्हा लग्नाच्या दोन नणंदा, दोन दीर होते. दोन नणंदा लग्न होऊन गेलेल्या. सात-आठ माणसांच्या खटल्यात ती दाखल झाली.
     आईला पांढऱ्या मातीची अॅलर्जी होती. तिला सतत खोकला यायचा. भाऊंना हे लग्नाआधी माहीत होतं तरी त्यांनी या 'खोकल्याम्माला' स्वीकारलं होतं. आम्ही मुलं भाऊंना चिडवतो 'तुमचं आईवर प्रेम होतं का नाही? खरं सांगा!' म्हटल्यावर ते खुलतात. मान्य करतात. तिच्याचसाठी भजनाला जायचो म्हणतात. आईही लाजून हसते. 'व्हय! खरं वाटलं बघा. लेकरावाला उगू कायबी सांगनूका. मी तर तुमाला बगायलाबी नव्हते.'  म्हणते.
 मग भाऊ छेडतात, 'चोरून बघत नव्हतीस का? तुझ्या मायला, खरं सांग.' आम्ही पोट धरुधरु हसू लागतो.
   आईचं सासरमध्ये खूप शोषण झालं. आजी तिला पहाटे चान्नी निघायला उठवायची. अन स्वतः पुन्हा झोपायची. तिला मोठा वाडा, जनावराचा वाडा झाडून, शेण काढून, दुरडीभर भाकरी बडवून, धुणं-भांडे करूनच शेताकड कामाला जावं लागे. वडील पहाटेच बैलं सोडून माळाला जायचे. पुन्हा घरी आलं की, स्वयंपाकपानी, चूलपोतरा.... त्यात आत्यांची खोचक बोलणी. आजी चुलत्यांचा लाड करायची. 'त्येंचे लेकरं का बाळं? तुमी दोघंच काम करावं लागतंय.' म्हणायची.
   आईला काम सोसायचं पण बोलणं सोसायचं नाही. आजही तिचा हाच स्वभाव आहे. घालून-पाडून बोलल्यावर ती जीव द्यायला तळ्याकडे धावत गेली होती. आजी मागं पळत गेली. 'आगंs परमुद्या... परमुद्या... रडलालंय. दूद पाजीव. फिर म्हागारी.'  एवढंच कसं तिच्या कानावर पडलं की? ती थबकली आणि पुलावरून धावत माघारी आली. आई हे खूप रंगवून सांगते.
      खोकला लागला की आईला माहेरी लावून द्यायचे. कारण दवाखान्याला न्यायची ह्या घराची ऐपत नव्हती. तिकडचे आजोबा तिला घेऊन फिरायचे पण गुण यायचा नाही. शेवटी त्यांनी जुजबी ओळखीमुळे डॉ. होगाडे यांच्याकडे सोलापूरला नेले. त्यांनी आईला इंजेक्शनचा कोर्स दिला. रात्ररात्र खोकून तिचा आवाज बसायचा. हे चार-पाच इंजेक्शन दिल्यावर खोकला हळूहळू कमी व्हायचा. नंतर कळले की ते पेनिसिलिन सारखे घातक स्टेरॉईड होते. तिच्या ओठात मुंग्या यायच्या. डोळ्यावर झापड यायची आणि पुढे कामांचा डोंगर! पुढे आजोबाच हे इंजेक्शन विकत घेऊन गावातल्या काही काळ कंपाउंडरकी केलेल्या गुंडूमामाला द्यायला लावायचे. मरताना आजोबांनी गुंडूमामाला बोलावून सांगितलं होतं की, 'माझ्या माघारी तुझ्या बहिणीला तूच वाचून शकतोस. तिच्याकडून एक रुपयाचीही अपेक्षा करू नको.' असं वचन घेऊन दहा व्हायल त्यांच्याकडे दिल्या होत्या. गुंडूमामांनी ते जिवंत असेपर्यंत हे वचन पाळले. त्यांची बायको आईला दाळ-जवारी मागायची. आई गुंडूमामाला कळू न देता तिला धान्य द्यायची.
   तर ह्या खोकल्यानं, कामाच्या रगाड्यानं आधीच लहानखुरी असलेली आई अगदीच काटकुळी दिसायची. तिचे गालफडं बसलेले. वडील शेतात राबून असेच गालफडं बसलेले. पण त्यांचा मूळ बांधा मध्यम व सशक्त आहे. आईची मला फार कीव यायची. तिला आम्ही तीन लेकरं. मी थोरला. पाठीवर भाऊ. मग बहिण. माझे पितृघराने खूप लाड केले. माझ्या लाडाइतकाच आईचा दुस्वास केला. दमेली, रोगेल अशा शब्दांनीच तिचा उल्लेख व्हायचा. आम्हा भावंडासमोरही. आईने साधी भांडी आपटली तरी सगळे भाऊंपुढे किरकिर करत. मग भाऊ वैतागून तिला जनावरासारखं मारायचे. घरच्या जिव्हारी लागणाऱ्या बोलण्याला वैतागून आई मला जनावरासारखं मारायची. इकडचे आजोबा (आप्पा) म्हणजे देवमाणूस. ते माझी आईच्या तावडीतून सुटका करत. 'चमी, जीव घेतीस का लेकराचा?  सोड नाहीतर काठीच घालीन पाठीत.' असं आप्पांनी म्हटल्यावर मी रडत असतानाही मला आनंदानं हसू यायचं. असा सगळा देखावा.
       माझ्या भावाच्या जन्मानंतर खूपच बंडाळ सुरू झाली.एका आत्याचं लग्न झालेलं. लेकराला दुधही मिळेना. आईचा जीव अर्धाअर्धा व्हायचा. मग आईने भीतभीत 'मी कामाला जाऊ का?' असं भाऊंना विचारलं भाऊ भडकले. "इज्जत घालवायचाय का घराची? आज्याबात जायचं नाही.' असं म्हणून तिला गप्प केलं. तरी ती न जुमानता एके दिवशी आयाबायांसोबत कामाला गेलीच. बाप  बिघडून बसला. घरात येऊ नको वगैरे रामायण झालं. हळूहळू विरोध मावळत गेला. टोमणे खात आई काम करून घर भागवू लागली. शेतमालक आईला कामाला आलेली बघून हळहळायचे, 'आरेआरे! चांगल्या घरचं लेकरू हाय. बापानं ऊन बघू दिलनी. येतंय का बाई तुला काम?' म्हणायचे. आईनं आम्हा लेकरांसाठी मान-अपमान सोडून दिला. मी शिकून मला नोकरी लागेपर्यंत आईची मजुरी सुरूच राहिली. घरालाही सवय झाली.
        आई केटी बंधाऱ्याच्या कामावर होती. मी आठवीत असेन. आत्याकडे शिकायला होतो. सुट्टीत गावाकड आलतो. तिची भाकर घेऊन गेलो. गाळाचे जड टोपले उचलून वरच्या बाईकडे द्यायचं तिचं काम. तेही अवघड, ओल्या निसरड्या जागेत उभारून. खोकत-खोकत तिचं काम सुरू.  ओझ्यानं पोटातली गाठ सरकून तिला परसाकड लागलेली. अधून-मधून परसाकडला जात काम करत होती. तिच्या मैत्रिणी तिची अवस्था बघून स्वतः अवघड जागेत थांबून तिला सोप्या जागेत थांबवायच्या. मला बघून तिच्या केविलवाण्या डोळ्यात आनंद. मला माझीच लाज वाटली. नंतर आई आणि भाऊ दोघंही वीटभट्टीच्या कामावर जाऊ लागले. भाऊंची मजुरीची ती पहिलीच वेळ. आधी कुळवून पेरून द्यायचे. भाडे मारायचे. पण दुष्काळी परिस्थितीने ते दोघे एक झाले. पुढे भाऊ विहीर फोडायच्या कामावरही गेले. बहात्तरच्या दुष्काळात भाऊंनी काम केले होते. खूप वर्षांनी त्यांना ही वेळ आली पण आई रूळून गेली होती. आईचं कामावरून कौतुक केलं की भाऊंना राग येतो. त्यांचा स्वाभिमान दुखावतो. 'मीबी लई काम केलाव गा! काम करून माझे हाडं कुट्ट झालते.' असं म्हणतात.
      आईनं कितीही मारलं तरी मला तिचा कधीच राग आला नाही. ती कामाला गेल्यावर तिच्या मागे कूट खाणाऱ्या घरातल्यांचा यायचा. आप्पा सोडून.
    ती निरक्षर आहे तरी तिला पैशांचा हिशेब जमतो. घड्याळातली वेळ जवळपास ओळखते. आता तर मोबाईलही वापरते. तिचा गळा गोड आहे. बुद्धी तल्लख आहे. मी म्हणतो, 'तू शिकली असतीस तर निदान मास्तरीन तर झाली असतीस.'  ती खूश होते. भाऊ हुशार आहेत. दोघांची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्या स्मरणाधारे त्यांच्या जुन्या उखाळ्यापाखाळ्या निघतात. भांडण पेटते. आम्ही मजा घेतो. घरात तीन नोकरदार आहेत. भाऊंना त्यांच्या गेलेल्या शेताचे पैसे आलेत. तिची हाऊस आता तेच फेडतात.
     बाप मेल्यावर माहेर तुटलं. एक जीव लावणारा नागूमामा त्याच्या लग्नाआधीच करेंट लागून मेला. माय, भाऊ, बाप मेल्याचं दु:ख तिनं पेललं. आता एक भाऊ आहे पण नावालाच. कोरडा. माया नाही. तरी आई बळंनच जाऊन त्याला राखी बांधून येते. कुठलीही अपेक्षा ठेवत नाही. नणंदांची बाळंतपणं केली. सासू पडून असताना तीन वर्षे तिची सेवा केली. हगणं-मुतणं-आंघोळ-खाऊ घालणं सारं केलं. राग ठेवला नाही. सासऱ्याची अशीच तीन वर्षे सेवा केली. घर-शेत-मजूरी करत हे सारं केलं. आता म्हणते, 'त्येंचाच अशीर्वाद हाय. मनून माझं समदं चांगलं झालं.'
       तिला खोटेपणाची भयंकर चीड आहे. कुणी खोटेपणा केला की, ती शिव्याश्राप द्यायची. म्हणून तिला बरेचजण वचकून असत. समदं गाव तिचं कौतुक करतं. 'लई खट्टे खाल्ल्याय. तिला संबाळा.' असं कुणीबी म्हणतं.
 'आशिलाचं होतं म्हून
नांदून केलं नाव
माय नवाजतं तुला
सारं जकेकूर गाव'
     आजीही मूळची वाईट नव्हती पन कानानं जरा हलकी होती, असं ती सांगते. मी नोकरीला लागल्यावर तिची मजुरी बंद केली. चुलते आधीच वायलं निघाले होते. घरच्या शेतात ती अजूनही राबते. मी रागावलो की म्हणते, 'काम केल्यावरच आन गोड लागतंय. काम केल्यानं मरतनी. आंग हाळू होतंय.'  तिचा खोकला वेळच्या वेळी आधुनिक उपचार केल्याने कमी होतो. तरी ती अधूनमधून येतो. मी विचारल्यावर म्हणते, 'पैलंसरका तर नाही की! रातरात झोपू द्यायचा नाही.'
      मी नोकरीला लागल्यामुळे भाऊही शिकून नोकरीला लागला. सगळ्यांची लग्नं झाली. घर सावरलं. सुनाही समजूतदार आहेत. तिला समजून घेतात. काळजी घेतात. गावाकड भाऊ, धाकटा ल्योक, सून, नातू यात ती रमून गेलीय. मी नोकरीनिमित्त जरा दूरच्या गावी राहतो....
      गावाकडून शेवटची बस येते. चौकातल्या हाटेलाच्या बाकड्यावर बसून वेड्यासारखं मी उतरणारे प्रवासी निरखीत राहतो. उतरणार्‍या बायांमध्ये आई दिसल्याचा भास होतो. ती येईल अचानक न सांगता. सप्राईज देण्यासाठी. असं वाटत राहतं. पण आईसारखी दिसणारी बाई उतरून वेगळ्याच दिशेनं चालू लागते.             
    गेल्या खेपेला ती अशीच आली होती. पाट फुटून वाहणाऱ्या पाण्यासारखं. दावं तोडून येवं गाईनं तशी आली. 'नातीला बघू वाटलालतं म्हणून आलेव.'  म्हणाली. आनंदलो. दोन दिवस घरात सणासारखं गजगज वाटलं. ती बाहेर गेली असताना पोरीला म्हणालो, 'आज्जी गेली गावाकड.' दोन वर्षांची लेक धावत आतल्या खोलीत गेली. तिची अडकवलेली पिशवी बघून पळत येऊन मला म्हणाली, 'आज्जी गेलनी... आज्जीची पिशवी हाय तित्तं.'
     तिचं मन दोनचार दिवसात उच्चाट खातं. खळेदळे, कामंधामं उरकते. येईन पुन्हा अजून चार दिवस म्हणून ती जाते. पण काय खरं नसतं. आतल्या खोलीतल्या मोळ्याला आता तिची पिशवी नसते पण लेक रोज तिच्याचविषयी बोलत राहते.
                   ---------------------------

 पूर्वप्रकाशित- वाघूर 2017  (दिवाळीअंक) आभार: नामदेव कोळी
चित्र साभार: श्रीधर अंभोरे.

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

अनिकेत पाहुणे



 आम्हाला तिसरीला 'वासुदेव' ही कविता होती.
  'मोरपिसांचा टोप घालुनी
   टिल्लिम टिल्लिम टाळ वाजवित
   वासुदेव आला...
   मुखी हरीचे नाम गर्जितो...
   प्रभातकाळी थयथय नाचत स्वारी आली' अशा काही ओळी आठवतात. माझ्या बालपणीही वासुदेव कधीतरीच यायचा. उशीरा उठायचो त्यामुळे त्याची गाठ पडायची नाही. एकदा तो योग आलाच. मग मीही लहान टाळ एका हाताला त्याच्यासारखं गुंडाळून, डोक्यावर टोपी घालून घरी नक्कल करू लागलो. अभंग तर हुबेहूब त्याच्याच ठेक्यात म्हणायचो. कौतुक करून घ्यायचो.
      मरगम्मा (कडकलक्ष्मी) आणि पोतराजांची खूप भीती वाटायची. आत लपून बसायचो. मरगम्माच्या ढोलकीचं गुरगुंsपांग  गुरगुंsपांग ऐकू आलं की पोटात भीतीनं गोळा यायचा, आणि तो आवाज आपल्याच पोटातून येतोय असं वाटायचं. पोतराजाचं चाबकानं स्वतःवर आसूड ओढणं आणि त्याच्या पायातल्या घुंगरांचा आवाज भयानक वाटायचा.
     मसणजोग्यांनाही खूप भ्यायचो. त्यांचा रंगीबेरंगी विचित्र पोषाख, हळदी कुंकवाच्या रेघोट्या ओढलेला भेसूर चेहरा. एका हातात काठी, एका हातात घंटा आणि काखेत झोळी असा अवतार! गावातली कुत्री यांना पाहून जोरजोराने भुंकत. काठी त्यासाठीच घेत असावेत. कुणीतरी सांगितलेलं की, मसणजोगी मंत्र मारून लहान मुलांना चिमणी किंवा कावळा करून झोळीत घालून घेऊन जातात. मग काय? घाबरगुंडी. नुसतं बघायलाही भ्यायचो. त्याच्या नजरेस पडू नये म्हणून आत सांदाडीला जाऊन बसायचो.
   पोपटवाले जोशी भविष्य सांगताना फार चटपटी बोलायचे. बाया तर फार लवकर यांच्यावर विश्वास ठेवायच्या.
  'तुझं मन लई मोठं हाय माय. मनानं लई चांगली हाईस. तुजं मन कळनाऱ्यालाच कळतं. दुसऱ्यासाटी तू लई करतीस पन तुजी कदर कुनालाच नाही. तुज्या हातचं मीट आळनी हाय माय' त्यानं असं म्हणलं की, बाया पदर डोळ्याला लावत.
 'खरं हाय बाबा' म्हणून पसापायली धान्य जास्तच वाढायच्या. हे जोशी मनकवडे असतात. त्यांना आपल्या मनातलं सम्दं कळतंय, असं बोललं जायचं. 'तुला तीन पोरं आनी दोन पोरी हायत' असं परफेक्ट सांगून ते थक्क करीत. एका जोश्यानं भविष्य सांगत सांगत आमच्या वडलांना 'तू तुजं रगत तुज्या डोळ्यानं बगून मरनार हायस' असं म्हटल्यामुळे वडील कुठं गावाला गेले की, माझ्या मनात   काहूर दाटून येई.
 काळा कोटवाले जोशी सनई फार छान वाजवित. ऐकत रहावंसं वाटे.
   गावात नंदीवाला आला की, आम्ही पोरं त्याच्या मागे गावभर फिरायचो. यामागे उत्सुकती अशी की, नंदीबैल गुबूगुबू मान हलवून सगळ्यांनाच होकार देतो की नाहीही म्हणतो, ते बघावं. असे दोन नंदीसारखे भव्य बैल आपल्याही शेतात असावेत असं वाटायचं.
   दरवेशीही वर्षातून एकदा न चुकता गावात यायचा. त्याचं ते केसाळ अस्वल तो सांगेल तसं वागताना पाहून त्याच्या धाडसाचं कौतुक वाटे. आजी दरवेशाला सूप भरून जवारी वाढायची. त्याचं अस्वलाची वेसण खेचणं, कायम दंडुक्यानं मारणं बघून अस्वलाची दया यायची. आजी दरवेशाकडून पेटी घेऊन आमच्या गळ्यात बांधायची. या बारक्या पेटीत दरवेशी अस्वलाचे केस मंतरून घालतो. त्यामुळे भीती वाटत नाही. भूतबाधा होत नाही. अशी लोकांची भाबडी कल्पना.
   गावात येणारे आणखी एक डेंजर पाहुणे म्हणजे गारूडी. आम्ही त्यांना सरपवाले म्हणतो. वेताच्या टोपलीतला साप बघून काळजाचा ठोका चुकायचा.
   बालपणी कशाकशाला भ्यायचो हे आठवून हसू येतं. पोलीसांना बघून आम्ही गांडीला पाय लावून पसार व्हायचो. ते पोलीस म्हणजे राईंदर! हे पोलीस हसवतात हे कळल्यावर त्यांचं बोलणं ऐकायला मज्जा येऊ लागली.
 'हं! चला काकू लग्नाला चला
  लेकरं बांधा खुट्टीला
   कुत्रे घ्या काखंला
चला चला लग्नाला चला'
  'कुटं हाय सायेब लगीन?' असं कुणी विचारलं की,
'खाली गेल्यावर वरीच हाय. एक्कावन वाजून बावन मिंटाला आक्षता हायत्या. नवरा नांदायला जायला नगं मनून रडलाला, पळून चालला तर गोळ्या घालायला हे पिस्तूल आनलाव.' असं काहीबाही  बोलून, घराबाराला हसवून, मूठपसा घेऊन हा राईंदर नावाचा खोटा पोलीस झोळीचं ओझं पेलत, काठी आपटत निघून जाई. दुसरीकडे आणि वेगळंच काहीतरी बोलून हसवत फिरत राही. विनोदाची चांगली जाण आणि हजरजवाबीपणा हे त्याचे विशेष गुण. आता टिव्हीवर विनोदी कार्यक्रमात विनोद करण्यासाठी साडी नेस, मुलीचा ड्रेस घाल असे कितीतरी सायास केले जातात तरी हसू येत नाही. राईंदर संवादातून विनोदाची पखरण करायचा.
   'सूयाsपिनाs केसाsवरsयss' अशी बोहारणींची विशिष्ट लयीतली आरोळी ऐकू आली की, आमची तायडी पळत येऊन आईला सांगायची. मग आई खिळपटात जमा केलेले केस देऊन टिकल्या, पिना इ. घ्यायची. मुलींनाच यात इंटरेस्ट! माझं लक्ष त्यांच्या पाठीला बांधलेल्या झोळीतल्या टुळटुळ बघणाऱ्या लेकरांकडे जायचं. आई त्यांना भाकरी कालवण खायला द्यायची. तिथंच खाऊन गटगट पाणी पिऊन या बाया पुढे जायच्या.
   गावात कधीकधी डोंबारी यायचे. ढोल वाजवणं, तारेवर चालणं, उलट्या उड्या मारणं. जाळ लावलेल्या गोल तारेतून माकड्याच्या उड्या मारणं, रचलेल्या बाटल्यांवर उभं राहणं, उभी मातीतली सुई पापण्यांनी उचलणं, केसांनी गाडी ओढणं अशा अचाट कसरती डोळे विस्फारून टाळ्या पिटत बघताना भान हरपून जाई. त्यांना काहीतरी द्यावं असं खूप वाटायचं पण चड्डीच्या खिशात पाच पैसेही नसायचे. फुकट खेळ बघून अपराधी मनानंच घरी परतायचो.
   दारावरच्या एका पाहुण्याला आमच्या घरी खूप मान होता. ते म्हणजे दत्तसंप्रदायी भगवी कफनी आणि हातात शेर घेऊन भिक्षा मागणारे संन्यासी. त्यांनी घरी बोलावून आजी चहा पाजायची. काही महाराज घरोघरी नावानं हाका मारायचे.
  ' कुठं गेले बाबाराव? आहेत का? ' म्हणतच दारात प्रकटायचे.
   झाडावर झोपणारा पांगूळ वगैरे मी बघितले नाहीत. ते आमच्याही पिढीआधीच अस्तंगत झाले. घिसाडी रबरी फुग्याचा भाता लावायचे. घिसाडणी कोळसा मागायला यायच्या. फासा खुरपे शेवटून द्यायचे. फुटके टोपले, घागरी नीट करून द्यायचे. घिसाडी, फासेपारधी यांची पालं तर आमच्या शाळेमागच्या मैदानातच पडायचे. त्यांचं पालातलं ऊन-वारा-पावसातलं जगणं बघून गरिबीतही आपण खूप सुखी आहोत, असं मनोमन वाटायचं. पालात चितरं, होले हीच मेजवानी असायची. मासाचे तुकडे उन्हात वाळत घातलेले असायचे. भूकेची बेगमी करून ठेवत.
   साच्यात मूर्त्या करून देणारे, गाढवावर दगडी खलबत्ते, उखळ विकणारे, लाकडी रव्या, चाटू, मुसळ करून देणारे, चिंध्यांचे दोर वळून देणारे, कात्री-विळा-खुरप्याला धार लावून देणारे, सुटकेस घेऊन मोती विकत फिरणारे मोतीवाले, एक हात कमरेवर ठेवून त्यावर चादरी-सतरंज्याचा भार पेलत विकणारे, तेलाच्या डब्याच्या कोठ्या तयार करून देणारे, स्टो रिपेरीवाले, असे कितीतरी फिरस्ते यायचे.
      मेंढ्यांचे कळप घेऊन धनगर यायचे. त्यांच्या बायका तीन दगडांच्या चुलीवर पातळ भाकरी सराईपणे करायच्या. खतासाठी रानात मेंढ्या बसवल्या जायच्या. धनगर किराना मालासाठी गावात यायचे. कैकाडी दुरड्या, सुपं, डाली आणायचे.
   असे अनेक अनिकेत पाहुणे वर्षानुवर्षे ठरलेल्या काळात न चुकता यायचे. गावोगावी त्यांच्या ओळखीही असायच्या. जुने लोक मायाळू होते. पसापायली द्यायला हात अखडत नसत. आता चुकून एखादा फिरस्ता मागायला आला तर अक्षरशः त्याला हाकलून दिले जाते. थोड्याफार भटक्या-विमुक्त जातीही आता स्थिरावल्या आहेत. त्यांच्यातही आता शिक्षणामुळे थोडीबहुत प्रगती झालीय. पण जी गावं त्यांना आधार द्यायची, तीच गावं आतून बकाल झाली आहेत. शेतकरी पार भिकेला लागलाय.
( फोटो: सौजन्य इंटरनेट)

मंगळवार, १७ जुलै, २०१८

पाऊसझड

मला पाऊस आवडतो पण पावसाळ्यातली चिकचिक, चिखलराडा, ओंगळघाण आवडत नाही. जीव वैतागतो.
      उन्हाळ्यात अचानक अवकाळी पाऊस गाठतो. तापलेल्या मातीवर पडलेल्या पहिल्या सरींनी मातीला सुटलेला खमंग वास छाती भरून घ्यावासा वाटतो. अनेक फुलांचे, अत्तरांचे सुगंध घेतले पण पहिल्या पावसानं मातीला सुटलेला गंध सर्वांत श्रेष्ठ वाटतो.
    अवकाळी(वळवाचा) पाऊस, आषाढातला पाऊस, श्रावणातला पाऊस, भादातला पाऊस... किती वेगळेवेगळे...
   अवकाळी पाऊस मनाची मरगळ धुवून काढतो. मिरगाचा पाऊस मनात उल्हास, स्वप्नं पेरतो. झडीचा पाऊस अंतर्मुख करतो. अंगात आळस भरतो.
   पाऊस कधी नुसताच पहावा. कधी अंगभर गोंदून घ्यावा. पाऊस एकसारखा नसतो. तसं पावसाचे आवाजही एकसारखे नसतात. कोरड्या रानावर पडताना होणारा टपटप्....नंतर सडडड्...असा आवाज. पत्र्यावर पडताना होणारा हलगी वाजवल्यासारखा आवाज, पाऊस थांबल्यावर ओघळणाऱ्या थेंबांचा होणारा टिबुक...थिबुक असा आवाज. ओढ्यानाल्यातून वाहताना होणारा खळखळाट...
      पाऊस ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट करत येऊन दिपवून जातो. दहशतही घालतो. पाऊसच इंद्रधनुष्याची किमया करतो. इंद्रधनुष्य हा फारच पुस्तकी शब्द झाला. आम्ही त्याला धामीनकाठी म्हणायचो.
       दारापुढील वळचणीच्या सोन्याचांदीच्या धारा पुढं बोरकरांच्या कवितेत सापडल्या. उन्हात पाऊस आला की आम्ही कोल्ह्याचं लगीन लागलं म्हणून नाचायचो.
   ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा
   पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
 असं म्हणत अंगणात गिरक्या घेत आपण मोठे झालो.
     उन्हाळ्यात भरपूर आंबे खाऊन कोया उंकड्यावर टाकल्यामुळे पावसाळ्यात उकंड्यावर आंब्याची भरपूर रोपं यायची. कोवळी चाॅकलेटी पान असलेली रोपं उपसून खालच्या मऊ पडलेल्या कोया दगडावर घासून आम्ही त्याच्या पुंग्या करून वाजवत फिरायचो. गोगलगाईच्या चंदेरी रस्त्यांचा शोध घेत फिरायचो.
      पाऊस कधी पिकाला आंजारत गोंजारत येतो तर कधी पिकाला आडवं पडेपर्यंत तुडवतो.. प्रत्येक नक्षत्राचा पाऊस वेगळा...त्यानुसार म्हणीही तयार झाल्या.
 वानगीदाखल-
पडला हस्त तर कुणबी झाला मगरमस्त.
पडल्या चित्ती तर उतरतीला भीती.
पडतील सायीसाती तर पिकतील माणिकमोती.
पडल्या मघा तर चुलीपुढी हगा,
नाही पडल्या मघा तर आभाळाकड बघा.
    झडीचा पाऊस तर अंतच बघतो. झड लागल्यावर बाहेर कामच नसेल तर मज्जा वाटते. वाकळ पांघरून, पाय पोटात घेऊन पडून रहावं. चुलीवरच्या भुगण्यात चहाचं आधण ठेवलेलं असावं... पण असं होत नाही. झडीतच जास्त कामं निघतात. बाहेर पडावंच लागतं.. टपरीवच्या उकळणाऱ्या चहाचा सुगंध थेट नाकात घुसतो..
    जळण, गवऱ्या भिजल्यानं आईची चुल पेटायला सळायची. वल्ल्या गवरीनं धुपन होऊन घर धुरानं भरून जायचं. मोठ्या पावसातही न गळणारं घर भिजपावसात गळायचं. भिंतीना वलगरा चढून पोपडे पडायचे. दाराला पोत्याचं घोंगतं अडवलेलं असायचं. बाहेर जाणाऱ्याने ते पांघरून जायचं आणि बाहेर गेलेला येईपर्यंत बाकीच्यांनी त्याची वाट बघायचं. झडीत लघवीला जोर. चिखलात संडासला जायचं तर जीवावरच येई.
    झडीतही जनावरांना वैरणपाणी करायला बापाला शेतात जावंच लागायचं. बाप काकडून जायचा.
     बालपणी ढगाच्या गडगडाटाला मी घाबरायचो तेव्हा आजी म्हणायची, 'भिऊ नकू! आबाळात म्हातारी दळलाल्याय. तिच्या जात्याचा आवाज हाय.' मी विचार करायचो: म्हातारी दळत असेल तर खाली पीठ पडलं पाहिजे. मग पाणी कसं पडतंय? मग वाटायचं: म्हातारी बर्फाचे खडे दळत असेल. आज या गोष्टीचं हसू येतं.
       शेतातल्या कोट्यात जनावरांसोबत बसून शेणामूताचा वास घेत रानावरची झड बघण्यातला आनंदच निराळा...
      झडीत काॅलेजला जाताना वह्या शर्टखाली पोटात खुपसून जायचो. स्लीपरमुळे पाठीमागे पँटशर्टवर चिखलाचे शितोडे उडालेले असायचे.
         सहवासाने पाऊस संगीत वाटतो तर विरहात विद्ध करतो. छत्री नेल्यावर पाऊस येत नाही. विसरली की हमखास येतो. हे आधीच एका लेखकानं नोंदवून ठेवलंय. खरंय.
   पाऊस कधी बाजिंदा वाटतो. कधी हेक्काडी, कधी धटिंगन तर कधी अवचिंद वाटतो.
    पाऊस आवडतो तरी मी त्याच्या गुणदोषांसकट त्याला स्वीकारत नाही.

सोमवार, ९ जुलै, २०१८

गाव



गावात काय? गाव तो गाव. माझा गाव नक्की कुठून सुरू होतो, नक्की ठरवता येत नाही. गावाची वेस पडकी. हरेक गावच्या वेशी पडक्याच का? हे मला न सुटलेलं कोडं आहे. माझं गाव पांढऱ्या मातीचं म्हणून 'गावपांढरी'. (गावपंढरी नव्हे) आता आमचे गावकरी म्हणजे एक नंबर इर्रसाल! त्यांच्याच नजरेतून गावाची समीक्षा: 'ह्या पांढरीत कोण उबदऱ्या आलंय गा?' खरंच आमच्या गावात आजवर कोणीच वर आलं नाही. चुकून वर आला रे आला, थोड्या दिसातच पार रसातळाला गेलाच म्हणून समजा. पायली भरायला उशीरच लागतनी. असं ह्ये नंबरी खेक्कड गाव.
      माझं गाव एका लहानशा वळणदार नदीकाठी वसलंय. पण नदीला नावच नाही. अनेक नामकरण विधी होतात; पण नदीचं नामकरण करायला कुणीच तयार नाही. मीच नदीचं बारसं केलं: 'चंद्रगंगा' अजून हे नाव मी कुणालाच सांगितलं नाही. ही गोष्ट नदी आणि मी दोघातच आहे. का? बापरे! लोकांना हा प्रकार कळला तर तेच माझं 'येडं भास्कऱ्या' असं नामकरण करतील हो!
     माझा गाव अर्धा उमाटावर अर्धा गारीत वसलेला. वरली आळी. खाल्ली आळी अशी गल्ल्यांना नावं त्यामुळेच पडलीत. माझ्याही गावात बक्कळ देवळात बक्कळ देव निवास करतात.माझ्या गावातही नियमाप्रमाणे म्हारूतीचं देऊळ वेशीबाहेरच आहे. शिवारात हिराई, सटवाई आदि महान देव्या निवसन्ति। गावात एक मशीद व एक बौद्धविहारही आहे.
    माझ्या गावात उत्खननात सापडलेल्या अनेक सुंदर मूर्त्या आहेत. मूर्त्यांना काव कुत्र्यांचा. कारण त्या उघड्यावरच आहेत. गावतील या प्राचीन अवशेषांवर लातूरच्या एका (हुशार) प्राध्यापकानं पीएचडी केल्याचंही ऐकिवात आहे. त्याने पुरातत्व खात्याला पत्र पाठवून या सांस्कृतिक ठेव्याची माहितीही दिली होती म्हणे! मूर्त्या न्यायला गावात ट्रक आले; पण काय बिशाद आहे त्यांची मूर्त्या न्यायची? सारा गाव एक झाला. हात नाही लावू दिला. हे एक बरं झालं. मूर्त्या वस्तूसंग्रहालयात ठेवायला पळवल्या असत्या; तर आमच्या गालफुग्या कशा नीट झाल्या असत्या? मूर्तीच्या तोंडाला काव फासून, देवाचं तोंड लाल करून; गालफुगीवर तो काव लावला की रोग दुरूस्त. माझी गालफुगीही एकदा याच प्रकारानं ठीक झाली. आता गुण दगडाचा, देवाचा की कावाचा? एक त्या मूर्तीला अन् दुसरं त्या गालफुगीलाच ठावं.
      गावापासून एक-दीड किमी अंतरावर एक दर्गा आहे. त्याला हिंदू-मुस्लिम सगळे भंजतात. मुस्लिम त्याला 'राजाबक्सार' म्हणतात, तर हिंदू 'राजेभास्कर' म्हणतात. मुस्लिमांचं मत की तो त्यांचा 'पीर' आहे. हिंदूंचं मत की, कबरीखाली शिवलिंग आहे. तरी यावरून कधीच मोठा वाद झाला नाही. मला वाटतं की, ती सूफी संताची कबर असावी. पूर्वी दर्ग्याच्या भोवती बारा एकरांवर घनगर्द झाडी होती. हे आमचं 'मिनी जंगल'. माझ्या लहाणपणी भर दिवसाही दर्ग्यात जायला भीती वाटायची. तरी साताठ पोरं मिळून कवठं, सिताफळं आणायला जायचोच. आता दर्गा ओसाड दिसतो. लोकांनी सरपणासाठी झाडं तोडून दर्ग्याची वाट लावली. दर्ग्यात दर गुरूवारी कंदुरीचा नवस फेडण्यासाठी अफाट गर्दी असते. आधीच माल मारून आलेले काही लोक कंदुरीचं जेवण करून वाटेवरच्या आमच्या शेतातल्या आंब्याखाली येऊन लुडकतात. शाकाहारी लोक दर्ग्यात मलिदा-भाताचा निवद दाखवतात.
       पहाटे मशिदीतील अजाँने उठणारा माझा गाव रात्री देवळातल्या भजनानंतर झोपी जातो.
         गावाला एक पाणंद आहे. लोक परसाकडला तिकडंच जातात. बायका अलिकडे. पुरूष थोडं पलिकडे. येणाऱ्या-जाणाऱ्या पुरूषांमुळे बायकांना अवघडंन उठून उभारावं लागतं. प्रत्येक गावात ही ठरलेली गैरसोय. माझा गावही याला अपवाद नाही. आताशा शासनाच्या 'हगणदरीमुक्त गाव' धोरणामुळे पाणंदीकडची वर्दळ बरीच कमी झालीय.
  पूर्वी गावात एकच जिल्हा परिषदेची शाळा होती. आता एक खासगी माध्यमिक शाळा आणि एक आश्रमशाळाही सुरू झालीय. आता गावची मुलं गावातच शालेय शिक्षण घेतात. आम्ही आठवीला   एसटीनं उमरग्याला जायचो. कुणी सायकलवरून जायचं.
      गावेत पूर्वी इस्पट चालायचं पण चोरून. रानारानानं. मध्यंतरी ते हाॅटेल-कम-क्लबातून चालायचं. आता हा प्रकार कमी झालाय. आमच्या लहानपणी सोंगट्यांचा (सारीपाट) खेळ रात्ररात्रभर चालायचा. तोडी होईपर्यंत.
      पूर्वी गावात एकच पक्ष होता. आता बरेच पक्ष आलेत. प्रत्येकाची कार्यालयं वेगळी. गावाबाहेर कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्या तशा पक्ष व संघटनांच्या पाट्यांची गर्दी आहे. उलट कुत्र्याच्या छत्र्या उगवायचं आता कमी झालंय.
    गावात इतर कंपलसरी सणांसोबतच काही वेगळे सण-समारंभही परंपरेने साजरे केले जातात. उदाहरणार्थ हरिनाम सप्ताह, मोहरमचे पीर बसवणे. यानिमित्त फैतरा हा खेळ खेळणे, कारवनी (बैलांचा सण), येळवस, दर्ग्याची जत्रा, बिरूदेवाची जत्रा इत्यादी. गावात जयंत्यामयंत्याही उत्साहात साजऱ्या होतात. पूर्वी शिवजयंती व भीमजयंतीला हमखास मारामाऱ्या व्हायच्या. वातावरण तंग असायचं. आता लोक शहाणे झालेत. एकमेकांच्या जयंतीत  सहभागी होतात. शिक्षणाची किमया.
     पूर्वी गावात हातभट्टी काढली जायची. गावातले लोक गोळा करून सहज खडा मारला तर तो बेवड्यालाच लागावा, इतके प्रमाण होते. एक दक्ष फौजदारामुळे गावातून हातभट्टी निर्मूलन झाले. तरी बेवडे आजूबाजूला जावून भागवतात; पण प्रमाण कमी झालंय.
    गावातून राष्ट्रीय महामार्ग जातो. सडकेला पानटपऱ्या व हाॅटेलांची संख्या वाढलीय. प्रत्येक टपरीवर बेकार पोरांचा एकेक ग्रूप मावा चघळत व थूंकत कायम पडीक असतो. गावात चांगलं शैक्षणिक वातावरणच नाही, त्यामुळं बेकार जास्त. मग पोट भरायचे तीनच पर्याय एक पुणे- मुंबई, दुसरा पानटपरी लावणे, तिसरा ऑटोरिक्षा चालवणे. हे तीनही न जमणाऱ्याला गावात बेकार म्हणतात. गावाला सुपीक जमीन असूनही अनेकांना करणं होत नाही. तालुक्याचा गाव जवळ. रोजच दौरा.
      घरोघरी रंगीत टिव्ही आले. मोबाईल आले. वाटलं गावचा विकास झाला. कशाच काय न् फाटक्यात पाय. गाव आतून बकाल आणि दरिद्रीच आहे. गावच्या आरोग्याबद्दल तर बोलायलाच नको. विकास हा शब्द तर काहीच्या नावापुरता आहे. असो. माझा गाव शेवटी माझा आहे. मला तो प्रिय वाटतो.


कथा

सुक ना दुक

गनामामाला सगळं गाव नेता म्हनायचं. गावात कुठला पुढारी आला, परचारसबा आसली की, गनामामा हार घालायला सगळ्यात पुडं. इस्टेजवर खुडचीत गनामामा ...

उपशीर्षक